
कोल्हापूर, ३ मे (वार्ता.) – ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांच्या ४८ व्या पुण्यस्मरण, तसेच वैकुंठवासी श्रीगुरु भानुदास महाराज यादव यांच्या चतुर्थ पुण्यतिथी उत्सवास २८ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. हा सोहळा साकोली कॉर्नर (शिवाजी पेठ) येथील ‘श्री ज्ञानदेव सदन’ येथे होत आहे. यात प्रतिदिन सकाळी ७ ते ११ श्री ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम गाथा भजन, दुपारी ४ ते सायंकाळी ५ सामुदायिक हरिपाठ, सायंकाळी ६ ते ७ प्रवचन, तसेच रात्री ७.३० ते ९.३० या वेळेत कीर्तन होत आहे. सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ अमृतानुभव, सार्थ ज्ञानेश्वरी गाथा, सार्थ हरिपाठ, विचार सागर, एकनाथ गाथा यांसह अनेक ग्रंथ वारकरी संप्रदायाचे उर्ध्वयू ब्रह्मीभूत सद्गुरु रामचंद्र महाराज यादव यांनी लिहिले आहेत.

५ मे या दिवशी सकाळी पारायणाची सांगता होत असून सकाळी १० ते दुपारी १२ श्रीक्षेत्र देहू येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या प्रसंगी विविध लोकप्रतिनिधी आणि मान्यवर उपस्थित रहाणार असून महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ह.भ.प. महादेव यादव महाराज, ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज यादव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज यादव यांनी केले आहे.