|
रत्नागिरी – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्यामुळे आमची अयोध्या यात्रा अत्यंत सुरक्षित आणि सुखरूप झाली. समाज कल्याण विभागाने अत्यंत चांगली सोय केल्याचे सांगून रत्नागिरीत परतलेल्या यात्रेकरूंनी पालकमंत्र्यांसह प्रशासनाचे आभार मानले.
मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील ८०० ज्येष्ठ नागरिकांना घेऊन, २६ एप्रिल या दिवशी कोकणातील पहिली रेल्वे अयोध्येकडे गेली होती. प्रभु श्री रामचंद्रांचे दर्शन घेवून, ही रेल्वे ज्येष्ठ यात्रेकरूंना सुखरूपपणे घेवून १ मे या दिवशी रत्नागिरीत परतली. समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे, गृहपाल विनोद देसाई, रवींद्र कुमठेकर आदींनी उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले.
‘आपल्या घरातील मंडळी अयोध्येला जात असल्याने, त्यांना चांगली वागणूक ही सर्व ज्येष्ठांना मिळाली पाहिजे. कुठच्याही ज्येष्ठ नागरिकाला त्रास होणार नाही, त्यांना कोणतीही कमतरता भासणार नाही, याची काळजी अधिकारी, कर्मचार्यांनी घ्यावी’, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगून, सुरक्षित जा, सुरक्षित या, अशा शुभेच्छा दिल्या होत्या.
प्रतिक्रिया –१. सुनील ठाकूर, कारवांची वाडी – राज्यशासनाकडून, विभागाच्या आधिकार्यांकडून रहाण्याची, जेवणाची, प्रवासाची अत्यंत चांगली सोय केली होती. त्याबद्दल त्यांचे आभार ! २. कस्तुरबाई गोंधळी, पाली – प्रवासात काहीच त्रास झाला नाही. मंदिर परिसर फिरून दाखवले, दर्शन चांगले झाले. आम्हाला व्यवस्थित नेले आणि आणले. ३. उल्हास खडपे, राजापूर – ज्या वेळी आम्हाला कसलींही आवश्यकता भासायची त्या, त्या वेळी कर्मचारी उपस्थित असत. शासनाचे मनःपूर्वक आभार..! ४. कु. प्रेरणा चव्हाण, प्रशिक्षणार्थी – या तीर्थ दर्शन प्रवासात घरातल्याच आजी-आजोबांसमवेतचा अनुभव मिळाला. पुष्कळ आनंद झाला. हा आयुष्यातील पहिल्यांदाच अनुभव आला. ज्येष्ठांची कशी काळजी घ्यावी ? हे शिकायला मिळाले. ५. सागर खडपे , राजापूर – वडिलांमुळे मलाही या योजनेचा लाभ मिळाला. ही योजना छान आहे. ज्येष्ठांना अशक्यप्राय असणारी यात्रा या योजनेमुळे शक्य झाली. समाज कल्याण कर्मचार्यांनी आतिशय चांगली काळजी ज्येष्ठांची घेतली. ६. राजेंद्र कदम, देवरुख (आंगवली मार्लेश्वर) – अयोध्या यात्रा सुरेख झाली. नियोजन उत्तम होते. प्रवास छान झाला. पालकमंत्री उदय सामंत यांचे विशेष आभार मानतो |