पुणे येथील सौ. अर्चना चांदाेरकर यांनी मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रकर्माच्या वेळी अनुभवलेली गुरुकृपा !

‘माझे ‘मूत्रपिंड रोपण’ हे मोठे शस्त्रकर्म सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेनेच निर्विघ्नपणे पार पडले. त्या संपूर्ण प्रक्रियेत मी पदोपदी अनुभवलेली गुरुकृपा आणि गुरुदेवांनी करून घेतलेले प्रयत्न मी श्री गुरुचरणी अर्पण करते.

सौ. अर्चना चांदाेरकर

१. औषधोपचार चालू असूनही रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण वाढल्यामुळे आधुनिक वैद्यांनी मूत्रपिंड रोपण शस्त्रकर्म करण्याचे ठरवणे

ऑगस्ट २०१९ मध्ये माझा रक्तदाब वाढल्याने मला रुग्णालयात भरती व्हावे लागले. त्या वेळी ‘माझ्या शरिरातील रक्तातील ‘क्रिएटिनिन’ चे प्रमाण ३.५ इतके झाले असून दोन्ही मूत्रपिंडांचा आकार लहान झाला आहे’, असे निदान झाले. (सामान्यतः निरोगी स्त्रियांच्या रक्तातील क्रिएटिनिनचे प्रमाण अनुमाने ०.६ ते १.१ mg/dL असते. हे प्रमाण व्यक्तीचे वय, वजन आणि प्रयोगशाळा यांच्याप्रमाणे पालटू शकते.) त्या वेळी आधुनिक वैद्यांनी औषधोपचार चालू केल्यानंतर काही कालावधीनंतर क्रिएटिनिनचे प्रमाण ४.६ झाल्याने मी जानेवारी २०२२ पासून ‘नेफ्रॉलॉजिस्ट’ (मूत्रपिंडरोगतज्ञ) डॉ. अरुण तिर्लापूर यांच्याकडे ‘ॲलोपॅथी’चे औषधोपचार चालू केले. त्यांनी आम्हाला ‘मूत्रपिंड रोपण करूया’, असे सांगितले. काही दिवसांनी आधुनिक वैद्यांनी माझ्या यजमानांना ‘तुम्ही तुमचे एक मूत्रपिंड देऊ शकता’, असे सुचवले.

२. शस्त्रकर्मासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या करणे आणि त्यांचा अहवालही सकारात्मक येणे

सप्टेंबर २०२३ पर्यंत माझ्या रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण ८.५ ते ९ एवढे झाले होते. दिवसभरात उच्च रक्तदाबासाठी ३ गोळ्या घेऊनही आणि आधीपेक्षा औषधाचे प्रमाण थोडे वाढवूनही माझा रक्तदाब वाढलेला असायचा. माझ्या पायावरची सूज वाढत होती. मला पुष्कळ दम लागायचा. आधुनिक वैद्यांनी माझ्या ‘मूत्रपिंड रोपण’ शस्त्रकर्माच्या दृष्टीने ‘माझे यजमान श्री. मंदार यांच्या काही तपासण्या करून घेऊया’, असे सांगितले. यजमानांच्या सर्व तपासण्यांचे अहवाल सकारात्मक आल्यावर ‘ते एक मूत्रपिंड देण्यास शारीरिक दृष्टीने सक्षम आहेत’, असे निदान झाले. त्यानंतर आधुनिक वैद्यांनी आम्हाला सर्वांत महत्त्वाची ‘क्रॉस मॅचिंग टेस्ट’ करण्यास सांगितले. (या चाचणीत मूत्रपिंड दुसर्‍या शरिरात रोपण केल्यावर ते त्या शरिराला जुळत आहे ना ?, हे पाहिले जाते.) ५ – ६ दिवसांनी त्याचाही अहवाल सकारात्मक आला.

३. माझे शस्त्रकर्म पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात करायचे ठरले होते. तेथील शल्यविशारद निनाद देशमुख यांच्याशी बोलल्यावर माझ्या मनावरचा ताण पुष्कळ हलका झाला आणि ‘त्यांच्या माध्यमातून गुरुदेवच माझे शस्त्रकर्म करणार आहेत’, अशी माझी श्रद्धा वाढली. 

४. रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण न्यून करण्यासाठी ‘डायलिसिस’ करावे लागणे

रुग्णालयात भरती होईपर्यंत माझ्या रक्तातील ‘क्रिएटिनिन’चे प्रमाण ९.५ इतके झाले होते. शस्त्रकर्म करण्याआधी ‘क्रिएटिनिन’ न्यून होणे आवश्यक असल्याने मला ३ वेळा ‘डायलिसिस’ (टीप) करावे लागले. (टीप : डायलिसिस : मूत्रपिंडाची कार्यक्षमता न्यून झाल्यामुळे रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया) ‘डायलिसिस’ होतांना वेदना नसतात, तरीही मला पुष्कळ भीती वाटून ताण येत होता. त्या वेळी ‘गुरुदेवांना रडणारे नाही, तर लढणारे साधक आवडतात’, या वाक्याचे मला स्मरण होत होते.

५. संतांचा लाभलेला आधार !

अ. मी माझ्या स्थितीविषयी पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत, वय ४३ वर्षे ) यांना भ्रमणभाषवर संदेश पाठवून कळवले. पू. मनीषाताईंनी मला ‘ही पुष्कळ मोठी गुरुकृपा आहे. तुझ्या यजमानांचा पुष्कळ मोठा त्याग आहे’, असा संदेश पाठवला. तो वाचल्यावर मला यजमानांविषयी कृतज्ञता वाटू लागली.

आ. सौ. ज्योती दाते (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे) यांनी पू. दातेआजींना (पू. (श्रीमती) निर्मला दाते, सनातनच्या ४८ व्या संत, वय ९१ वर्षे यांना) माझ्या शस्त्रकर्माविषयी सांगितले. एक दिवस पू. दातेआजींनी मला ‘सर्व काही गुरुदेवांवर सोपवा आणि निश्चिंत रहा’, असे प्रेमाने सांगितले.

अशा प्रकारे मला वेळोवेळी संतांचे प्रेम आणि सत्संग मिळाल्याने आधार वाटला.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे अस्तित्व जाणवणे 

अ. रुग्णालयात जाण्यासाठी घरातून बाहेर पडताच माझा आपोआप ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊली’ असा भावपूर्ण नामजप चालू झाला. ‘गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) सतत माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवत होते.

आ. मी ‘सूक्ष्मातून रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात जाऊन गुरुदेवांशी बोलत आहे. त्यांना सर्व सांगत आहे’, असा भावजागृतीचा प्रयोग करत असे. पू. मनीषाताईंनी मला गुरुदेवांना आत्मनिवेदन करायला सांगितले. तेव्हा मी मनातील विचार गुरुदेवांना आत्मनिवेदन करू लागले. त्या वेळी मला हलके वाटले.

इ. एकदा मी भावजागृतीचा प्रयोग करत होते. तेव्हा ‘गुरुदेवांकडून प्रक्षेपित होणारे चैतन्य माझ्याकडे येत आहे. गुरुदेवांनी माझा हात धरला आहे’, असे मला जाणवले. नंतर मला भूमीवर केवळ गुरुदेवांचीच पावले दिसू लागली. त्या वेळी ‘गुरुदेवांनी मला अलगद उचलून घेतले आहे’, असे जाणवले. त्यामुळे ‘अत्यंत कठीण वाटणारा हा प्रवास गुरुदेवांच्या कृपेने सुकर होत आहे’, असे मला जाणवले.

७. सेवेच्या माध्यमातून गुरुकृपा अनुभवता येणे

त्याही काळात ‘विज्ञापने मिळवणे आणि सनातन पंचांगांशी संबंधित सेवा करणे’ या सेवांच्या माध्यमातून मला गुरुकृपा अनुभवायला येत होती. मी रुग्णालयात भरती होण्याच्या आदल्या दिवसापर्यंत सेवा करत होते.

‘गुरुदेवांनी मला सेवेत आणि साधकांच्या सान्निध्यात ठेवले अन् शस्त्रकर्माच्या सर्व प्रक्रियेला सामोरे जाण्याची सिद्धता करून घेतली’, त्याबद्दल मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’

– सौ. अर्चना चांदोरकर, बिबवेवाडी, पुणे. (२२.१२.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक