आता पाकिस्तानसमवेत युद्ध करण्याची वेळ आली आहे ! – शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते

श्री. शरद पोंक्षे

कोल्हापूर, २ मे (वार्ता.) – आता पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडले पाहिजेत. युद्ध टाळण्यासाठी आपण पाकिस्तानला पुष्कळ संधी दिली; मात्र आता सर्व त्याच्या पलीकडे गेले आहे. त्यामुळे आता पाकिस्तानशी युद्ध करण्याची वेळ आली आहे, पाकिस्तानच्या घरात घुसून मारले पाहिजे. कोण कलाकार यावर काय बोलतात ? याविषयी मला देणे-घेणे नाही. मी अभिनेता आहे, प्रखर हिंदुत्वनिष्ठ आहे. इतिहासातील सगळे उट्टे काढण्याची आता वेळ आली असून नकाशावरून सगळे संपवून टाकूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा विश्वास आहे, असे परखड मत ज्येष्ठ अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक श्री. शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले.

‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक समिती’ दादर, ‘कलांगण’ मुंबई आणि ‘नृत्यश्री’ मिरज या तीन संस्थांच्या सहयोगाने ‘आमदार राजेश क्षीरसागर फाऊंडेशन’ यांच्या वतीने १ मे या दिवशी ‘तेजोमय तेजोनिधी’ हा कार्यक्रम आयोजित केल होता. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री. शरद पोंक्षे आले असतांना झालेल्या पत्रकार परिषेदत ते बोलत होते.

श्री. शरद पोंक्षे म्हणाले, ‘‘युद्ध केल्यास महागाई, बेरोजगारी निर्माण होईल, असे प्रश्न निर्माण केले जातात. अशा गोष्टी निरर्थक आहेत. ज्यांच्या घरातील लोकांना मारले, त्यांनी सांगितले की ‘धर्म विचारून मारले’, असे असतांना काही लोक ‘धर्म विचारून मारले नाही’, असे म्हणत असतील, तर त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ ! पाकिस्तानशी असलेले सगळे संबंध तोडले पाहिजेत. पाकिस्तानला देण्यात येणारे पाणी निश्चित अडवले पाहिजे.’’

‘तरुण युवकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण होण्यासाठी १५ ते ३५ वयोगटांतील तरुणांसाठी १ ते ७ जून या कालावधीत ‘अंदमान यात्रा’ आयोजित केली आहे. या कालावधीत तेथील तरुणांना आम्ही कारागृहातील कोठडीत व्याख्यान देतो, त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी काय यातना भोगल्या, ते समजण्यास साहाय्य होते. तेथे काही काळ आम्ही तरुणांकडून भ्रमणभाष काढून घेऊन त्यांना कोठडीत बसवतो, जेणेकरून त्यांच्या मनात राष्ट्राप्रती संवेदना जागृत होतील’, असे श्री. पोंक्षे यांनी सांगितले.

राहुल गांधींनी इच्छा व्यक्त केल्यास त्यांना स्वखर्चाने अंदमानात नेऊ !

जे नवनियुक्त लोकप्रतिनिधी असतात, त्या प्रत्येकाला अंदमानात न्यायला हवे. त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगतांना काय यातना भोगल्या ? हे कळण्यासाठी ते रहात असलेली कोठडी आणि त्यांनी फिरवलेला कोलू दाखवायला हवा. स्वातंत्र्यवीर सावरकर कशा स्थितीत कोठडीत रहात होते ? हे त्यांना कळायला हवे. असे झाले, तर कोणताही लोकप्रतिनिधी यापुढील काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी चुकीचे बोलणार नाही. यापुढील काळात जर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना उपरती झाली आणि त्यांनी जर अंदमानात येण्याची इच्छा व्यक्त केली, तर मी त्यांना स्वखर्चाने अंदमानात घेऊन जाईन.