
आळंदी (जिल्हा पुणे) – आळंदी हे तीर्थक्षेत्र भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील पवित्र इंद्रायणी नदीला जल प्रदूषणासह जलपर्णीचा विळखा पडला असून जलपर्णी समस्या ‘जैसे थे’ आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातून थेट रसायन आणि मैला मिश्रित सांडपाणी सोडले जात असल्याने नदी पांढर्या फेसाने पुन्हा एकदा फेसाळली आहे. सध्या आळंदीत चालू असलेल्या हरिनाम सप्ताहाच्या अनुषंगाने प्रभावी स्वच्छता, उपाययोजनेकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर, तसेच राज्यशासनाच्या धोरणावर वारकरी आणि भाविक ताशेरे ओढत आहेत. इंद्रायणी घाटाची तोडफोड केल्याने घाटाची विद्रूपता वाढली असून वारकरी संस्थांनी शासनाचा निषेधही केला आहे; मात्र याकडे शासनाची डोळेझाक होत असून इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्तीसाठी होणारे प्रयत्न विविध सेवाभावी संस्थांनी आंदोलने चालू करून वाढवले आहेत. (अशा वेळी पर्यावरणवादी कुठे जातात ? – संपादक)
‘आळंदी जनहित फाऊंडेशन’चे मुख्यमंत्र्यांना साकडे !
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून इंद्रायणी नदीचे वाढते प्रदूषण रोखण्याची उपाययोजना करण्याच्या मागणीसह नदीचे प्रदूषण रोखण्याची मागणी ‘देहू रानजाई प्रकल्पा’चे प्रमुख सोमनाथ आबा, ‘नमामि इंद्रायणी प्रतिष्ठान’चे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, ‘आळंदी जनहित फाऊंडेशन’चे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांना निवेदने देण्यात आली आहेत; मात्र पुणे जिल्हा प्रशासनाचे नदीचे प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? प्रशासनाने स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे. न्यायालयीन यंत्रणा, पोलीस यांनी एकत्र येऊन प्रदूषण करणार्यांच्या विरोधात कारवाई करायला हवी. केवळ इंद्रायणीच नव्हे, तर देशातील सर्वच नद्यांच्या संदर्भात अशी कठोर दंडात्मक भूमिका घेतली, तर पुढे होणार्या प्रदूषणाला आळा घालता येईल ! – संपादक)
राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दुर्लक्ष केल्यामुळे नदीप्रदूषण वाढले !पिंपरी-चिंचवड महापालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अंकुश प्रदूषण करणार्या घटकांवर राहिला नसल्याने नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. आळंदीला पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्रात येणारे पाणीही प्रचंड प्रदूषित झाल्याने आळंदी नगर परिषदेस अखेर भामा आसखेडच्या पाण्याची मागणी करून शुद्धीकरण यंत्रणेवरील ताण अल्प करावा लागला. देखभाल दुरुस्तीअभावी नदीवरील भक्त पुंडलिक मंदिराच्या परिसरात पाणी साठवण्यावर बंधारा गळतीने मर्यादा आली आहे. |