सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आचरणातून डॉ. दुर्गेश सामंत यांना शिकायला मिळालेली सूत्रे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. प.पू. डॉक्टरांच्या जाहीर सभेचा प्रचार होण्यासाठी अन्य नियतकालिकात लिखाण पाठवणे

१ अ. एक साधक आणि त्याचे वडील प्रकाशित करत असलेल्या एका मासिकात लिखाण देणे : ‘वर्ष १९९६ पासून प.पू. डॉक्टरांच्या (प.पू. डॉ. आठवले यांच्या) सार्वजनिक सभा चालू झाल्या. तेव्हा त्यांचा आरंभ सांगली जिल्ह्यातून झाला. पहिली सभा विटा येथे आणि शेवटची सभा सांगली येथे झाली. साधकांनी ‘सभेचा प्रचार व्हावा आाणि सभेला पुष्कळ माणसे यावीत’, यासाठी काहीतरी करा’, असा मला आग्रह केला.

डॉ. दुर्गेश सामंत

काही मासांपूर्वी कुणीतरी प्रसारासाठी सनातन भारतीय संस्कृती संस्थेविषयीचे लिखाण डोंबिवली येथील एका स्थानिक नियतकालिकाच्या २ पानांवर छापले होते. तेथील साधकांनी त्या वर्तमानपत्राचे वितरण केले. हे वृत्त सांगलीतील साधकांना कळले. त्यामुळे काही सांगलीकरांनी प्रस्ताव मांडला की, ‘आपणही असे काही करूयाच.’ विटा येथील एक साधक श्री. राहुल कदम आणि त्यांचे वडील ‘विटा दर्शन’ हे मासिक प्रकाशित करत होते. ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या आकाराप्रमाणे ८ पानी नियतकालिक होते. श्री. राहुल कदम यांनी सांगितले, ‘‘आम्ही एखाद्या अंकात पूर्णपणे सनातनविषयीचे लिखाण छापू शकतो.’’ दिवस अगदी थोडे उरले होते. साधकांना लगेच सगळे हवे होते. माझ्यावर दडपण होते. माझ्या मनात ‘साधकांना वेळेत दिले नाही, तर ते नाखूष होतील’, असा विचार येत होता.

एकदा मी जवळच असणार्‍या किर्लोस्करवाडीला सभेचा प्रचार आणि नियोजन करण्यासाठी जात असतांना रेल्वेत मला ‘कोणत्या पानावर कोणते लिखाण छापावे ?’, याविषयी सुचले. मी रेल्वेने प्रवास करत असतांनाच सगळी सूत्रे लिहिली. साधकांनी काही विज्ञापने आणली. श्री. राहुल यांनी टंकलेखन करण्याचे आणि पुढील सेवेचे सर्व दायित्व घेतले. साधकांनी सहस्रोंच्या संख्येने अंक वितरित करायला आरंभ केला.

१ आ. प.पू. डॉक्टरांनी अंक पाहून ‘त्यात शुद्धलेखनाच्या पुष्कळ चुका आहेत’, अशा खुणा करून अंक परत पाठवणे : मी छापलेल्या अंकांपैकी एक अंक मुंबई सेवाकेंद्रात प.पू. डॉक्टरांकडे पाठवला. माझी अपेक्षा होती ‘छान केले !’ असे काहीतरी उत्तर येईल. प्रत्यक्षात त्या अंकावर अनेक खुणा होऊन तो अंक परत आला. तेव्हा प.पू. डॉक्टरांचा संदेश आला, ‘शुद्धलेखनाच्या पुष्कळ चुका !’ सगळ्या चुकांचे दायित्व माझे होते. मी त्या चुकांविषयी सत्संगात सांगितले आणि क्षमा मागितली.

१ इ. वरील प्रसंगात शिकायला मिळालेली सूत्रे

१. प.पू. डॉक्टरांनी ‘न विचारता हा उद्योग का केला ?’, असे आम्हाला विचारले नाही.

२. प.पू. डॉक्टरांनी सांगितले, ‘‘लिखाण इत्यादी सगळेच करून आम्ही इथून तुम्हाला पाठवून दिले असते.’’ यातून ‘व्यापक सद्हेतूने केलेल्या कृतीच्या ते पूर्ण पाठीशी असतात’, हे माझ्या लक्षात आले.

३. विचारून केले, तर ती कृती योग्य आणि अधिक चांगली होण्यासाठी साहाय्य मिळते; अन्यथा ‘चुकांमुळे संस्थेची प्रतिमा डागाळली जाते’, हे माझ्या लक्षात आले.

४. या प्रकरणातून मला मात्र साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा अंक आपण चालवू शकतो’, याविषयी थोडा आत्मविश्वास आला.

२. ‘आंतरिक समाधान झाले की, सेवा परिपूर्ण झाली, असे समजावे’, हे शिकवणे

मुंबई सेवाकेंद्रात असतांना माझ्याकडे जवळपास प्रतिदिन एक तरी पूर्वी कधी न केलेली नवीन सेवा येत असे. मला सगळेच पूर्णतः नवीन असायचे. मी केलेली प्रत्येक सेवा थेट प.पू. डॉक्टरांकडे पडताळायला जात असे. यातील लेखनासंबंधीच्या सेवा तर माझ्यासाठी अगदीच नवीन होत्या. त्या आधी जवळपास १५ वर्षे माझा मराठीशी संपर्क केवळ वृत्तपत्राचे वाचन करण्याइतपतच होता. एकदा प.पू. डॉक्टरांनी मला काही सूत्रे सांगून त्याची ‘सारणी बनवा’, असे सांगितले. सारणी करतांना त्यात ‘सूत्रांचे योग्य वर्गीकरण, न्यूनतम शब्दांत शब्दयोजना (वाक्यरचना)’, असे सर्व करावे लागते. मी ते करायचा प्रयत्न केला. ते लिखाण पडताळायला प.पू. डॉक्टरांकडे पाठवले. त्यात चुका-सुधारणा यांबद्दलच्या खुणा होऊन ते परत आले. मी त्या सगळ्या सुधारणा करून आणि मला सुचलेली नवीन सूत्रे त्यात लिहून मी ते परत त्यांच्याकडे पाठवले. पुन्हा ते लिखाण चुका-सुधारणा यांच्या खुणा होऊन माझ्याकडे आले. असे आणखी काही वेळा होऊन एकदाचे ते अंतिम झाले. प्रत्येक वेळी मला ‘आता झाले एकदाचे !’, असे वाटत असे. शेवटी खरोखरच सगळे झाल्यानंतर आमच्यात पुढील संवाद झाला.

प.पू. डॉक्टर : आता कसे छान वाटते कि नाही ! त्यातून स्पंदने चांगली येतात ना !

डॉ. दुर्गेश सामंत : हो. (प्रत्यक्षात त्या वेळी मला स्पंदने समजत नव्हती.) हे असे कधीपर्यंत पडताळत रहायचे ? याला काही मापदंड आहे का ?

प.पू. डॉक्टर : हो. सगळे झाल्यावर आंतरिक समाधान वाटले पाहिजे.

या शिकण्याचा लाभ मला दैनिकासाठी जे ‘फॉर्म्स’ इत्यादी बनवायचे होते, त्यासाठी झालाच; परंतु त्याहून अधिक म्हणजे काही लेखन केले किंवा एखादे चित्र अथवा अन्य काही पडताळायला आले, तेव्हा झाला. मला ‘आतून समाधान वाटत नाही’, असे जेव्हा वाटायचे, तेव्हा त्यात ‘कुठेतरी गडबड असणार’, हे माझ्या मनात यायचे आाणि नंतर त्या आधारे मी सेवा करायला शिकलो.

– डॉ. दुर्गेश सामंत (वय ६४ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२५)