चाफळ (सातारा) येथे ६ मे या दिवशी ‘शिवसमर्थ प्रेरणादिन’

सातारा, ३ मे (वार्ता.) – चाफळ येथील शिंगणवाडी या गावांमध्ये राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी आणि स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली भेट झाली. ही भेट अखिल हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी ठरली. भक्ती आणि शक्तीचा संगम ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे वैशाख शुक्ल नवमी ! प्रतिवर्षी हा दिवस ‘शिवसमर्थ प्रेरणादिन’ म्हणून शिव समर्थ भक्तांच्या वतीने उत्साहाने साजरा करण्यात येतो.

या वर्षी ६ मे या दिवशी ‘शिवसमर्थ प्रेरणादिन’ साजरा करण्यात येणार आहे. गत १० वर्षांपासून हा उपक्रम ‘शिवसमर्थ प्रेरणा दिन उत्सव समिती’च्या वतीने राबवण्यात येतो. उत्सवामध्ये राष्ट्रसंत समर्थ रामदासस्वामी आणि श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज या दोन्हीही युगपुरुषांच्या पालख्या एकमेकांना भेटतात. हा क्षण अवर्णनीय असून तो प्रत्यक्षात अनुभवावा असा आहे. ६ मे या दिवशी दुपारी ४ वाजता श्रीक्षेत्र चाफळ येथून या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. तरी समस्त शिव-समर्थ भक्तांनी या उत्सवामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.