परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती अपार भाव आणि श्रद्धा असलेले कै. बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) !

‘१४.५.२०२४ या दिवशी बाळासाहेब विभूते (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ६९ वर्षे) यांचे निधन झाले. ३.५.२०२५ या दिवशी त्यांचे प्रथम वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

कै. बाळासाहेब विभूते

१. श्रीमती अंजली विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांच्या पत्नी, वय ६१ वर्षे)

श्रीमती अंजली विभूते

गुरुनिष्ठा 

‘आपली गुरूंवरील निष्ठा होती भारी ।
तुमचा सेवेचा उत्साह पाहूनी आम्हालाही मिळाली स्फूर्ती ।। १ ।।

मायेतूनी सोडवूनी आम्हा गुरुचरणी ठेविले तुम्ही ।
आम्हा कुटुंबियांचे हात धरूनी साधनापथावर चालविले तुम्ही’ ।। २ ।।

२. श्री. अभिजित विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांचा मोठा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात साधकांनी ‘श्री. विभूते यांच्यामध्ये भाव जाणवतो’, असे सांगणे : ‘एकदा रत्नागिरी येथील सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बाबांना साधकांच्या समोर उभे रहायला सांगून साधकांना ‘यांच्याकडे पाहून काय जाणवते ?’, असे विचारले. तेव्हा सर्व साधकांनी ‘श्री. विभूते यांच्यामध्ये भाव जाणवतो’, असे सांगितले. त्यानंतर गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) बाबांना केंद्रात सत्संग घ्यायला सांगितले. तेव्हा बाबा आम्हाला सांगत, ‘‘गुरुदेव आपल्याला घडवतात आणि श्रेय मात्र आपल्याला देतात. ‘आपले गुरु केवढे महान आहेत !’’

श्री. अभिजीत विभूते

२ आ. घराच्या परिसरात औदुंबराची रोपे आपोआप उगवणे : आम्ही सरकारी वसाहतीत रहात होतो. तेव्हा प्रतिदिन बाबा आमच्या खोलीच्या बाहेरच्या परिसरातील केर काढतांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ असा नामजप करत असत. त्या वेळी आमच्या घराच्या भोवती औदुंबराची रोपे आपोआप उगवली होती. ‘हे सर्व बाबांमधील भावामुळेच झाले’, असे मला वाटते.

२ इ. संतांप्रती भाव : एकदा आमच्या घरी पू. राऊळ महाराज येणार होते. तेव्हा बाबांनी आमच्याकडून घर आणि घराचा सर्व परिसर याची स्वछता करून घेतली होती. आम्ही घरात सगळीकडे दिवे लावले होते आणि रांगोळ्या काढल्या होत्या. बाबांनी ‘संत येती घरा तोचि दिवाळी दसरा ।’ या उक्तीप्रमाणे सगळी व्यवस्था केली. पू. राऊळ महाराज घरी आल्यावर म्हणाले, ‘‘याने तर दिवाळीच केली आहे की रे !’’ ‘संतांप्रती भाव कसा असायला हवा !’, हे बाबांनी आम्हाला कृतीतून शिकवले.

२ ई. श्री. विभूते यांच्या त्यागी वृत्तीचे गुरुदेव आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी कौतुक करणे : बाबांना निवृत्तीनंतर पैसे मिळाले. तेव्हा ‘देवानेच सर्व पैसे मिळवून दिले’, असा त्यांचा भाव होता. बाबा पूर्णवेळ साधना करू लागल्यावर त्यांनी गुरुदेवांना विचारले, ‘‘माझी मुले पूर्णवेळ साधक आहेत. माझ्या मुलींची लग्ने झाली आहेत. आता मला मिळालेली रक्कम मी संस्थेला अर्पण करू शकतो का ?’’ त्या वेळी ‘पैसे पाहून मुलांच्या मनात ‘व्यवहार किंवा प्रपंच करावा’, अशी इच्छा होऊ नये’, असा त्यामागे बाबांचा उद्देश होता. बाबांचा त्याग आणि मनाची सिद्धता पाहून गुरुदेवांनी त्यांचे कौतुक केले. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी बाबांचे ‘कलियुगातील शेलारमामा’, असे कौतुक केले.

या कलियुगात स्वतःच्या मुलांना धर्मासाठी अर्पण करणार्‍या, आपली संपत्ती देवाला अर्पण करण्याची सिद्धता दाखवणार्‍या, आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या आई-वडिलांच्या पोटी आम्हाला जन्म दिल्याबद्दल आणि जन्मोजन्मीच्या या चक्रातून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवल्याबद्दल मी गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञ आहे.’

३. श्री. अभिजीत विभूते (मोठा मुलगा) आणि सौ. जान्हवी अभिजीत विभूते (मोठी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. 

३ अ. हृदयविकाराचा त्रास असूनही व्यायाम नियमित करणे : ‘बाबा देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वास्तव्याला होते. बाबांना हृदयविकाराचा त्रास होता, तरीही त्यांनी सकाळी प्रशिक्षण आणि योगासने करणे, यांत कधीही खंड पडू दिला नाही. ते म्हणायचे, ‘‘प्रशिक्षण आणि योगासने या वर्गाला सकाळी संत उपस्थित असतात. त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या चैतन्याने आपल्यावरील आवरण दूर होते आणि आपल्याला उत्साह येतो.’’

सौ. जान्हवी विभूते

३ आ. रुग्णालयात असतांना केलेले साधनेचे प्रयत्न 

१. बाबा रुग्णालयात असतांना ते संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय भावपूर्णरित्या करत असत आणि नामजप पूर्ण झाल्यावर त्याचा आढावाही देत असत.

२. बाबांनी रुग्णालयात त्यांच्या ‘वार्ड’मधील रुग्ण, परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांना साधना सांगून त्यांच्याकडून नामजप करून घेतला. त्यांनी स्वतःचे नामजपाचे यंत्र शेजारील रुग्णाला दिले. देवाचा नामजप कधीही न केलेल्या व्यक्तीही बाबांनी सांगितल्याप्रमाणे दिवसभर कुलदेवी आणि दत्त यांचा नामजप करायचे. ते बाबांना नामजपाचा आढावाही देत असत. अन्य रुग्णांनी नामजप करायला चालू केल्यापासून त्यांच्या मनातील नकारात्मक आणि अनावश्यक विचार न्यून झाले. पूर्वी त्या रुग्णांचे चेहरे त्रासलेले दिसत; पण नामजपामुळे त्या सर्वांचे चेहरे प्रसन्न दिसू लागले.

३. बाबांच्या वार्डमधील रुग्ण ‘त्यांच्या मनातील ताण आणि घरातील अडचणी’ यांविषयी बाबांना सांगत असत. तेव्हा बाबा त्यांना सकारात्मक दृष्टीकोन सांगत आणि ‘साधनेचे प्रयत्न कसे करायचे’, याविषयी मार्गदर्शन करत असत.

४. रुग्णालयातील बाबांच्या वॉर्डमधील रुग्ण मला म्हणत, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला प्रेमळ आणि साधना करणारे आई-वडील लाभले आहेत.’’ तेथील सर्व रुग्ण, परिचारिका आणि आधुनिक वैद्य यांना प्रश्न पडायचा, ‘‘तुमच्या बाबांना एवढ्या वेदना होत असूनही त्यांचा चेहरा एवढा हसरा कसा ?’ त्यांच्या चेहर्‍यावर एक वेगळीच चमक दिसते.’’ तेव्हा मी त्यांना सांगत असे, ‘‘बाबा सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात. त्यांची आध्यात्मिक पातळी ६६ टक्के आहे; म्हणून तुम्हाला त्यांच्याबद्दल असे वाटत आहे.’’

३ इ. बाबांचे श्राद्धविधी नरसोबाची वाडी येथे केले. विधी पूर्ण झाल्यावर पुरोहितांनी नैवेद्य ठेवायला सांगितला. त्या वेळी नैवेद्य ठेवताच पिंडाला कावळा शिवला.’ 

४. सौ. गीता लांजेकर (कै. बाळासाहेब विभूते यांची मोठी मुलगी), चिपळूण, रत्नागिरी. 

४ अ. नोकरी लागल्यानंतर पहिल्या वेतनात पितळेची गरुडाची मूर्ती श्री देव हालसिद्धनाथाच्या मंदिरात अर्पण करणे : ‘बाबांमध्ये बालपणापासूनच ‘प्रत्येक गोष्ट देवाला सांगून करणे’, हा संस्कार होता. त्यांनी नोकरी मिळाल्यावर पहिल्या पूर्ण वेतनातून एक पितळीची गरुडाची मूर्ती श्री देव हालसिद्धनाथाच्या मंदिरात अर्पण केली होती. ती मूर्ती आजही श्री देव हालसिद्धनाथाच्या मंदिरात पूजेमध्ये आहे. त्या मूर्तीच्या संदर्भात माझ्या मनात विचार आला, ‘बाबांना मंदिरात गरुडाचीच मूर्ती द्यावी’, असे का वाटले असेल ? पुढे बाबांच्या आयुष्यात प्रत्यक्ष श्री विष्णुस्वरूप गुरुमाऊली येणार होती. ही जणू त्यांना मिळालेली पूर्वसूचनाच असावी.’

४ आ. देहभान विसरून सेवा करणे : बाबा आणि श्री. डी.बी. शिंदेकाका प्रत्येक रविवारी अलोरे येथून कराड, सातारा या ठिकाणी दुचाकीवरून सत्संग घेणे आणि सत्सेवा यांसाठी जायचे. त्या वेळी बाबांना ऊन, वारा, पाऊस याचे काहीच वाटत नव्हते. कधी कधी पावसात त्यांचे पूर्ण कपडे भिजून पुन्हा शरिरावर वाळत असत; मात्र त्यांना कोणताच त्रास झाला नाही. ते सेवेत इतके बुडून जायचे की, ‘दिवस कधी संपला ?’, हे त्यांच्या लक्षातही येत नसे. ‘गुरूंनी त्यांना सेवेत इतका आनंद दिला आहे की, ‘कधी शनिवार, रविवार येतो आणि सेवेला जातो’, असे बाबांना वाटायचे.

४ इ. आदर्श  व्यक्तीमत्त्व : मी अनुभवलेले बाबा म्हणजे सर्वतोपरी आदर्श व्यक्तीमत्त्व होते. बाबांनी त्यांच्या आई-वडिलांची सेवा मनोभावे केली. बाबांचे दोन्ही भाऊ त्यांच्यापेक्षा लहान आहेत. बाबांना नोकरी लागल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाचे दायित्व घेतले. बाबांनी त्यांच्या लहान भावांनाही मुलाप्रमाणे प्रेम दिले आणि त्या दोघांनीही (काकांनीही) बाबांना पितृस्थानी मानले. बाबांचे दोन्ही भाऊही साधना करतात. त्यांनी आम्हाला कधीही ‘पुष्कळ शिक्षण घेऊन, चांगल्या वेतनाची नोकरी करून घर, गाडी आणि सोने या गोष्टी मिळवून सुखी व्हा’, असे सांगितले नाही. ते आम्हाला सांगत, ‘‘ईश्वरचरणी एकरूप होणे’, हे अंतिम सत्य आहे. सासरी तुमची वर्तणूक अशी ठेवा की, कोणतीही चूक होणार नाही. ‘कोणाचे मन दुखावले जाणार नाही’, याची पूर्ण दक्षता घ्या. चूक झालीच, तर क्षमा मागायलाही न्यूनपणा वाटू देऊ नका.’’ माझ्या आईला वाताचा त्रास जवळ जवळ १५ ते २० वर्षे होता. ती अंथरुणातून उठू शकत नव्हती. तेव्हा तिला स्वतःला असे काहीच करता येत नव्हते. तेव्हा बाबांनी आनंदाने तिची सर्व सेवा केली. आईची आजारपणामुळे चिडचिड होत असे; पण ती कितीही चिडली, तरीही बाबांनी तिला लहान मुलाप्रमाणे सांभाळून घेतले. ते माझ्या आईची सेवा करणे, घरातील आणि कार्यालयीन कामे करणे अन् संध्याकाळी सेवेला जाणे, या सगळ्या गोष्टी मनापासून करत. ते आईला नेहमी म्हणायचे, ‘‘तुझ्यासारखी पत्नी मिळाली; म्हणून मी पूर्णवेळ साधना करू शकलो. तुला मायेची ओढ असती, तू घर बांधायचा हट्ट केला असतास, तर माझी साधना झाली नसती. मला आश्रमजीवन अनुभवता आले नसते.’’ बाबा आदर्श मित्रही होते. त्यांनी त्यांच्या मित्रांनाही साधनेशी जोडून ठेवले. त्यांचे अनेक मित्र सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. वर्ष १९९५ मध्ये सांगली येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्सवाला बाबा पूर्ण कुटुंबाला घेऊन गेले होते. ते ‘घरातील प्रत्येक कार्यक्रम आध्यात्मिक दृष्टीने कसा करता येईल’, असे पहात. बाबांना गावातील लोक  मान देत असत. बाबांना शेतीच्या वाटण्या करणे मान्य नव्हते. त्यांनी ‘एकत्रित रहा. संघटित रहा’, अशी शिकवण दिली. ‘आमचे विभूते कुटुंब हे एक आदर्श कुटुंब’, असेच गावात ओळखले जाते.

४ ई. शिस्तप्रिय : सनातनचे साधक अंतर्बाह्य निर्मळ असतात. बाबांनी त्याप्रमाणे स्वतःमध्ये पालट केले आणि त्यांच्या प्रत्येक कृतीतून आम्हाला शिकवले. बाबांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी झोकून देऊन प्रयत्न केले

४ उ. अल्प अहं : बाबांनी निधनापूर्वी जवळ जवळ २ वर्षे त्यांना जे नातेवाईक किंवा मित्र भेटायचे, त्या सर्वांची क्षमायाचना केली. ‘वेळ अल्प आहे’, असे समजून ते कोणालाच दुखवत नसत.’

५. सौ. रोहिणी राजमाने (कै. बाळासाहेब विभूते यांची लहान मुलगी), सातारा

५ अ. ‘बाबांची परम पूज्यांवर अढळ श्रद्धा होती. बाबा आम्हाला नेहमी सांगत असत, ‘‘मी तुमचा या जन्मापुरताच वडील आहे. तुमचे जन्मोजन्मीचे वडील प.पू. डॉक्टर आहेत.’’

५ आ. बाबा स्वप्नात दिसून त्यांनी ‘साधकांच्या मृत्यूनंतरही परम पूज्य त्यांच्या साधनेची काळजी घेतात’, असे सांगणे : ‘आपले गुरु जिवंतपणीच आपली काळजी घेतात असे नाही, तर मृत्यूनंतरही ते आपली साथ सोडत नाहीत’, याची मी अनुभूती घेतली. बाबांच्या निधनानंतर ३ मासांनी पहाटे माझ्या स्वप्नात बाबा आले. ते मला सांगत होते, ‘मृत्यूनंतरही प्रगती करणारे आपले साधक, संत आहेत. आपले गुरुच त्यांची काळजी घेतात. मृत्यूनंतरही साधनेची काळजी घेणारे आपले परम पूज्य आहेत. त्यामुळे माझी काही काळजी करू नका.’’ नंतर मला जाग आली. ‘हे स्वप्न नसून स्वप्नदृष्टांत आहे’, असे मला वाटते.’

६. श्री. उमाकांत विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांचा लहान मुलगा), बेळगाव

६ अ. आज्ञापालन करणे : ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांचे वाक्य म्हणजे बाबांसाठी ब्रह्मवाक्य होते. बाबा त्यांनी सांगितलेली सूत्रे आचरणात आणत होते.

६ आ. प्रामाणिकपणा : बाबा शासकीय नोकरी करत असतांना त्यांना वेतनाच्या व्यतिरिक्त प्रत्येक मासाला पैशांची पाकिटे मिळत असत. ती रक्कम वेतनापेक्षाही अधिक असे; मात्र बाबांनी एकदाही ती रक्कम स्वीकारली नाही. बाबांनी प्रामाणिकपणाची कास सोडली नाही. बाबा सांगायचे, ‘‘त्या पैशांत बंगला, चारचाकी गाडी सर्व झाले असते; पण असे पैसे काय कामाचे ?’’

६ इ. भगवंताच्या अनुसंधानात असणे : बाबांच्या समवेत कुठे फिरायला गेलो, तर बाबा म्हणायचे, ‘‘ही जागा पुष्कळ छान आणि सात्त्विक आहे. येथे माझे ध्यान लागत आहे. माझा नामजप छान होत आहे. तुम्हीही अनुभवा !’’ ते जेथे जातील, तेथे भगवंताला अनुभवायचे. त्यांना भगवंताला अनुभवण्याचीच आवड होती.’

७. सौ. गौरी विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांची धाकटी सून), बेळगाव

७ अ. सुनेवर वडिलांप्रमाणे प्रेम करणे : ‘माझ्या सासर्‍यांना (बाबांना) त्यांच्या दोन्ही मुली अत्यंत प्रिय होत्या. ते स्वतःच्या मुलींवर जसे प्रेम करायचे, तसेच प्रेम त्यांनी माझ्यावर केले. मला प्रेमळ सासरेरूपी बाबा लाभले.

७ आ. साधनेत वेळोवेळी साहाय्य करणे : वर्ष २०२४ मध्ये गुढीपाडव्याच्या वेळी बाबांना हृदयाचा त्रास होत होता. त्यांना पुष्कळ दम लागत होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘‘बाबांना इतका त्रास होत आहे, तर आपण गुढीपाडवा कसा साजरा करायचा ? कसे गोड जेवण बनवून जेवायचे ?’ मी माझ्या मनातील विचार माझ्या यजमानांना सांगितला. तेव्हा त्यांनी हा विचार बाबांना भ्रमणभाषवर सांगितला. बाबा माझ्याशी बोलतांना म्हणाले, ‘‘आता हा जो विचार आहे ना, त्यात ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष आड येत आहे. देव प्रत्येकाला त्याच्या प्रारब्धानुसार आनंद देत असतो. ‘आज सण आहे ना ! तो आनंद देव देत आहे, तो घेऊया’, असा सकारात्मक विचार कर. तुझ्यातील ‘भावनाशीलता’ या स्वभावदोषावर मात करण्यासाठी प्रयत्न कर.’’

७ इ. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती दृढ श्रद्धा ! : आमचे बाबांच्या हृदयाचे शस्त्रकर्म करण्याच्या संदर्भात बोलणे चालू होते. बाबांना शस्त्रकर्माची प्रचंड भीती वाटत होती. एकदा श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा बाबांना भ्रमणभाष आला. त्या वेळी त्यांचे बोलणे ऐकून बाबांच्या मनातील शस्त्रकर्माविषयी असलेली भीती दूर झाली. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी बाबांना पुष्कळ आधार दिला. बाबा म्हणाले, ‘‘आता श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले आहे ना, तर सगळे चांगले होईल.’’ बाबांची श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या प्रती दृढ श्रद्धा होती.

७ ई. शस्त्रकर्मापूर्वी देण्यात येणारी भूल याच्या संदर्भात झालेली मनाची विचारप्रक्रिया : बाबांना वाटत असे, ‘शरिरातील एखाद्या अवयवाला झालेल्या आजारातून मुक्त करण्यासाठी शस्त्रकर्म करण्यापूर्वी ‘दुःख आणि वेदना यांची जाणीव होऊ नये’, यासाठी रुग्णाला भूल दिली जाते आणि नंतर शस्त्रकर्म करून रुग्णाला रोगमुक्त केले जाते. त्याप्रमाणेच प.पू. डॉक्टरांनी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेची संजीवनी देऊन कलियुगातील अहंकारी समाजाला उपकृत केले आहे. जन्मोजन्मींच्या पाळेमुळे घट्ट रोवून बसलेल्या स्वभावदोषांमुळे पृथ्वीतलावरील ६०० कोटी जनता भवरोगाने आजारी आहे. समाजातील व्यक्ती त्यांच्यामधील स्वभावदोषांमुळे ईश्वरापासून दूर जात आहेत आणि माझ्या देवाला पृथ्वीतलावर ‘ईश्वरी राज्य’, म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ आणायचे आहे. यामुळे आपण या अमूल्य संधीचा, म्हणजेच गुरूंच्या संकल्पाचा लाभ करून घेऊया.’ ‘असा साधनेला धरून असलेला विचार उच्च कोटीचे साधकच करू शकतात’, याची प्रचीती येते.

८. सौ. महानंदा विभूते (श्री. बाळासाहेब विभूते यांची भाची), कोल्हापूर

८ अ. ‘मामा आमच्या कुटुंबाचे आधारस्तंभ होते.

८ आ. ते श्री देव हालसिद्धनाथांचे निस्सीम भक्त होते. नाथांनी त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांपर्यंत नेले.

८ इ. इतरांचा विचार करणे : एकदा  मामा कागल येथे वस्तीला होते. त्या वेळी त्यांची बहीण, म्हणजे माझी आईही तेथे होती. ते एका खोलीत झोपले होते. तेथे पंखा लावला होता. तेथील जाळीचे दारही उघडे होते. मामांना थंडी वाजत होती; पण ‘बहिणीला पंखा हवा असेल’, असे समजून त्यांनी स्वेटर घातला, टोपी घातली आणि ते पांघरूण घेऊन झोपले.

८ ई. इतरांना साधना सांगणे : ‘पुष्कळ शिका आणि मोठे व्हा; पण साधना करा. साधनेत प्रगती करा’, असे मामा सारखे सांगायचे. ते प्रत्येक प्रसंगात साधनेचा दृष्टीकोन द्यायचे. ‘नामजप करत संसारात सुखी व्हा’, अशी मामांची शिकवण होती.’

९.  सौ. रंजना विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांची भावजय), कुर्ली, बेळगाव.

९ अ. ‘ते नात्याने माझे थोरले दीर होते; पण मला ते कधीच थोरले दीर वाटले नाहीत. ते मला नेहमी माझ्या मोठ्या भावाप्रमाणेच वाटत असत. 

९ आ. इतरांना साधना सांगून त्यांचे मतपरिवर्तन करणे : आमच्या घराच्या मागे रहाणार्‍या एका कुटुंबाशी काही कारणास्तव आमचे मतभेद झाले होते. दादा यात्रेच्या वेळी कुर्ली येथे आले असतांना त्या कुटुंबाने दादांना घरी बोलावले. ते दादांना गार्‍हाणे सांगत असतांना दादांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. दादांनी त्यांच्या घरून निघतांना त्यांना नामजपाचे महत्त्व समजावून सांगितले. ते त्या कुटुंबातील व्यक्तींना म्हणाले, ‘‘नामजप करा आणि सेवेमध्ये रमून जा.’’ दादांच्या या सांगण्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या संबंधात थोडी सुधारणा झाली. मला वाटते, ‘दादांनी सुचवलेल्या साधनेमुळेच हा पालट झाला असावा.’

१०. श्री. अजिंक्य विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांचा पुतण्या), बेंगळुरू

१० अ. सोन्याची साखळी सापडल्यावर कुणी त्या संदर्भात विचारण्यासाठी न आल्याने काकांनी ती एका आध्यात्मिक संस्थेला अर्पण करणे : ‘एकदा काकांना कार्यालयात सोन्याची साखळी सापडली. ‘ती साखळी कोणाची आहे ?’, याची त्यांनी बर्‍याच जणांकडे विचारणा केली; पण कुणीच समोर आले नाही. त्यानंतर त्यांनी एका मंदिराच्या बाहेर फलकावर लिहून ठेवले होते, ‘कुणाची सोन्याची साखळी हरवली असेल, त्यांनी ओळख पटवून घेऊन जा.’ नंतर कुणीच आले नाही. तेव्हा काकांनी ती साखळी एका आध्यात्मिक संस्थेला अर्पण केली.

१० आ. अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करणे : माझे लग्न झाल्यानंतर काका कागल येथे ४ दिवस रहायला आले होते. त्या वेळी मी कामानिमित्त पुणे येथे होतो. काकांनी ४ दिवसांत आपली कृती आणि संभाषण यांतून माझ्या पत्नीमध्ये अध्यात्माची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी माझ्या पत्नीला विचारले, ‘‘आपले कुलदैवत श्री वीरभद्र यांच्याविषयी ठाऊक आहे का ?’’ तेव्हा त्यांनी तिला वीरभद्राची गोष्ट सांगितली. सौ. पूजाला ते पुष्कळ आवडले.’

११. श्री. अवधूत विभूते (कै. बाळासाहेब विभूते यांचा पुतण्या), देहू, पुणे.

११ अ. साधक आणि मार्गदर्शक : आपल्या आयुष्यात काही व्यक्ती केवळ नातेवाईक म्हणून येत नाहीत, तर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होतात. त्यांचे अस्तित्व आपल्याला आधार देते, प्रेरणा देते आणि जगण्याची नवी दृष्टी देते. माझे पापा (काका) असेच एक तेजस्वी व्यक्तीमत्त्व होते. ते सनातन संस्थेचे निष्ठावान साधक, श्री देव हालसिद्धनाथांचे निष्ठावान भक्त आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्याचा ध्यास घेतलेले प्रेमळ आणि संयमी मार्गदर्शक होते.

११ आ. काकांची शिकवण : ते सांगत, ‘‘प्रेम आणि निरपेक्षता यांपेक्षा मोठे काहीही नाही. साधना आणि भक्ती हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा. परिवार आणि समाज यांसाठी निःस्वार्थ भावनेने कार्य करा. मृत्यू हा शेवट नसून एका नव्या प्रवासाचा आरंभ आहे.’’

१२. श्री. वेदांत लांजेकर (कै. बाळासाहेब विभूते यांचा नातू ,मोठ्या मुलीचा मुलगा), हडपसर, पुणे.

१२ अ. ‘माझे प्रेरणास्थान, म्हणजे माझे आजोबा. ते माझे एक चांगले आध्यात्मिक मित्र होते. 

१२ आ. आजोबांच्या डोळ्यांत मी नेहमी निस्वार्थी प्रेम पाहिले आहे, जे देवच करू शकतो.’   

१३. कु. आर्यन चंद्रशेखर राजमाने (कै. बाळासाहेब विभूते यांच्या लहान मुलीचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ५३ टक्के, वय १७ वर्षे), सातारा

१३ अ. आजोबांचे त्यांच्या आईवर पुष्कळ प्रेम होते. ‘आई-बाबांना विसरू नको’, असे ते मलाही सांगायचे. 

१३ आ. आजोबा म्हणजेच सहनशीलता. त्यांना हृदयविकाराचा त्रास होता. ते पथ्यपाणी पाळत होते. त्यांचे मनावर प्रचंड नियंत्रण होते. 

१३ इ. इतरांचा विचार करणे : ‘आधी दुसर्‍याचा विचार आणि मग स्वतःचा विचार. स्वतःला मिळाले नाही, तरी चालेल; पण दुसर्‍याला मिळायला हवे. दुसरा आनंदी व्हायला हवा’, अशी आजोबांची विचार करण्याची पद्धत होती. ते प्रत्येकाच्या आनंदात आनंद मानायचे.

१३ ई. ते मला ‘सारणीत चुका कशा लिहायच्या आणि स्वयंसूचना सत्रे कशी बनवायची ?’, याविषयी सांगत.

१३ उ. इतरांना साहाय्य करणे : आजोबांचे निधन झाल्यानंतर बेळगाव येथील त्यांचे मित्र आम्हाला भेटायला आले होते. तेव्हा त्यांनी आजोबांविषयी सांगितलेले ऐकून ‘एवढ्या घोर कलियुगातही असे मित्रप्रेम असते !’, याचे मला आश्चर्य वाटले. आजोबांच्या मित्रांनी सांगितले, ‘‘मी विभूतेकाकांमुळे सन्मार्गात आलो.’’

१३ ऊ. आजोबांनी सांगितलेली सूत्रे : आजोबा आम्हाला सांगत, ‘‘अभ्यास साधना म्हणून करायचा. प्रत्येक कृती ही साधना म्हणून करायची. प्रत्येक कृती करतांना ‘प.पू. गुरुमाऊली आपल्याला पहात आहे’, असा भाव ठेवायचा. घर हे आश्रमासारखे टापटीप ठेवायचे.’’

१३ ए. अनुभूती

१३ ए १. आजोबांच्या निधनानंतर त्यांच्या छायाचित्राच्या समोर बसून दत्तगुरूंचा नामजप करत असतांना सूक्ष्मातून दिसलेले दृश्य : आजोबांच्या निधनानंतर मी त्यांच्या छायाचित्राच्या समोर बसून दत्तगुरूंचा नामजप करत होतो. मी डोळे बंद केल्यावर थोड्याच वेळाने मला सूक्ष्मातून दिसले, ‘आजोबांचा पुढचा प्रवास चालू झाला आहे. ते नेहमीप्रमाणे स्मितहास्य करून आणि हात जोडून लीन होऊन पुढे पुढे जात आहेत. ते उत्साहाने आणि आनंदाने पुढच्या प्रवासाला जात आहेत. तिथेही आश्रम आहे आणि त्या आश्रमातील साधक आजोबांचे स्वागत करत आहेत. साधक आजोबांवर फुले उधळत आहेत. आजोबा पुष्कळ आनंदी आहेत.’

१४. श्री. गजानन कारेकर (कै. विभूते यांचे व्याही, धाकट्या सुनेचे वडील)

१४ अ. गुरूंप्रती भाव : ‘काका सहजावस्थेत असत. त्यामुळे ते नेहमी हसतमुख असत. काका बोलत असतांना त्यांचा प.पू. गुरुदेवांबद्दलचा भाव जाणवत असे.’

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २१.३.२०२५)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक