आदेश रहित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा
सिंधुदुर्गनगरी – नवीन शिक्षक संचमान्यता अध्यादेशाने राज्यभर खळबळ उडाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ पैकी ९१ शाळा शून्य शिक्षकी होणार असून ६० शाळा एक शिक्षकी होणार आहेत. केवळ ४७ शाळांमध्ये पुरेसे शिक्षक रहाणार आहेत. याखेरीज ७०० कार्यरत शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. त्यामुळे हा आदेश रहित करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण समन्वय समितीच्या नेतृत्वाखाली २ एप्रिल या दिवशी जिल्हाधिकारी भावनावर भव्य मोर्चा काढण्यात आला.
ओरोस येथील श्री देव रवळनाथ मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. कडाक्याचे उन असतांनाही या मोर्चात मोठ्या संख्येने संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी आदी सहभागी झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाल्यानंतर नवीन अध्यादेशामुळे सिंधुदुर्गातील शिक्षण क्षेत्रावर होणार्या परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी समन्वय समितीचे अध्यक्ष जी.एम्. सामंत म्हणाले, ‘‘जिल्ह्याला आज शिक्षणापासून वंचित रहाण्याची वेळ आलेली आहे. याला शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक हे उत्तरदायी असून ते गेल्या १५ वर्षांमध्ये शासन आणि शिक्षणमंत्री यांना चुकीचा सल्ला देत आले. त्याचे विपरीत परिणाम प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याला भोगावा लागत आहेत. महाराष्ट्र शासन चुकीचे निर्णय घेत आहे. त्यामुळे एकूण सर्व परिस्थतीचा विचार करता विद्यार्थ्यांची होणारी हानी कधीही भरून न येणारी असल्यामुळे हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.’’
मोर्चाच्या सांगतेनंतर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता त्यांच्या दालनाच्या बाहेर बराच वेळ ताटकळत रहावे लागले. त्यामुळे शिष्टमंडळ जिल्हाधिकार्यांचा निषेध करून तेथून बाहेर पडले, अशी संतप्त प्रतिक्रीया सामंत यांनी व्यक्त केली.