सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली ‘जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५’

सिंधुदुर्गनगरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योगांचे जाळे वाढेल आणि त्यातूनच रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील. दरडोई उत्पन्नातही भर पडेल आणि जिल्ह्याच्या विकासाला बळ मिळेल. जहाज बांधणी कारखाना आणि सागरी जलवाहतूक हे २ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती देतील, असे उद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांनी काढले.
सिंधुदुर्गनगरी येथील ‘आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक भवना’च्या सभागृहात जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने १ दिवसांची ‘जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५’ आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी मंत्री राणे बोलत होते.
पुढे मंत्री राणे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग जिल्हा उद्योजकांसाठी पोषक वातावरण असलेला जिल्हा आहे. येथे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देशातील उद्योजक येथे आले पाहिजेत, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. येथे येणार्या गुंतवणुकदारांना लाभ झाला पाहिजे आणि येथील बेरोजगारांना काम मिळाले पाहिजे. हे दोन्ही उद्देश साध्य करण्यासाठी पोषक वातावरण आम्ही निर्माण करणार आहोत.’’
उद्योजकांकडून ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक
जिल्हास्तर गुंतवणूक परिषद २०२५ मध्ये एकूण ३० उद्योजकांनी गुंतवणूक करण्याची सिद्धता दर्शवली आहे. त्यातील २२ जणांशी सामंजस्य करार झाले. त्यातील १७ जणांना मंत्री राणे यांच्या हस्ते करारपत्र देण्यात आले. यातून एकूण ६३५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे.
जिल्ह्याच्या प्रगतीसाठी ‘सिंधुदुर्ग प्रथम’ संकल्पना
‘सिंधुदुर्ग प्रथम’ अशी संकल्पना (थीम) सिद्ध केली आहे. सिंधुदुर्गला प्रत्येक बाबतीमध्ये अग्रेसर ठेवण्याचा यात निश्चय आहे. गुंतवणूक, रोजगार निर्मिती, पर्यटन क्षेत्र, कृषी क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांमध्ये पहिल्या ३ क्रमांकामध्ये सिंधुदुर्ग गणला जाईल, अशा पद्धतीचे काम पुढच्या ५ वर्षांमध्ये निश्चितपणे केले जाईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.