
मुंबई – करमणूक क्षेत्र हे महाराष्ट्र आणि भारत यांच्यासाठी विकासाचे नवे इंजिन आहे. भारताला सर्जनशील महासत्ता करणार, असे विधान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटर, वांद्रे-कुर्ला संकुल, मुंबई येथे १ मे या दिवशी ‘वेव्हज २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या समिटचे उद्घाटन झाले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या वेळी राज्यपाल सीपी राधाकृष्णन्, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अनेक नेते आणि मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले,,..
१. आजच्या डिजिटल युगात आशय (कंटेंट) सर्वांत वेगाने पसरतो. महाराष्ट्र या सर्जनशील क्रांतीच्या केंद्रस्थानी आहे. ही परिषद म्हणजे केवळ घटना नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून चालू झालेली चळवळ आहे.
२. राज्य सरकार अॅनिमेशन, गेमिंग, म्युझिक आणि डिजिटल माध्यमांना चालना देण्यासाठी अनुकूल धोरणे राबवत आहे. मुंबईतील ५०० एकरच्या ‘फिल्मसिटी’ला नव्या पिढीच्या ‘स्टुडिओ इकोसिस्टम’मध्ये रूपांतर करण्याचे काम चालू आहे. यातील १२० एकरमध्ये माध्यम आणि करमणूक शहर उभारण्यात येणार असून अॅनिमेशन, VFX आणि गेमिंगसाठी हे केंद्र असेल.
‘वेव्हज २०२५’च्या निमित्ताने भारतामध्ये प्रथमच ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी’ (IICT) मुंबईत स्थापन होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपयांचा निधी संमत केल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुदत्त, पी. भानुमती, राज खोसला, ऋत्विक घटक आणि सलील चौधरी यांच्या चित्रपटामातील योगदानाचे स्मरण करत विशेष टपाल तिकिटांचे अनावरण झाले.
भारताला सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र करा ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘‘भारताच्या ‘ऑरेंज इकॉनॉमी’चे कंटेंट, क्रिएटिव्हिटी आणि कल्चर हे ३ स्तंभ असून काही वर्षांत जीडीपीमध्ये (सकल घरेलु उत्पन्न) याचा मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन बाजारपेणा ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होईल. भारत अॅनिमेशन, ग्राफिक्स, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटमध्ये मोठी झेप घेणार असून ही परिषद त्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल. भारतीय चित्रपट आता १०० पेक्षा जास्त देशांमध्ये पोचले असून परदेशी प्रेक्षक भारतीय कथा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, हे भारतीय आशयाचे यश आहे. आपल्याला माणसाला यंत्र करायचे नाही, तर संवेदनशील करायचे आहे. संगीत, नृत्य, कला यांना महत्त्व द्यायला हवे. भारताला सर्जनशीलतेचे जागतिक केंद्र करण्याचे आवाहन केले. जग नव्या शैलीत कथा सांगत असतांना भारताकडे सहस्रो वर्षांचा सांस्कृतिक ठेवा आहे. त्याचे नव्या पिढीसमोर आकर्षक सादरीकरण करा.’’ |