सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधिकेला आलेल्या अनुभूती 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सत्संगस्थळी जातांना ‘शरिरात चैतन्य पसरत आहे’, असे वाटून देह हलका होणे 

सत्संगाला जातांना ‘मी एका पांढर्‍याशुभ्र निर्वात पोकळीमध्ये प्रवेश करत आहे. श्वास घेतांना माझ्या शरिरात चैतन्य पसरत असून माझा देह हलका झाला आहे’, अशी मला अनुभूती आली. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.

२. सत्संगस्थळी गेल्यावर

२ अ. मला शुभ्र प्रकाश दिसत होता आणि तो माझ्या डोळ्यांना सहन होत नव्हता. 

२ आ. पांढरे दैवी कण चमकतांना दिसणे : मला पांढरे दैवी कण चमकतांना दिसत होते. तेव्हा मी गुरुदेवांना सूक्ष्मातून विचारले, ‘गुरुदेवा, हे काय आहे ?’ त्या वेळी ‘गुरुदेव स्थुलातून तेथे येण्याआधीच सूक्ष्मातून त्यांचे निर्गुण स्तरावरील कार्य चालू झाले आहे’, असे माझ्या लक्षात आले.

कु. नीता अहिरे

२ इ. सत्संगाच्या ठिकाणी निर्गुण तत्त्व वाढले होते. 

२ ई. सत्संगाच्या ठिकाणी तेथील लादीविषयी जाणवलेली सूत्रे

१. सत्संगातील लाद्यांवर पाय ठेवताच लाद्यांमधून मोठ्या प्रमाणात थंड लहरी येत होत्या. मला त्या थंड लहरींचा स्पर्श जाणवून आनंद होत होता. ‘त्यामुळे लादीला पुनःपुन्हा स्पर्श करावा आणि तो आनंद अनुभवावा’, असे मला वाटत होते.

२. ‘लादीतील आपतत्त्व आणि निर्गुण तत्त्व माझ्या पूर्ण शरिरात पसरत आहे अन् शरिरात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे’, असे मला जाणवले.

३. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सत्संगस्थळी आल्यावर जाणवलेली सूत्रे

अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सत्संगस्थळी आल्यावर मला त्यांचे पांढर्‍या पोशाखातील विराट रूप दिसले. ‘गुरुदेवांनी सुवर्णाचा शेला पांघरला आहे, तसेच वातावरणात निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होत आहे’, असे मला वाटत होते.

आ. मला प.पू. गुरुदेवांचे मुख गुलाबी दिसत होते. त्यांचा पूर्ण स्थूल देह गुलाबी रंगाचा दिसत होता. त्यांच्या चरणांकडूनही वातावरणात गुलाबी रंग, म्हणजे प्रीती प्रक्षेपित होत होती.

इ. गुरुदेवांच्या सोनेरी आणि चकाकणार्‍या केसांमधून निर्गुण तत्त्व प्रक्षेपित होऊन सगळीकडे दैवी सुगंध पसरला होता.

४. भारताचार्य पू. सु.ग. शेवडेगुरुजी सत्संगस्थळी आले. त्या वेळी ‘ते आम्हाला वेदांचे ज्ञान देणार आहेत’, असे मला जाणवले.

५. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्संग चालू असतांना

अ. गुरुदेवांचे बोलणे ऐकत असतांना मला सूक्ष्म नाद ऐकू आला. या नादामुळे सर्व साधकांचे मन आणि बुद्धी यांवरील आवरण नष्ट होऊन साधकांना गुरुदेवांचे रूप स्पष्ट दिसू लागले. हा नाद दैवी होता. तो ब्रह्मांडातील नादाशी तादात्म्य पावणारा होता. त्यामुळे ‘प.पू. गुरुदेवांच्या केवळ एकाच वाक्याने साधकांच्या कित्येक जन्मांची पापे नष्ट झाली आहेत’, असे मला जाणवले.

आ. साधक सत्संगात बोलत असतांना साधकांवरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होऊन त्यांच्यामध्ये पारदर्शकता जाणवू लागली.

इ. गुरुदेवांपासून काही अंतरावर पोकळी असलेला एक पारदर्शक निर्गुण पट्टा निर्माण झाला होता. त्यामुळे गुरुदेवांना प्रत्येक साधकाचे मन आणि त्याची साधना यांची स्थिती समजत होती. या पारदर्शक निर्गुण पट्ट्यामुळे साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव होत होती.

ई. गुरुदेवांच्या सगुण अस्तित्वामुळे वातावरणात हलकेपणा जाणवत होता. त्या वेळी ‘प.पू. गुरुदेवांकडून वातावरणात पांढरा आणि गुलाबी प्रकाश प्रक्षेपित होत आहेत’, असे मला जाणवले.

६. साधिकेला स्वतःविषयी जाणवलेली सूत्रे

अ. ‘गुरुदेवांना माझे भूत, भविष्य आणि वर्तमान ज्ञात असल्यामुळे त्यांनी मला बोलायला सांगितले. तेव्हा ‘ते माझे अंतर्मन शुद्ध अन् निर्मळ करत आहेत.’

आ. गुरुदेव माझे प्रारब्ध न्यून करून मला साधनेच्या पुढच्या टप्प्याला नेत आहेत.

इ. ‘गुरुदेवांचे शब्द ऐकल्यावर माझ्या शरिरातील प्रत्येक पेशी चैतन्याने भारित होत होती.

ई. ‘गुरुदेवांना काय विचारायचे ?’, हे मला गुरुदेवच सुचवत होते. त्या वेळी ‘ते स्मितहास्य करत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा ‘हा क्षण संपू नये आणि आपण हा आनंद घेतच रहावा’, असे मला वाटले.

७. सत्संग घेण्याचा उद्देश

अ. सत्संग घेणे, हे केवळ निमित्त आहे. सत्संगात होणारे भगवंताचे दर्शन आणि ऐकायला मिळणारी त्याची वाणी, यांमुळे अनेक जिवांची पापे नष्ट होऊन त्या जिवांचा उद्धार होत आहे.

आ. सत्संग म्हणजे साधकांनी गुरुदेवांच्या निर्गुण तत्त्वाची अनुभूती घेऊन स्वतःला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे.

इ. गुरुदेव सत्संगातून साधकांचे प्रारब्ध नष्ट करून त्यांना अंतर्बाह्य शुद्ध करत आहेत.

ई. ‘या सत्संगाचा परिणाम दृश्य आणि अदृश्य रूपात ब्रह्मांड अन् वायुमंडल येथे होत आहे’, असे मला जाणवले.

‘हे गुरुदेवा, ‘या जिवाने अनंत अपराध केले आहेत. त्याबद्दल हा जीव आपल्या चरणी क्षमा मागत आहे. ‘आपणच या जिवाची पापे नष्ट करून या लेकराला आपल्या चरणांशी घ्यावे’, अशी आपल्या दिव्य चरणांशी प्रार्थना आहे.’

– कु. नीता चंद्रकांत अहिरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक