युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन !

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी युवा साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. या सत्संगात सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४१ वर्षे) हेही उपस्थित होते. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे. मार्गदर्शनाचा काही भाग आपण २ मे २०२५ या दिवशी पाहिला. आज अंतिम भाग येथे दिला आहे.

या लेखातील मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/909351.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

९. अनुभूतींसंबंधीचे अध्यात्मशास्त्र 

९ अ. पूर्वसाधनेमुळे ‘वर्तमानक्षण या आधीही अनुभवले आहेत’, असे वाटणे

कु. अनुजा करी (कोल्हापूर, महाराष्ट्र) : काही वेळा मला असे वाटते की, आता वर्तमानात जे काही घडत आहे, ते मी या आधी कधीतरी अनुभवले आहे. पुष्कळ वेळा मला असे वाटते. मला घरातही असे वाटते की, जो चालू क्षण आहे, तो मी आधीच पुष्कळ वेळा अनुभवला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच छान आहे ! ही महत्त्वाची अनुभूती आहे. आपण साधना करतांना आपल्याला एखादी अनुभूती येते. त्या वेळी आपले वय कितीही असो ! पुढे सतत साधना करत राहिलो, तर काही वर्षांनी पुन्हा तशीच अनुभूती येते. पूर्वी साधना केल्यामुळे अशी अनुभूती येते.

९ आ. साधिकेला घरी आणि आश्रमात ‘सर्वकाही हवेत तरंगत आहे’, अशी वायुतत्त्वाची अनुभूती येणे 

कु. अनुजा करी : आम्ही घरी रात्री झोपतांना खाली भूमीवर अंथरुण घालतो. तेव्हा मला ‘ते अंथरुण आणि संपूर्ण घर हवेत तरंगत आहे’, असे जाणवते. येथे आल्यावर मी नामजप करत होते. तेव्हा ‘संपूर्ण आश्रमच हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवले. मला घरात असतांना असे वाटते की, ‘मला काही आध्यात्मिक त्रास आहे का ?’ म्हणजे माझ्या मनात असा प्रश्न होता की, ‘ही अनुभूती चांगली आहे कि त्रासदायक आहे ?’

परात्पर गुरु डॉ. आठवले : ही पुष्कळ चांगली अनुभूती आहे. ही वायुतत्त्वाची अनुभूती आहे. (पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचतत्त्वांपैकी वायुतत्त्वाची अनुभूती आहे.)

९ इ. पंचतत्त्वांच्या अनुभूतींपेक्षा भाव अधिक श्रेष्ठ आहे ! 

श्री. चेतन राजहंस : ही कु. संजना कुराडे, कोल्हापूरहून आली आहे.

कु. संजना कुराडे (कोल्हापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, आधी मला सेवा इत्यादी काही ठाऊक नव्हते. मी केवळ माझ्या व्यष्टी साधनेचा आढावा द्यायचे. एकदा मला काही दिवसांसाठी एक सेवा मिळाली. जिज्ञासूंना संपर्क करून त्यांना साधनेविषयी माहिती सांगायची होती. नंतर जिल्ह्यातील माझ्या अन्य सेवाही वाढल्या आणि सेवेची व्याप्तीही वाढली. आता माझ्या लक्षात आले आहे की, ‘हीच समष्टी साधना असून हेच गुरुकार्य आहे अन् तेच पुढे वाढवण्याचे ध्येय मला मिळाले आहे.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : आता सगळ्यांना सुगंध आला का ? पुष्कळ छान. पहिल्यांदा झाले आहे की, अनेक साधक बोलत असतांना सुगंध येत आहे. साधकांनाही मधे मधे सुगंध येत आहे ना ?

श्री. मनीष सहगल (आग्रा, उत्तर प्रदेश) : माझा भाव जागृत होत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : भाव जागृत होत असेल, तर ते अधिक चांगले आहे. पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश या पंचमहाभूतांच्या तत्त्वांची जी लक्षणे आहेत, त्यापेक्षा भाव अधिक श्रेष्ठ आहे !’                                            

(समाप्त)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक