‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ महाराष्ट्राच्या सारस्वतांचे अक्षय वैभव ! – चंद्रकांत पाटील, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री

आळंदीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचा भव्य शुभारंभ !

‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सव ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा’ आणि ‘अखंड हरिनाम सप्ताह

आळंदी (जिल्हा पुणे) – ज्ञानेश्वरी वाचल्याने जीवनात सकारात्मकता, शांती आणि आत्मज्ञान प्राप्त होते, तसेच व्यक्तीमत्त्वविकास अन् सामाजिक भले होणे, यासाठी साहाय्य होते.

मंत्री चंद्रकांत पाटील यांना ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा भेट देऊन सन्मान करतांना आळंदी देवस्थानाचे सदस्य

ज्ञानेश्वरी हा ग्रंथ महाराष्ट्राच्या सारस्वतांचे अक्षय वैभव आहे, असे मत उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा’निमित्त आळंदी देवस्थानाच्या वतीने ३ मेपासून ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा’ आणि ‘अखंड हरिनाम सप्ताहा’चे आयोजन करण्यात आले आहे.

ज्ञानेश्वरी पारायणात तल्लीन भाविक

ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाचे पूजन आणि शुभारंभ चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी ते बोलत होते, तसेच पाटील यांनी काही वेळ ज्ञानेश्वरी पारायण सोहळयात सहभागी होऊन ज्ञानेश्वरी पारायण केले. या वेळी विविध मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण आळंदी नगरी भक्तीरसात तल्लीन !

ज्ञानेश्वरी पारायणात तल्लीन भाविक

७ दिवस ‘जोग महाराज शिक्षण संस्थे’च्या समोरील पटांगणात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न होत आहे. यामध्ये संत चरित्र, संगीत भजन, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन, भजन आदी कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहेत. सकाळी ६ वाजता सहस्रो भाविकांच्या जयघोषात पारायण सोहळ्याचा आरंभ झाला, ज्यात अनुमाने ७ सहस्र भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महोत्सवाचा प्रारंभ श्री विणा पूजन आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी यांच्या विधीवत पूजनाने झाला. यामुळे संपूर्ण आळंदी नगरी भक्तीरसात तल्लीन झाली.