Retired Pakistani Major Adil Raza : पहलगाम आतंकवादी आक्रमणामागे चीन !

  • पाकचे निवृत्त मेजर आदिल रझा यांचा दावा !

  • आयात शुल्क युद्धामुळे भारताला अस्थिर करण्याचा चीनचा कट

  • जनरल मुनीर यांनी चीनच्या सांगण्यावरून रचला कट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पहलगाम येथील आक्रमणाचा कट पाकिस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी आखला होता. जनरल मुनीर यांची वैयक्तिक इच्छा पाकिस्तानवर १० वर्षे राज्य करण्याची आहे. हे सर्व एकाच योजनेचा भाग आहे. पाकिस्तानने हे एकट्याने आक्रमण केलेले नाही. चीनने त्याला यासाठी सिद्ध केले आहे, अशी माहिती पाकचे निवृत्त मेजर आदिल रझा यांनी ‘इंडिया टुडे’ नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत दिली.

मेजर (निवृत्त) आदिल रझा म्हणाले की,

पहलगाम येथील आक्रमणाशी चीनचा थेट संबंध नसला, तरी भारताच्या दुर्बलतेचा लाभ चीनला होतो, हे स्पष्ट आहे. चिनी कधीही आपापसांत लढत नाहीत. ते कधीही स्वतःला यात गुंतवत नाहीत. चीनने बांगलादेश, म्यानमार आणि श्रीलंका येथे आधीच त्याचे अस्तित्व प्रस्थापित केले आहे आणि आता मुनीर यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानही त्याच्या कक्षेत आला आहे.

यामागील कारण म्हणजे जागतिक स्तरावर अमेरिका आणि चीन यांच्यामधील स्पर्धा. अमेरिकेच्या आयात शुल्क युद्धानंतर मोठी आस्थापने चीन सोडण्याच्या सिद्धतेत आहेत. त्यांच्यासाठी भारत हा एक चांगला पर्याय आहे; परंतु चीन हे होऊ देऊ शकत नाही. चीन जगातील कारखाना असण्याचे बिरुद सोडण्यास सिद्ध नाही. हे करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे भारताला अस्थिर करणे; कारण जागतिक आस्थापने अशा ठिकाणी जाऊ इच्छित नाहीत जिथे युद्धासारखी परिस्थिती असेल.

संपादकीय भूमिका

  • पाकचा माजी सैन्याधिकारी अशा प्रकारची माहिती देतो, ती भारतीय गुप्तचरांना मिळाली होती का ? भारताला आता पाक आणि चीन या दोन्ही आघाड्यांवर युद्ध करण्याची सिद्धता ठेवावी लागणार !
  • अमेरिकेच्या आयात शुल्क वाढीचा हा परिणाम आहे, हे कदाचित् अमेरिकेला ठाऊक झाल्यानेच कधी नव्हे तो भारताला साहाय्य करण्यासाठी सिद्ध झाला आहे, असेच यातून लक्षात येते !