जिल्हा परिषदेकडे आल्या होत्या अनेक तक्रारी !
पुणे – जिल्हा परिषदेच्या सर्व निविदा विभागातील (टेंडर) अधिकारी, कारकुनांसह २५ कर्मचार्यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. प्रशासकीय कारणास्तव हे स्थानांतर करण्यात आले आहे, असे आदेशामध्ये नमूद करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी हा निर्णय घेतला.
दक्षिण बांधकाम विभागामध्ये लाचखोरीमुळे तत्कालीन कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर एका लेखाधिकार्याचे स्थानांतर केले होते. याच वेळी दक्षिण आणि उत्तर बांधकाम विभागातील निविदा लिपीक, देयके पडताळणीचे दायित्व असणार्या कर्मचार्यांविषयी जिल्हा परिषदेकडे तक्रारी आल्या होत्या.
मार्चअखेर असल्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली नव्हती. मे महिन्यामध्ये जिल्हा परिषदेतील कर्मचार्यांचे नियमित स्थानांतर करण्यात येते; परंतु या वेळी स्थानांतरची कल्पना अनेक वरिष्ठ अधिकार्यांना नव्हती. (स्थानांतरापेक्षा चौकशी करून सर्वांवर कारवाई करावी ! – संपादक)