शेतकर्यांसह बांदा बाजारपेठ उद्ध्वस्त होणार असल्याचा आरोप
सावंतवाडी – प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे बांदा बाजारपेठ विस्थापित होणार असून शेतकरी भूमीहीन आणि अल्पभूधारक होणार असल्याचे सांगून तालुक्यातील बांदा ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत या महामार्गाच्या विरोधात एकमुखी ठराव घेण्यात आला. स्थानिक आमदार दीपक केसरकर यांनी या महामार्गाला समर्थन दिल्याने त्याचे पडसाद ग्रामसभेत उमटले. प्रसंगी आमदार केसरकर यांच्या विरोधात भूमिका घेऊ, अशी चेतावणी या वेळी देण्यात आली.
उपसरपंच राजाराम उपाख्य आबा धारगळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही विशेष ग्रामसभा झाली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य राजाराम उपाख्य बाळू सावंत, जावेद खतीब, प्रशांत बांदेकर, ग्रामविस्तार अधिकारी सौ. लीला मोर्ये, तलाठी फिरोज खान, वनपाल प्रमोद सावंत आदी उपस्थित होते.
सभेच्या प्रारंभी उपसरपंच धारगळकर यांनी शक्तीपीठ महामार्गासाठी शहरातील भूमीच्या होणार्या सर्व्हेविषयी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ‘गुगल मॅपिंग’करून त्याचे सर्व्हे क्रमांक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. तिलारी उपकालवा आणि मुंबई-गोवा चौपदरी महामार्गासाठी यापूर्वी शेतकर्यांच्या भूमी संपादित करण्यात आल्या आहेत. आता पुन्हा महामार्गासाठी भूमी संपादित केल्या, तर येथील शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे या महामार्गाला आमचा तीव्र विरोध असल्याचे सभेला उपस्थित बहुतांश जणांनी सांगितले. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वत:ची भूमिका घोषित करावी, अशी मागणी करण्यात आली.
महामार्ग विरोधी कृती समितीची स्थापना
या ग्रामसभेत महामार्ग विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी सरपंच प्रियांका नाईक, तसेच अन्य सदस्य यांची निवड करण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून लढा तीव्र करण्याचा निर्धार या वेळी व्यक्त करण्यात आला, तसेच सह्यांची मोहीम राबवून महामार्गाच्या विरोधात निवेदन देण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. |
राज्यकर्त्यांकडून आलेल्या वाईट अनुभवामुळे आता जनता प्रकल्पांना विरोध करते !
कुडाळ – गेल्या २० वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग, तसेच सावंतवाडी येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कुडाळ येथील औद्योगिक वसाहत, चिपी विमानतळ, माणगांव येथील धरण, आडाळी येथील औद्योगिक वसाहत यांसह अनेक प्रकल्पांसाठी जनतेने अल्प मोबदल्यात भूमी दिल्या, तरीही एकही प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. गेल्या ३० वर्षांत राज्यकर्त्यांकडून आलेल्या वाईट अनुभवामुळे शक्तीपीठ महामार्गाला जनता विरोध करत आहे. जनतेला नको असलेले प्रकल्प लादण्यापेक्षा यापूर्वी घोषित केलेले प्रकल्प पूर्णत्वास नेणे महत्त्वाचे आहे, अशी टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी केली आहे.