सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (गुरुदेव) यांचे व्यक्तीमत्त्व हे आदर्श शिष्य, सर्वाेत्तम गुरु, थोर लेखक, विविध कलांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती करण्याविषयीचे मार्गदर्शक, अध्यात्मजगतातील संशोधक, धर्मसंस्थापक, प्रभावी हिंदूसंघटक, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे उद्गाते अशा अनेक वैशिष्ट्यांनी सुशोभित आहे. त्यामुळे गुरुदेवांचे चरित्र साधक, शिष्य, संत, लेखक, कलाकार, संशोधक, राष्ट्रभक्त, धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ अशा सर्व स्तरांतील व्यक्तींसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या चरित्र मालिकेतील ‘साधनाप्रवास (३ ग्रंथ)’ प्रकाशित झाले आहेत. या साधनाप्रवास मालिकेचे मनोगत अन् मालिकेतील अन्य २ ग्रंथांची मनोगते संपादित स्वरूपात पुढे दिली आहेत. हे तीनही ग्रंथ ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी जिज्ञासू, हितचिंतक, साधक आदींना लाखमोलाचे दिशादर्शन करणारे असल्याने प्रत्येकाने ते संग्रही ठेवावेत.
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी

खंड १ : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांची गुरुभेट आणि त्यांनी गुरुंकडून शिकणे
‘साधनाप्रवास’ मालिकेचे मनोगत
१. गुरुप्राप्तीनंतर केवळ ३ – ४ वर्षांतच ‘गुरु’पदाला पोचलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘सर्वसाधारणपणे गुरुप्राप्ती झाल्यानंतर काही वर्षे गुरूंच्या मार्गदर्शनानुसार कठोर साधना आणि सेवा केल्यानंतर एखादा शिष्य ‘गुरु’पदाचा अधिकारी बनू शकतो. परात्पर गुरु डॉ. आठवले आरंभी देवाचा विचार न करणारे होते; परंतु अध्यात्माचे महत्त्व कळल्यावर त्यांनी त्याचा अभ्यास आणि साधना केली. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना शीघ्र गुरुप्राप्ती झाली. यानंतर गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करून ते केवळ ३ – ४ वर्षांतच गुरुपदाला पोचले ! यावरून त्यांच्यातील उत्तम शिष्याचे दर्शन घडते. ‘एवढ्या अल्प कालावधीत ते गुरुकृपेस कसे पात्र ठरले ?’, याचे कुतूहल काहींना वाटू शकते. ते या ग्रंथमालिकेवरून शमेल.
२. साधकांची आध्यात्मिक जडणघडण चांगली होण्यासाठी साधनेचे विविध पैलू बारकाव्यांनिशी शिकवणारी ग्रंथमालिका !
संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, समर्थ रामदासस्वामी यांसारख्या अनेक संतांची चरित्रे आज उपलब्ध आहेत. त्यांमध्ये त्यांचे लौकिक जीवन, साधनामार्ग, शिकवण, लीला, भक्तांच्या अनुभूती इत्यादी वाचायला मिळते. या संतांच्या आध्यात्मिक जडणघडणीमध्ये ‘त्यांच्या मनाची विचारप्रक्रिया कशी झाली ? लहान-सहान प्रसंगांतूनही गुरूंनी त्यांना कसे शिकवले? साधकावस्थेच्या पुढच्या पुढच्या टप्प्यांमध्ये त्यांच्या साधनेच्या दृष्टीकोनांत कसे पालट झाले? त्यांनी टप्प्याटप्प्याने तन-मन-धन यांचा त्याग कसा केला ? गुरूंनी त्यांना समष्टी साधनेची शिकवण कशी दिली ?’, इत्यादी अनेक पैलूंच्या बारकाव्यांनिशी लिहिलेले बहुधा कुठे आढळत नाही. साधकांना ही माहिती त्यांच्या साधनेतील शीघ्र प्रगतीसाठी लाभदायक ठरते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या ‘साधनाप्रवास’ या ग्रंथमालिकेतून हा उद्देश निश्चितच साध्य होईल.

३. परात्पर गुरु डॉक्टरांनी लिहिलेल्या साधनाप्रवासाच्या निमित्ताने त्यांच्या काही गुणांचे घडलेले दर्शन !
३ अ. जिज्ञासा आणि संशोधक वृत्ती : सर्वसाधारणपणे साधक किंवा शिष्य गुरूंना प्रश्न विचारत नाहीत; केवळ त्यांनी सांगितलेले ऐकतात. परात्पर गुरु डॉक्टर गुर्वाज्ञापालनासह त्यांच्यातील जिज्ञासेमुळे गुरूंना अध्यात्मातील अनेक प्रश्न विचारून पुष्कळ शिकत असत. त्यांच्यातील संशोधक वृत्तीमुळेही ते अध्यात्मातील अनेक तत्त्वे शिकू शकले. अर्थातच याचा उपयोग त्यांना समष्टीला अध्यात्मशास्त्र शिकवण्यासाठीही करता आला.
३ आ. चिंतनशील वृत्ती : परात्पर गुरु डॉक्टर साधकावस्थेत असतांना प्रत्येक प्रसंगाचा बुद्धीने विश्लेषणात्मक अभ्यास करत, तसेच त्या वेळी स्वतःच्या मनाचाही अभ्यास करत. त्यातून त्यांना साधनेचे वेगवेगळे पैलू उलगडत असत. याचे एक उदाहरण याप्रमाणे आहे. परात्पर गुरु डॉक्टरांना गुरुप्राप्तीच्या आधीपासूनच विविध संतांनी अध्यात्म शिकवले आणि त्यांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षणही केले. यासंदर्भात परात्पर गुरु डॉक्टर सांगतात, ‘संतांनी मला अध्यात्म शिकवणे आणि माझे संकटांपासून रक्षण करणे, हे सर्व गुरूंनीच केले होते, हे मला फार वर्षांनी एकदा गुरु सहज बोलून गेलेल्या पुढील वाक्यावरून समजले- ‘‘तुमचे गुरु थोर म्हणून तुम्ही हे सर्व शिकलात आणि (वाईट शक्तींपासून) वाचलात !’’ परात्पर गुरु डॉक्टरांच्या अशा चिंतनशील वृत्तीची अनेक उदाहरणे या ग्रंथमालिकेत दिली आहेत. यावरून साधकांना ‘साधनेविषयीचे चिंतन कसे करायचे?’, याचा उत्तम बोध होईल.
३ इ. सूत्रांच्या तत्परतेने नोंदी करणे : वर्ष २०११ मध्ये एकदा मी परात्पर गुरु डॉक्टरांच्या खोलीत त्यांना सेवेच्या संदर्भातील शंका विचारण्यासाठी गेलो होतो. त्या वेळी ते स्नानाला जात असतांना कागद-लेखणी सोबत घेऊन जात होते. याचे मला आश्चर्य वाटल्याचे त्यांना समजल्यावर ते मला म्हणाले, ‘‘अंघोळ करतांना काही सुचले, तर लगेच लिहून ठेवतो; नाही तर नंतर विसरायला होते.’’
४. साधकांच्या अंतःकरणात साधनेची शिकवण खोलवर बिंबवणारी ग्रंथमालिका !
परात्पर गुरु डॉक्टर गुरूंकडून जे शिकायचे, ते स्वतः आचरणात आणायचेच; पण साधकांकडूनही ते तसे आचरण करवून घ्यायचे. याचे एक उदाहरण याप्रमाणे आहे. एकदा परात्पर गुरु डॉक्टर गुरूंच्या आश्रमात गेले असता गुरूंनी त्यांना सांगितले, ‘‘आश्रमाची झाडलोट करा.’’ याप्रमाणे केल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या मनात प्रथमच ‘आपला आश्रम’ही भावना निर्माण झाली. त्यानंतर पुढे प्रत्येक वेळी परात्पर गुरु डॉक्टर गुरूंच्या आश्रमात किंवा गुरुपौर्णिमादी उत्सवांना गेल्यावर तेथील स्वच्छता, आवराआवर आवर्जून करत असत. काही काळाने परात्पर गुरु डॉक्टरांनी सनातनचे आश्रम स्थापन केले. तेथे साधकांमध्येही त्यांनी हा गुण रुजवला आहे.
संत किंवा गुरु यांच्याकडून जे शिकायला मिळते, ते तंतोतंत आचरणात आणतो, तोच खरा सत्शिष्य ! परात्पर गुरु डॉक्टर सत्शिष्य असल्यानेच अल्पावधीत गुरुकृपेस पात्र ठरून पुढे ‘परात्पर गुरु’ अशी उच्च आध्यात्मिक स्थिती प्राप्त करू शकले. अशा थोर विभूतीमत्वाची वाणी आणि लिखाण यांत स्वाभाविकच चैतन्य येते.’
– (पू.) संदीप आळशी, सनातनच्या ग्रंथांचे संकलक (मे २०२२)
खंड २ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेली गुरुसेवा व त्यांचे शिष्यत्व
ग्रंथाचे मनोगत
‘शिष्य डॉ. जयंत आठवले यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज (प.पू. बाबा) नेहमी सांगत, ‘संतांना लुटायच्या दोन गोष्टी आहेत – नाम आणि सेवा !’ डॉ. आठवले यांनी गुरूंकडून या दोन गोष्टींची भरपूर लयलूट केली; कारण गुरूंच्या सहवासात त्यांचा अखंड नामजप होत असे आणि ‘नेमले या चित्ता तुझ्या सेवे नाथा । नुरे कार्य आता आणिक ते ।।’, ही त्यांची वृत्तीच बनली होती ! त्यांनी गुरुचरणी तन-मन-धन अर्पून परिपूर्ण सेवा केली; म्हणूनच गुरूंनीही त्यांना म्हटले, ‘डॉक्टर, मी तुम्हाला ज्ञान, भक्ती आणि वैराग्य दिले !’
डॉ. आठवले गुरूंकडे गेल्यावर तेथील शौचालयांची स्वच्छता करण्यापासून गुरूंचे पथ्य-पाणी सांभाळण्यापर्यंतच्या सर्व प्रकारच्या सेवा तहान-भूक विसरून करायचे. ते गुरु सांगतील ते तात्काळ करायचेच; पण ‘जाणूनी श्री गुरूंचे मनोगत’, या भावानेही अनेक सेवा स्वतःहून यथायोग्य करायचे. यासाठी प.पू बाबांना ते नेहमी जवळ लागायचे. गुरुसेवा करतांना त्यांच्यात असलेली गुरुसेवेची तळमळ, भाव, प्रीती, नेतृत्व, व्यापकता अशा विविध गुणांचे दर्शन या ग्रंथातून होते. त्यांनी केवळ स्वतःच गुरुसेवा केली नाही, तर साधकांनाही सेवेची संधी दिली; इतकेच नव्हे, तर त्यांनाही सेवेच्या माध्यमातून घडवले.
शिष्य जेव्हा आपले तन-मन-धन गुरूंना अर्पण करतो, तेव्हा त्याच्या मालकीची प्रत्येक वस्तू, इतकेच नव्हे, तर त्याच्या मनातील प्रत्येक विचारही गुरूंचाच असतो. डॉक्टरांचीही स्थिती अशी असायची. त्यांच्या मनातील प्रत्येक विचार हा प.पू. बाबांचाच असल्याची प्रचीती त्यांना येत असे. यावरून ‘डॉक्टरांचे शिष्यत्व किती उच्च कोटीचे होते’, हे लक्षात येते. त्यांच्या शिष्यत्वाच्या विविध छटा दर्शवणारा हा ग्रंथ साधकांना ‘आदर्श शिष्य’ बनण्यासाठी लाखमोलाचा आहे.
एक आदर्श शिष्यच गुरूंच्या कार्याचे दायित्व परिपूर्णरित्या सांभाळू शकतो. प.पू. बाबांचे गुरुपौर्णिमा महोत्सव, अमृत महोत्सव यांसारख्या मोठमोठ्या सेवांचे दायित्व डॉक्टर एवढे उत्तम सांभाळायचे की, त्या सर्व सेवा अगदी चोख होत असत. गुरूंची शिकवण समष्टीपर्यंत पोचवण्याची विलक्षण तळमळ आणि त्यासाठी कोणतेही कष्ट घेण्याची डॉक्टरांची जिद्द यांतून लक्षात येत असे. त्यामुळे प.पू. बाबा डॉक्टरांवर पुष्कळ प्रसन्न होत असत, त्यांचे जाहीररित्या कौतुक करत असत आणि त्यांना कार्यासाठी आशीर्वादही देत असत. गुरूंच्या आशीर्वादामुळे डॉक्टरांची अल्पावधीतच पुष्कळ आध्यात्मिक उन्नती झाली आणि त्यांनी आरंभलेल्या अध्यात्मप्रसारकार्याचा वेलू आज जणू गगनाला भिडत आहे ! अशा शिष्यरूपातील डॉ. आठवले यांचा हा साधनाप्रवास सर्वच साधकांसाठी साधनापथावरील दीपस्तंभच आहे !’
– (पू.) संदीप आळशी (२.९.२०२२)
खंड ३ : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार
ग्रंथाचे मनोगत
‘आपणासारिखे करिती तात्काळ । नाहीं काळ वेळ मग त्यासी ।।’, अशी श्री गुरूंची महती वर्णिली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी डॉ. आठवले यांचा ‘शिष्य’ म्हणून स्वीकार केल्यानंतर अल्पावधीतच त्यांना ‘आपणासारिखे’ केले ! अवघ्या ३ वर्षांनीच गुरु सर्वांसमोर डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक अधिकाराचे कोडकौतुक गायला लागले. हे अधिकार, तसेच गुरु अन् काही संत यांनी डॉ. आठवले यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गारही प्रस्तुत ग्रंथात दिले आहेत. काही अन्य पंथीय संतांनीही त्यांचे आध्यात्मिक सामर्थ्य ओळखून त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे, हेही विशेष ! यावरून डॉ. आठवले यांच्या असामान्य आध्यात्मिक विभूतीमत्वाचा परिचय होतो.
गुरूंचे आशीर्वादच शिष्याचे सामर्थ्य आणि कीर्ती वाढवतात. यामुळे आजही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अखिल मानवजातीच्या उद्धारासाठी धर्मसंस्थापनेचे, म्हणजेच हिंदु राष्ट्र-स्थापनेचे दिव्य कार्य करत आहेत. इतकेच नव्हे, तर हे कार्य करणारे सहस्रो साधकही ते घडवत आहेत ! हे त्यांचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. शिष्याला गुरूंचे आशीर्वाद लाभण्यासाठी शिष्याची साधनाही तशीच तोलामोलाची असावी लागते. गुरूंप्रती समर्पितभाव, गुरुकार्याची पराकोटीची तळमळ, समष्टी कल्याणाचा व्यापक विचार इत्यादी गुणांचा समुच्चय शिष्यात असावा लागतो. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमध्ये हे गुण असल्यामुळे त्यांना गुरूंचे आशीर्वाद लाभले आणि ते फलद्रूपही झाले ! यावरून त्यांची साधना किती उच्च श्रेणीची होती, हे लक्षात येते. त्यांनी केलेली व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा संक्षिप्त गोषवाराही ग्रंथात मांडला आहे.
आतापर्यंत अनेक संत-महात्मे होऊन गेले. साधकावस्थेपासून ब्रह्मपदाच्या प्राप्तीपर्यंतच्या त्यांच्या साधनाप्रवासात त्यांच्या आंतरिक अवस्थांमध्ये घडलेले पालट, त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीचे मोजमापन इत्यादी इतरांना काहीच कळू शकले नाही. संत अहंविरहित असल्याने स्वतःहून हे सर्व सांगतही नाहीत. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी मात्र साधकांना हे सर्व शिकता यावे, यासाठी ‘स्वतःच्या उन्नतीचे मोजमापन करता येईल’, अशी सूत्रे त्यांच्या साधकावस्थेपासून नोंद करून ठेवली, तसेच यासंदर्भात त्यांनी पुढे सनातनच्या ज्ञान-प्राप्तकर्त्या साधकांकडून जाणूनही घेतले. ही सर्व अमूल्य माहितीही या ग्रंथात अंतर्भूत आहे. हे या ग्रंथाचे निराळेपण आहे.
सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा जन्म जणू केवळ साधकांच्या उद्धारासाठीच झालेला आहे. त्यांच्यासारखे गुरु आज संपूर्ण पृथ्वीवर शोधूनही सापडणार नाहीत. ‘गुरु हाच भगवंत आहे. गुरूंसाठीच माझा जन्म आहे’, असा भाव साधकांनी ठेवून त्यांच्या मार्गदर्शनानुसार साधना केल्यास साधकांचे घोर आपत्काळातही रक्षण तर होईलच, तसेच साधक मोक्षासही जातील. या ग्रंथाच्या माध्यमातून ‘सर्वांनाच अशी तळमळीने साधना करण्याची बुद्धी आणि प्रेरणा होवो’, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !’
– (पू.) संदीप आळशी (१२.११.२०२२)
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७ |