सौर कृषी योजनेसाठी सहस्रो एकरवरील वृक्षतोड !

वृक्षतोड करण्यासाठी संबंधित विभागांकडून तातडीने अनुमती

राजगुरुनगर – शेतकर्‍यांच्या कृषी पंपासाठी दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना’ राबवण्यात येत आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी पुणे जिल्ह्यासह राज्यातील सर्वत्र ठिकाणी सहस्रो एकरांवरील जुनी झाडे तोडली जात आहेत, असे चित्र दिसून येत आहे. त्यासाठी शासन आणि प्रशासकीय यंत्रणा यांकडून सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील हिवरे येथे हा प्रकल्प उभारण्यासाठी गायरान भूमीतील जंगल भुईसपाट करण्यात आले. खेड तालुक्यातील पांगरी येथील ६ ते ७ हेक्टरवरील सामाजिक वनीकरण क्षेत्रातील वृक्षतोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकल्पासाठी गाव पातळीवरील खासगी अथवा सरकारी जागेचा उपयोग केला जात आहे.

जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकारी या योजनेचे प्रमुख असल्याने प्रस्ताव प्रविष्ट केल्यानंतर सर्व पातळीवर तातडीने निर्णय घेतले जात आहेत. सौर उर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गावातील सहस्रो एकर भूमीचे सपाटीकरण करण्यात येत आहे.

काही ठिकाणी या प्रकल्पासाठी विरोध करण्यात येत आहे. त्यानंतर दुसरी जागा शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. अनेक ठिकाणी झाडे तोडण्यासाठी ग्रामपंचायत, वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडून अनुमती दिली जात आहे.