पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ पुणे येथील ज्ञान प्रबोधिनीमध्ये निषेध सभा !

‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये सभेसाठी उपस्थित नागरिक

पुणे – पहलगाम येथील क्रूर आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर ‘ज्ञान प्रबोधिनी’मध्ये २४ एप्रिल या दिवशी निषेध सभा झाली. सभेमध्ये ४०० हून अधिक नागरिक ज्ञान प्रबोधिनीतील उपासना सभागृहात एकत्र जमले होते. सर्वांनी आक्रमणात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली, काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला आणि भारताच्या नकाशावर स्वत:चे विचार लिहून राष्ट्रीय एकात्मतेशी स्वत:चे नाते दृढ केले. या वेळी ‘ज्ञान प्रबोधिनी’चे ज्येष्ठ कार्यकर्ते सचिन गाडगीळ, सहकार्यवाह आशुतोष बारमुख, तसेच स्वप्नील इंदापूरकर यांचे मार्गदर्शन झाले.

भारताच्या नकाशावर स्वत:चे विचार लिहितांना एक नागरिक

प्रबोधिनीचे कार्यकर्ते स्वप्नील इंदापूरकर यांनी ‘आक्रमण करणारे संपले, तरी विचार संपत नाही, हिंसक आणि असंस्कृत विचारांचा पूर्ण नाश आवश्यक आहे’, असे सांगितले. सभेचा आरंभ ‘भारत के जवानो’ या जोशपूर्ण गीताने झाला. राष्ट्रीय ऐक्याच्या दृष्टीने देशविघातक कृत्यांना सामूहिक विरोध करणे, शत्रूबोध असणे, ‘आम्हास काय त्याचे’, या विचारातून बाहेर येणे, शिवछत्रपतींचा वारसा चालवण्याचा प्रयत्न करणे, याविषयी सामूहिक प्रतिज्ञा सर्वांनी केली आणि शेवटी राष्ट्रगीताने सभा समाप्त झाली.