श्री. आप्पा परब, म्हणजे श्री. बाळकृष्ण सदाशिव परब ! यांचा जन्म ८ मे १९४० या दिवशी मुंबईत झाला. बालवयापासून त्यांनी शिवकालीन गड-दुर्ग यांचे प्रचंड आकर्षण ! शालेय जीवनापासून त्यांनी गड-दुर्ग पादाक्रांत करायला प्रारंभ केला. मॅट्रिकच्या शिक्षणानंतर वडिलांचे निधन झाल्यावर बहिणींचा विवाह आणि अन्य कौटुंबिक दायित्व पार पाडतांना त्यांनी दुर्गभ्रमंतीचा छंद सोडला नाही. सध्या श्री. आप्पांचे वय ८४ वर्षे आहे. त्यांनी एकूण २५० गड-दुर्गांची भ्रमंती केली आहे. त्यांच्याइतकी गड-दुर्ग भ्रमंती करणारा देशात क्वचितच कुणीतरी असावा. दुर्गभ्रमंती करणारे आणि त्यांची आवड असणारे अनेक जण आहेत; मात्र आप्पांचे थोरपण हे की, त्यांनी अबोल दगडा-मातीच्या गड-दुर्गांमधील हिंदूंच्या पराक्रमाचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य, शिव-शंभूंचा पराक्रम महाराष्ट्रातील लाखो युवकांपर्यंत पोचवला आणि त्यांच्यातील हिंदुत्व जागृत केले. श्री. आप्पांचे हे योगदान अतुलनीय आहे. शिवकालीन गड-दुर्ग यांनी शिवप्रताप पाहिला; मात्र या अबोल मर्द मावळ्यांना हा इतिहास ना लिहिता येत होता, ना पोवाड्यातून सांगता येत होता, ना साहित्यातून मांडता येत होता. आप्पांनी या भावना स्वत: अभ्यासल्या, सत्यता पडताळण्यासाठी त्यांचे संशोधन केले आणि संदर्भासह शिवप्रताप महाराष्ट्रासह देशवासियांपर्यंत पोचवला. या लेखाच्या माध्यमातून आधुनिक मावळ्याचे हे शिवकार्य त्यांच्याच शब्दांत समजून घेऊया !

विशेष सदर
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यासाठी मावळे आणि शिलेदार यांनी केलेला त्याग सर्वोच्च आहे, त्याप्रमाणे आजही अनेक हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी नागरिक धर्म-राष्ट्र यांच्या रक्षणासाठी ‘शिलेदार’ म्हणून कार्य करत आहेत. त्यांची आणि त्यांच्या हिंदु धर्मरक्षणाच्या संघर्षाची माहिती करून देणार्या ‘हिंदुत्वाचे शिलेदार’ या सदराद्वारे इतरांनाही प्रेरणा मिळेल. या उदाहरणांतून आपल्या मनातील चिंता दूर होऊन उत्साह निर्माण होईल ! – संपादक
१. ज्यांनी रक्त सांडून इतिहास घडवला, त्यांचा इतिहास सांगण्यासाठी पैसे घेणे मान्य नाही !

अनेक इतिहासकार, व्याख्याते बिदागी (पैसे) घेऊन राष्ट्रपुरुषांचा इतिहास सांगतात. हे सर्वच काही व्यावसायिक असतात, असे नाही; मात्र कौटुंबिक दायित्वही असल्यामुळे त्यासाठी व्याख्याते बिदागी घेतात. काही जण व्याख्यानांसाठी व्यावसायिकांप्रमाणे भरमसाठ बिदागी घेतात; परंतु आर्थिक स्थिती बेताची असलेल्या श्री. आप्पांनी इतिहास सांगण्यासाठी कधीच पैसा घेतला नाही. इतिहास सांगण्याच्या सेवेसाठी प्रदर्शनाच्या आयोजकांनी देऊ केलेल्या मानधनातील एकही रुपया त्यांनी कधी घेतला नाही. सिंहगडाच्या भेटीच्या वेळी वयाच्या १० व्या वर्षी आप्पांनी शपथ घेतली. ‘शिवकाळात ज्या विरांनी रक्ताचे थारोळे करून इतिहास रचला, त्यांचा इतिहास सांगायची किंवा लिहायची संधी मिळाल्यास मानधन घेणार नाही. आयुष्यभर त्यांनी ही शपथ तंतोतंत निभावली. राष्ट्राविषयी स्वाभिमान असलेला प्रखर राष्ट्रनिष्ठच हे करू शकतो. राष्ट्रनिष्ठेच्या गप्पा मारणारे अनेक असतात; परंतु वैयक्तिक जीवनात त्याचा अंगीकार करणारे मोजके असतात. श्री. आप्पा त्यांमधील एक कर्मयोगी आहेत.
२. विविध संदर्भांचा सखोल अभ्यास
त्यांची घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. वडिलांच्या निधनानंतर घरखर्च चालवण्यासाठी त्यांनी दादर (पश्चिम) येथे पुस्तकविक्री चालू केली. हे सांभाळून सुटीच्या दिवशी गड-दुर्ग यांची ते भ्रमंती करायचे. ही भ्रमंती म्हणजे काही पर्यटन नव्हते, तर ते संशोधन होते. शिवकालीन संदर्भ, कादंबर्या, बखरी, पिढीजात आलेली कागदपत्रे आदींचा श्री. आप्पांनी सखोल अभ्यास केला. विविध संदर्भांची टिपणे स्वत:कडे नोंदवून ठेवली. त्यांची पडताळणी करून त्यांच्या सत्यतेची निश्चिती केली. महाराष्ट्रात अशा शेकडो गड-दुर्गांचे संदर्भ त्यांनी स्वत:कडे लिखित स्वरूपात ठेवले. श्री. आप्पांची पुस्तके आणि त्यांच्या तोंडून निघणारा वीररसयुक्त इतिहास, म्हणजे त्यांच्या या गाढ्या अभ्यासाचा परिपाकच म्हणावा लागेल.
३. गरिबी पत्करली; पण व्रत सोडले नाही !
मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर आणि वडिलांच्या मृत्यूनंतर कौटुंबिक दायित्व पार पाडण्यासाठी घरोघरी वृत्तपत्र वितरणाचे काम करणे, उन्हाळ्यामध्ये परीक्षेचे निकाल लागल्यावर पुस्तके विक्रीच्या दुकानात नोकरी करणे अशा प्रकारे अर्थार्जन करून श्री. आप्पांनी कुटुंब चालवले. वडील ज्या मिलमध्ये नोकरीला होते, त्यामध्ये श्री. आप्पा नोकरीला लागले; मात्र गिरणी कामगारांच्या संपानंतर मिलस् बंद पडल्या. त्यानंतर श्री. आप्पांनी जुनी पुस्तके, अंक यांच्या विक्रीचा धंदा चालू केला. यातून त्यांनी बहिणींच्या विवाहाचे कौटुंबिक कर्तव्य पार पाडले. या काळात अनेक संस्था, संघटना यांच्यासमवेत गड-दुर्ग भ्रमंती करून श्री. आप्पांनी अनेक युवकांपर्यंत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पोचवला; मात्र हे सर्व त्यांनी सेवाभावातून केले. यासाठी त्यांनी मानधन कधीच घेतले नाही.
केवळ इतिहास नव्हे, संस्कार रूजवणारे आप्पा !
वर्ष २०२३ च्या चतुरंग रंगसंमेलनात ‘त्रिवेणी’ हे पुस्तक श्री. आप्पांच्या कार्यावर काढण्यात आले. यामध्ये आप्पांचे जावई श्री. अरविंद शिंदे यांचा ‘एक आधारवड मित्र’ असा श्री. आप्पांवरील लेख आहे. त्यामध्ये त्यांनी आप्पांविषयी एक प्रसंग लिहिला आहे. श्री. आप्पांनी त्यांना ‘एक वेळ माझ्या मुलीला उपाशी ठेवलेस तरी चालेल; पण चुकीच्या मार्गाने पैसे कधीच कमवू नकोस’, असे सांगितल्याचे लिहिले आहे. यातून श्री. आप्पांमधील सज्जनतेचा प्रत्यय येतो. त्यांच्या या उपदेशाप्रमाणे त्यांनी स्वत:च्या जीवनातही यांचे तंतोतंत पालन केले. श्री. आप्पांनी त्याच्या मुलांवर आणि नातवंडांवर चांगले संस्कार केले आणि त्यांना छत्रपती शिवरायांचा इतिहासही शिकवला. ‘आपली भावी पिढी शिक्षित नव्हे, तर सुसंस्कृत घडण्यासाठी प्रयत्न करायला हवेत’, याचा बोध श्री. आप्पांच्या कृतीतून सर्वांनीच घेण्यासारखा आहे.
तरुणांनी किल्ल्यांचा अभ्यास करावा; आप्पा परब यांचे आवाहन | Appa Parab | Chhatrapati Shivaji Maharaj
(सौजन्य : Hindusthan Post)
गड-दुर्ग भ्रमंतीसमवेत व्याख्याने, लेखन, मार्गदर्शन यांद्वारे श्री. आप्पांनी आयुष्यभर शिवकालीन इतिहास सर्वांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. यासाठी श्री. आप्पांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यांच्या या अथक प्रयत्नांतून पुढच्या पिढीसाठी मोलाचा ठेवा प्राप्त झाला आहे. श्री. आप्पांच्या या निरपेक्ष कार्यातून आणि राष्ट्रप्रेमातून लाखो युवकांमध्ये राष्ट्रकार्य करण्याची प्रेरणा निर्माण झाली आहे, असे निश्चितपणे म्हणता येईल.
४. हिंदुत्वाचा अभिमान आणि स्वराज्याचा स्वाभिमान निर्माण करणारी इतिहास सांगण्याची शैली !
‘याचा उंबरठा ओलांडून आत जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. हिंदवी स्वराज्य संस्थापक आणि स्वतंत्रतेचा मंत्र सांगणारे छत्रपती शिवाजी महाराज; शत्रूच्या उरात धडकी भरवून, स्वधर्मासाठी कसे मरावे, हे सांगणारे छत्रपती संभाजी महाराज; चारही बाजूंनी शत्रूचा विळखा पडल्यानंतरही कसे लढावे, हे सांगणारे छत्रपती राजाराम महाराज, आपल्या पंतप्रधानांना (थोरले बाजीराव पेशवे यांना) अटकेपार झेंडा फडकवायला पाठवणारे छत्रपती शाहू महाराज आणि या चारही छत्रपतींना संस्कार देणार्या राजमाता जिजाऊ ! यांचा पदस्पर्श या उंबरठ्याला झालेला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झालेली आहे. त्यांच्या आदर्शांचा एकतरी किरण आपल्या चारित्र्यात सामावून घ्या आणि मगच आपले पाऊल उंबरठ्याच्या आत ठेवा; पण मनात जर अविचार असेल, तर आल्या पाऊली मागे फिरा’, या शब्दांत श्री. आप्पा किल्ले रायगडाच्या महाद्वाराचे वर्णन करतात. ‘हिंदुत्वाचा अभिमान आणि स्वराज्याचा स्वाभिमान निर्माण करणारा हा इतिहास असाच ओठांवर येत नाही, तो अंत:करणात असावा लागतो’, अशा श्री. आप्पांचे अंत:करण हे तेजस्वी इतिहासाचे संग्रहालय आहे.
५. भावी पिढीपर्यंत शिवप्रताप पोचवण्याचे महत्कार्य !
अनेक शिवप्रेमी, दुर्ग संवर्धक संस्था गडभ्रमंतीसाठी श्री. आप्पांशी संपर्क करून गड-दुर्गांचा इतिहास जाणून घेण्यासाठी मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करत. त्या वेळी श्री. आप्पा त्यांच्यासमवेत उत्साहाने जात. गडाच्या पायरीपासून इत्यंभूत इतिहास ते सांगत. एका अंत:करणातून अन्यांच्या अंत:करणात जाणारा हा इतिहास, म्हणजे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या भावी पिढीचे भवितव्य होते. ‘इतिहासाचे आकलन निव्वळ पुस्तके वाचून होत नसते, तर त्यासाठी प्रत्यक्ष स्थळावर जाऊन तेथील भौगोलिक रचनेची त्याच्याशी सांगड घालावी लागते’, हे श्री. आप्पांचे ब्रीदवाक्य आहे. ते न थकता आणि अखंड उत्साहाने तरुणांना शिवप्रताप सांगतात अन् युवा पिढी तितक्याच तन्मयतेने हा इतिहास ऐकते.
आप्पांची ग्रंथसंपदा

श्री. आप्पांनी वर्ष २००४ मध्ये ‘छत्रपती शिवरायांचा आरमारी सुभेदार मायाजी नाईक भाटकर’ हे पहिले पुस्तक लिहिले. त्यानंतर ‘शिवजन्म’, ‘किल्ले पन्हाळा औरंगहणाख्यान’, ‘किल्ले रायगड प्रदक्षिणेच्या वाटेवर’, ‘शिवरायांच्या अष्टराज्ञी’, ‘किल्ले राजगड प्रदक्षिणेच्या वाटेवर’, ‘श्री भवानी तलवार’, ‘किल्ले राजगड बखर’, ‘घोडखिंडीची साक्ष’ आदी ३४ पुस्तके श्री. आप्पांनी लिहिली आहेत.
अद्याप ६ पुस्तकांचे प्रकाशन व्हायचे आहे. ही सर्व पुस्तके श्री. आप्पांनी गड-दुर्ग यांची भ्रमंती करून, ऐतिहासिक कागदपत्रांचे संदर्भ आणि त्यांचा सखोल अभ्यास करून लिहिली आहेत. त्यांच्या या पुस्तकांमुळे देशभरातील लाखो युवकांपर्यंत छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास पोचला आहे.
६. शिवकार्य प्रसाराला कुटुंबियांची मोलाची साथ !

जेव्हा थोर पुरुषांचा मोठेपणा कथन केला जातो, तेव्हा त्यामागे निश्चितच त्यांच्या कुटुंबियांचाही त्याग मोठा असतो. शिवकार्याचा प्रसार हा श्री. आप्पांचा व्यवसाय नव्हता, तर कर्तव्य भावनेतून त्यांनी आत्मीयतेने केलेले कार्य आहे. यासाठी श्री. आप्पा अनेकदा गड-दुर्गांवर अनेक दिवस जात. यातून कोणते अर्थार्जन नसल्यामुळे कुटुंबियांची आर्थिक ओढाताण होणे साहजिकच आहे; परंतु यामुळे श्री. आप्पांची पत्नी किंवा मुलांनी कधीच कटकट केली नाही. श्री. आप्पांच्या शिवकार्य प्रसाराच्या कार्यातील हे एकप्रकारचे अमूल्य योगदानच म्हणावे लागेल.
७. अनेक पुरस्कारांनी सन्मान

‘गिरीमित्र’ संमेलनात ‘जीवनगौरव’ पुरस्कार, ‘वैद्य पाटणकर काढा जीवनगौरव’ पुरस्कार, ‘मुंबई कॉईंस कलेक्टर जीवनगौरव’ पुरस्कार, ‘चतुरंग जीवनगौरव’ पुरस्कार आदी अनेक पुरस्कारांनी आप्पांना सन्मानित करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील अनेक संस्थांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते यांसमवेत श्री. आप्पांनी एकही पैसा मानधन न घेता गडभ्रमंती करत त्यांना त्यांची माहिती दिली.