असे तोडले जाणार पाकिस्तानचे पाणी !

भारताने पाकिस्तान समवेत गेली ६५ वर्षे अस्तित्वात असलेला ‘सिंधु जल करार’ २५ एप्रिल या दिवशी स्थगित केला आहे. या कराराला स्थगिती देण्याविषयी किंवा तो संपुष्टात आणण्याविषयी तत्कालीन पंतप्रधान आणि काँग्रेस नेते पंडित नेहरू यांनी त्यात कोणतेही कलमच न घातल्यामुळे तो रहित करण्यासाठी आता एखादी घोषणाही पुरेशी आहे. तीसुद्धा कालांतराने होईलच; पण सध्या तरी जाणकारांकडून ‘पाकिस्तानशी युद्ध चालू करणारे भारताकडून उचलले गेलेले हे पहिले पाऊल आहे’, असे मानले जात आहे.

१. ‘सिंधु जल करार’ आणि तो स्थगित केल्याने पाकवर होणारे परिणाम

हा करार करण्यासंबंधीच्या वाटाघाटी म्हणे तब्बल ९ वर्षे चालू होत्या. अखेरीस जागतिक बँकेच्या मध्यस्थीने वर्ष १९६० च्या अखेरीस या करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. त्यासाठी पंतप्रधान नेहरू स्वतः कराचीला गेले होते. या कराराप्रमाणे ‘भारतातून पाकिस्तानात वहाणार्‍या सिंधु, झेलम आणि चिनाब या ३ पश्चिमी नद्यांचे ८० टक्के पाणी पाकला देण्यात येणार होते अन् भारत केवळ २० टक्के पाणीच वापरू शकेल’, असा करार झाला होता. भारतात वहाणार्‍या सतलज, बियास आणि रावी या नद्यांचे पाणी मात्र भारत पूर्णपणे वापरू शकणार होता. ‘आपण किती उदार आहोत’, हे दाखवण्याच्या अट्टहासापोटी नेहरूंनी या पाकिस्तानच्या लाभाच्या करारावर घाईघाईत स्वाक्षरी केली होती’, असे आज म्हटले जाते. हा करार मोदी सरकारने स्थगित केल्यावर पाकिस्तानात मोठीच खळबळ उडाली आहे आणि सर्व पाकिस्तानी नेते भारताला शिव्या देत आहेत; कारण पाकमधील शेतीपैकी किमान ६५ टक्के शेती अन् ३५ टक्के वीज उत्पादन या पाण्यावर अवलंबून आहे. याखेरीज त्यांचे पिण्याचे पाणीही यामुळे तुटणार आहे. परिणामी पाकिस्तान पूर्णपणे भिकेला लागून त्यांचा ‘जीडीपी’ही (सकल देशांतर्गत उत्पादन) तब्बल दीड टक्क्याने घटणार आहे.

२. भारताने करायच्या काही तातडीच्या आणि टप्प्याटप्प्याने पार पाडायच्या उपाययोजना

‘भारत पाकिस्तानचे पाणी तोडणार’, याचा अर्थ ‘एखाद्या धरणाची दारे बंद करून उद्यापासून तडकाफडकी पाणी बंद करणार’, असा अनेकांचा समज झाला आहे; पण ते तसे नाही. केंद्रीय जल आयोगाचे माजी अध्यक्ष कुशविंदर वोहरा यांनी ‘एन्.डी.टीव्ही‘, ‘आजतक’ वगैरे वृत्तवाहिन्यांना मुलाखती देऊन ‘भारत हे कसे करू शकेल’, हे स्पष्ट केले आहे. यात काही तातडीच्या, तर काही टप्प्याटप्प्याने पार पाडल्या जाणार्‍या उपाययोजना असतील, त्या येथे देत आहे.

२ अ. तातडीच्या उपाययोजना

२ अ १. या कराराप्रमाणे भारताला स्वतःची पाणी साठवण क्षमता कायम मर्यादेत ठेवत पाकिस्तानला त्याची वेळोवेळी माहिती द्यावी लागत होती. आता ही मर्यादा पाळण्याचे बंधन भारतावर रहाणार नाही आणि भारत अधिक पाणी साठवून ठेवू शकेल.

२ अ २. पाकिस्तानात जाणार्‍या तीनही नद्यांवर २०टक्क्यांपेक्षाही न्यून पाणी साठवणारी भारतात जी धरणे आहेत, त्यातील गाळ आधुनिक तंत्रज्ञान वापरून काढला जाईल आणि भिंतींची उंची वाढवून जलसाठा क्षमता अधिकच वाढवण्यात येईल.

२ आ. टप्प्याटप्प्याने कार्यवाहीत येणार्‍या उपाययोजना

२ आ १. ही स्थगिती किंवा उपाययोजना अल्प काळासाठी नसून किमान पुढल्या ५० वर्षांपर्यंत चालणारी असेल. मग भारतात सरकार कुणाचेही येवो वा जावो.

२ आ २. या कराराप्रमाणे प्रत्येक पावसाळ्यात संभाव्य पूर परिस्थिती पाकिस्तानला कळवणे, हे भारतासाठी बंधनकारक होते; पण आता ते बंधन पाळण्याची आवश्यकता उरलेली नसल्यामुळे पाकिस्तानात अचानक पूर येऊन अनेक प्रदेश जलमय होऊ शकतील.

२ आ ३. या कराराप्रमाणे भारताला तीनही पश्चिमी नद्यांवर वीजनिर्मिती प्रकल्प (हायड्रोइलेक्ट्रिक प्रोजेक्ट) चालवता येणार होते. उदाहरणार्थ जम्मू-काश्मीरमध्ये चिनाब नदीवरील सलाल धरणावर असा प्रकल्प उभा आहे; मात्र त्यावर नियंत्रण राखण्यासाठी पदोपदी पाकिस्तानी तंत्रज्ञांची लेखी संमती मिळवावी लागत होती, ती आता घेण्याची आवश्यकता उरणार नाही. या तंत्रज्ञांना माघारी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे भारताला यापुढे अनियंत्रित वीजनिर्मिती करता येऊ शकेल. त्याचप्रमाणे किशनगंगा वीज प्रकल्पालाही पाकिस्तानने आक्षेप घेतल्यामुळे ठराविकच वीजनिर्मिती होऊ शकत होती, ती आता पूर्ण क्षमतेने होऊ शकेल.

२ आ ४. या कराराप्रमाणे ज्या नद्या पाकिस्तानात वहात आहेत, त्या नद्यांवर धरणे किंवा कालवे काढायचे झाल्यास भारताला पाकिस्तानची अनुमती लागत होती. उदाहरणार्थ बंदीपोरा इथे झेलम नदीवर तुलबूल धरणाच्या कामाला पाकिस्तानने आक्षेप घेतला होता; म्हणून त्या धरणाचे काम पूर्ण झालेले नाही; मात्र आता ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि पाण्याने ते तुडुंब भरले जाईल.

२ आ ५. या तीनही पश्चिमी नद्यांना नवे कालवे काढून किंवा चालू कालवे जोडून पंजाब, हरियाणा वगैरे राज्यांना पाणी पुरवता येईल. हे काम पुढील दीड-दोन वर्षांत करता येईल.

थोडक्यात हा करार स्थगित केल्यामुळे आजपासून ६ मास ते २ वर्षे या कालावधीत पाकिस्तानचे कंबरडे पूर्णपणे मोडलेले असेल, असे मानायला हरकत नसावी.

– श्री. हर्षद सरपोतदार, सनदी लेखापाल, पुणे. (२७.४.२०२५)