Goa Stampede Tragedy : शिरगाव (गोवा) येथील श्री लईराईदेवीच्या जत्रेत चेंगराचेंगरी : ६ जणांचा मृत्यू, ८० घायाळ

पणजी – शिरगाव, गोवा येथील श्री लईराईदेवीच्या प्रसिद्ध जत्रेत चेंगराचेंगरी होऊन ६ जणांचा मृत्यू झाला, तर जवळजवळ ८० भाविक घायाळ झाले. मृत झालेल्यांची नावे सूर्या मयेकर (सांखळी), आदित्य कवठणकर आणि तनुजा कवठणकर (अवचीतवाडो, थिवी); यशवंत केरकर (माडेल, थिवी), प्रतिभा कळंगुटकर (कुंभारजुवे) आणि सागर नंदरगे (माठवाडा, पिळगाव), अशी आहेत. या दुर्घटनेत घायाळ झालेल्या भाविकांवर गोव्यातील विविध रुग्णालयांत उपचार चालू आहेत. या दुर्घटनेत अनुमाने १५ जण गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार चालू आहेत. यांपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना ३ मे या दिवशी पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. उपलब्ध माहितीनुसार जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी पकडलेल्या दोरखंडात काही भाविकांचा पाय अडकला आणि ते खाली पडले. त्यानंतर मागून आलेले भाविक त्यांच्या अंगावर पडल्याने गुदमरून काही जणांचा मृत्यू झाला.

शिरगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. शिरगाव येथील घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत या घटनेविषयी त्यांनी दु:ख व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, तसेच विविध रुग्णालयांत भेट देऊन तेथे उपचार घेणार्‍या भाविकांची विचारपूस केली. पुढील ३ दिवसांसाठी सर्व शासकीय कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. या दुर्घटनेचे उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक अन्वेषण करतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले दु:ख !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिरगाव (गोवा) येथील जत्रेत चेंगराचेंगरी होऊन काही जणांचा मृत्यू झाल्याचे ऐकून दु:ख व्यक्त केले. ‘ज्यांचे प्रियजन मृत्युमुखी पडले आहेत, त्या कुटुंबांच्या दु:खात मी सहभागी आहे. यामध्ये घायाळ झालेले लवकर बरे होवोत. या दुर्घटनेची झळ बसलेल्यांना स्थानिक प्रशासन साहाय्य करत आहे’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

प्रशासन नाही, तर दुर्घटनेस ‘धोंड’ उत्तरदायी ! – मंदिर समिती

(‘धोंड’ म्हणजे श्री लईराईदेवीचे व्रतस्थ भक्तगण)

प्रमोद सावंत

श्री लईराई मंदिराच्या समितीने घडलेल्या दुर्घटनेस धोंडांना उत्तरदायी धरले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमवेत प्रसारमाध्यमांशी बोलतांना मंदिर समितीचे अध्यक्ष दीनानाथ गावकर म्हणाले की, अनियंत्रित झालेल्या धोंडांमुळे चेंगराचेंगरी झाली. या गोंधळासाठी सरकार, पोलीस विभाग किंवा मंदिर समिती कोणत्याही प्रकारे उत्तरदायी नाही. काही प्रत्यक्षदर्शींच्या मतेही धोंड तळ्यावर अंघोळ करून निखार्‍यांवरून धावत जाण्याऐवजी भक्तांच्या अंगावर धावून गेले.

आवश्यकता भासल्यास बाहेरून डॉक्टरांना बोलावण्याची सिद्धता ! – आरोग्यमंत्री विश्वजीत राणे


चेंगराचेंगरीत घायाळ झालेल्यांवर योग्य उपचार चालू आहेत. आवश्यकता भासल्यास बाहेरून डॉक्टरांना बोलावण्याची आम्ही सिद्धता ठेवली आहे, असे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, डिचोलीचे आमदार शेट्ये, मंत्री नीळकंठ हळर्णकर, जिल्हाधिकारी स्नेहा गीते यांनी रुग्णालयांत भेट देऊन घायाळ भाविकांची विचारपूस केली.

विरोधी पक्षांकडून चौकशीची मागणी

या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणीही विरोधकांनी केली आहे. गोवा फॉरवर्डचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी या घटनेसाठी प्रशासनाला उत्तरदायी धरले आहे. ते म्हणाले की, जत्रेच्या ठिकाणी १ सहस्रांहून अधिक पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले होते आणि गर्दी नियंत्रित करण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला होता, तरी अशी घटना कशी घडली ? प्रत्येक मृताच्या नातेवाइकांना सरकारने १ कोटी रुपये द्यावेत.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांचे स्थानांतर !

शिरगाव जत्रेतील चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी स्नेहा गीते, पोलीस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे पोलीस उपअधीक्षक जीवबा दळवी आणि पोलीस निरीक्षक दिनेश गडेकर यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. राहुल गुप्ता (आय.पी.एस्.) यांच्याकडे उत्तर गोवा पोलीस अधीक्षकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.

संदीप जॅकीस यांच्या नेतृत्वाखाली अन्वेषण समितीची स्थापना !

शिरगाव जत्रेतील चेंगराचेंगरीचे अन्वेषण करण्यासाठी संदीप जॅकीस (आय.ए. एस्.) यांच्या नेतृत्वाखाली विशेष उच्चस्तरीय सत्यशोधन समितीची स्थापना करण्यात आली आहे.

मृतांच्या कुटुंबियांना १० लाख, तर गंभीररित्या घायाळ झालेल्यांना १ लाख रुपयांचे साहाय्य ! – मुख्यमंत्री

शिरगाव दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या  कुटुंबियांना १० लाख रुपये, तर गंभीररित्या घायाळ झालेल्यांना १ लाख रुपयांचे साहाय्य देण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे.