ही ‘आर या पार’ची वेळ ! – जावेद अख्तर, गीतकार

जावेद अख्तर, गीतकार

मुंबई – आतंकवादाच्या विरोधात ठोस पावले उचला. सीमेवर केलेल्या कारवाया पहलगामध्ये झालेल्या जीवितहानीसाठी पुरेशा नाहीत. पाकिस्तानचा लष्करप्रमुख म्हणतो की, हिंदु आणि मुसलमान हे वेगळे समुदाय आहेत. हे एकदाच नाही, तर अनेक वेळा घडले आहे. केंद्र सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मी विनंती करतो. आता ‘आर या पार’ करण्याची वेळ आली आहे, असे साम्यवादी विचारसरणीचे पटकथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बोलत होते. ‘ग्लोरिअस महाराष्ट्र फेस्टिव्हल’च्या उद्घाटनासाठी ते आले होते. (महाराष्ट्रातील या महोत्सवाचे नाव इंग्रजीत कशाला ? – संपादक)

अख्तर जुन्या आठवणी सांगतांना म्हणाले, ‘‘लाहोरमध्ये एकदा ‘हिंदुस्थानी आम्हाला दहशतवादी समजतात’, असा प्रश्न मला विचारला गेला. मी सांगितले की, मी माझे शहर जळतांना पाहिले आहे. ते जाळण्यासाठी स्वीडन किंवा इजिप्त मधून कुणी आले नव्हते, ते लोक आजही तुमच्या शहरात मुक्तपणे फिरत आहेत.’’

अख्तर म्हणाले की, हिंदुस्थान नेहमीच शांततेसाठी आग्रही असतो; परंतु शेजारी राष्ट्राने प्रतिसाद देण्यास कायम नकार दिला आहे. पहलगाममध्ये घडले, ते काही दिवसांनी घडत रहाते. ते दुःखद आहे. काँग्रेस किंवा भाजप यांनी नेहमीच शेजार्‍यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.’’