संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर रचित ‘ज्ञानेश्वरी’ आणि वारकरी संप्रदाय

‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा’निमित्त (७५० व्या) आळंदी देवस्थानच्या वतीने आजपासून ‘ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा’ आहे. त्या निमित्ताने…

संत ज्ञानेश्वर

‘ज्ञानेश्वरी’सारखा ७५० वर्षे चिरतरुण रहाणारा ग्रंथराज, म्हणजे सरस्वतीच्या कंठातील बहुमूल्य अलंकारच होय किंवा महाराष्ट्र सारस्वताला पडलेले मधुर स्वप्न होय. ज्ञानेश्वरीत तत्त्वज्ञान आणि काव्य यांचा सुंदर संगम झाला आहे. केवळ साहित्याच्या दृष्टीनेच हा ग्रंथ श्रेष्ठ नाही, तर सांप्रदायिक दृष्टीनेही हा ग्रंथ आदरणीय मानला जातो. ‘ज्ञानेश्वरी’ ही वारकरी संप्रदायाची संजीवनी आहे. वारकर्‍यांचा तो धर्मग्रंथ आहे. प्रत्येक वारकर्‍यांच्या नित्यपठणांत ‘ज्ञानेश्वरी’ असतेच. वारकरी तिच्यावर ‘माऊलीप्रमाणे’ प्रेम करतात. 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमाऊली यांनी वारकरी संप्रदायाला तत्त्वज्ञानाची बैठक दिली. अध्यात्मज्ञानाचा पाया घातला. या भक्कम पायावरच वारकरी संप्रदायाची इमारत आज ७५० वर्षे उभी आहे. 

१. विविध संतांनी ‘ज्ञानेश्वरी’ची मुक्त कंठाने केलेली प्रशंसा

इतर संतांनीसुद्धा ‘ज्ञानेश्वरी’ची मुक्त कंठाने स्तुती केली आहे.

अ. संत ज्ञानेश्वर यांचे अभिन्न सखा नामदेव म्हणतात,

ज्ञानराज माझी योग्यांची माऊली । जेणें निगमावली प्रगट केली ।। १ ।।

नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी । एक तरी ओवी अनुभवावी ।। ६ ।।

– संत नामदेव महाराज

अर्थ : संत ज्ञानदेव हे योग्यांची माऊली आहेत. त्यांनी शास्त्र स्पष्ट करून सांगितले. ‘ज्ञानेश्वरी’ हा श्रेष्ठ ग्रंथ आहे; पण (तो केवळ वाचून उपयोगी नाही) त्यातील एकतरी ओवीचा अनुभव घेतला पाहिजे.

आ. जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, 

‘ज्ञानियांचा राजा गुरु महाराव । म्हणती ज्ञानदेव तुम्हां ऐसें  ।। १ ।।

तुका म्हणे नेणो युक्तीचिया खोलीं । म्हणोनि ठेविली पायीं डोई ।। ४ ।।

– संत तुकाराम महाराज

अर्थ : आमचे श्रेष्ठ गुरु संत ज्ञानेश्वर हे ज्ञानीजनांचेही राजा आहेत. म्हणून त्यांना ‘ज्ञानाचा देव – ज्ञानदेव’ असे म्हणतात. सद्गुरु आपल्यामधील उरलासुरला अहंकार नष्ट करतात आणि त्यानंतर आपल्याला स्वस्वरूपाचे ज्ञान होते. म्हणून सद्गुरूंना शरण जावे.’

२. ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ला सर्वश्रेष्ठ का ?

ग्रंथराज ‘ज्ञानेश्वरी’ला सर्वश्रेष्ठ का मानले जाते ? संत ज्ञानेश्वर यांनी त्यांचा ग्रंथ मराठीत लिहिला. त्यात सामान्य जनतेला मार्गदर्शन केले. ज्ञानापेक्षा भक्तीचे महत्त्व पटवून दिले. शंकराचार्यांनीही गीतेवर भाष्य लिहिले; पण त्यांचे श्रोते वेगळे होते. संत ज्ञानेश्वर यांच्या डोळ्यांपुढे तळगाळातील समाज होता. संत ज्ञानेश्वर यांना त्यांच्यासाठी ज्ञानाचे दरवाजे उघडायचे होते. त्यांना समजेल अशा भाषेत उपदेश द्यायचा होता. अशा अज्ञानी लोकांविषयी संत ज्ञानेश्वर यांच्या मनात अपार करुणा होती. लोकाभिमुखता हे संत ज्ञानेश्वर यांचे वैशिष्ट्य आहे. शेवटी पसायदानातसुद्धा समाजाच्या कल्याणाची प्रार्थना केली आहे.

३. वारकरी संप्रदायाचे धार्मिक ग्रंथ

‘ज्ञानेश्वरी’, ‘एकनाथी भागवत’ आणि संत तुकाराम यांची ‘गाथा’, हे ३ ग्रंथ म्हणजे वारकरी संप्रदायाची प्रस्थान त्रयीच होय. तिघांमध्ये ‘ज्ञानेश्वरी’ला सर्वश्रेष्ठ स्थान आहे. ‘ज्ञानेश्वरी’त वारकरी संप्रदायाचे जे तत्त्वज्ञान आलेले आहे, त्याचाच विस्तार ‘एकनाथी भागवत’ आणि ‘गाथा’ यांमध्ये आढळून येतो.

४. ‘ज्ञानेश्वरी’मुळे झालेले महान कार्य

वारकरी संप्रदाय आणि ‘ज्ञानेश्वरी’ यांनी फार मोठे कार्य केले. त्यांनी सामाजिक विषमता दूर केली. मोक्ष प्राप्त करण्यासाठी भक्ती मार्गाचा अवलंब कुणीही करू शकतो; म्हणूनच वारकरी संप्रदायात प्रत्येक जातीत संत निर्माण झाले. त्यांनी कर्मकांडापेक्षा भक्तीला अधिक महत्त्व दिले. संतांनी लोकभाषेत मराठीत ग्रंथरचना केल्यामुळे ज्ञानाचे दरवाजे सर्वांना खुले झाले. लोक क्षूद्र देवांच्या मागे लागत. मंत्र, तंत्र, जारणमारण, जादूटोणा, तसेच नवससायास इत्यादी मार्गांचा अवलंब करत असत; पण संत आणि संत ज्ञानेश्वर यांनी त्यांना भक्तीच्या राजमार्गावर आणले. वारकरी संप्रदायाची ही कामगिरी फार महत्त्वाची आहे आणि ‘ज्ञानेश्वरी’, म्हणजे कैवल्यरसाच्या पंचपक्वानांनी भरलेले सोन्याचे ताटच. माऊलींनी ग्रंथ समाप्तीच्या वेळी पसायदान मागतांना विश्वाच्या कल्याणाचीच इच्छा व्यक्त केली. अज्ञानाचा अंधार नष्ट व्हावा, स्वधर्मरूपी सूर्याचा प्रकाश सर्वांना प्राप्त व्हावा. सर्वांचे मनोरथ पूर्ण व्हावेत, दुष्टांचा दुष्टपणा नष्ट होऊन सत्कर्मात त्यांची रुची वाढावी. लोकांत आपापसांत प्रेमभाव निर्माण व्हावे, असे झाले, तर हा ज्ञानदेव सुखी होईल.

– डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर (साभार : मासिक ‘प्रसाद’, ऑगस्ट १९९०, ‘श्री ज्ञानेश्वरी’ विशेषांक)