पहलगाम आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ हिंदुत्वनिष्ठांनी सावंतवाडी शहरात लावलेला फलक प्रशासनाने हटवला !

हिंदुत्वनिष्ठांनी लावलेल्या बॅनरवरील काही लिखाण कागद चिकटवून झाकण्यात आले

सावंतवाडी – पहलगाम येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या निषेधार्थ शहरात हिंदुत्वनिष्ठांकडून छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाचा कोथळा बाहेर काढत असलेला प्रसंग दर्शवणारा ‘दहशतवाद असाच संपवावा लागतो’, असे लिहिलेला, तसेच या आक्रमणाचा निषेध करणारे अन्य लिखाण असलेला बॅनर (फलक) शहरात लावण्यात आला होता. या बॅनरवर आक्षेपार्ह लिखाण असल्याचे कारण देत, तसेच ‘शहरातील सलोखा कायम रहावा’, असे सांगत नगरपालिका आणि पोलीस यांनी हा फलक हटवला. याला हिंदुत्वनिष्ठांनी  विरोध केल्याने शहरात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर हिंदुत्वनिष्ठांची समजूत काढून प्रशासनाने तो बॅनर पोलीस बंदोबस्तात हटवला.

२९ एप्रिल या दिवशी शहरातील तीन मुशी येथे हिंदूंनी एकत्र येत हा बॅनर लावला होता. बॅनरवर प्रशासनाने आक्षेप घेतल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी ‘त्या बॅनरवर कोणताही आक्षेपार्ह मजकूर नव्हता. त्यामुळे तो बॅनर काढू नये’, अशी मागणी केली; मात्र ती नाकारण्यात आली. मुख्याधिकारी पाटील आणि पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी हिंदुत्वनिष्ठांची समजूत काढली आणि बॅनरवरील काही लिखाणावर कागद चिकटवून तो कह्यात घेतला. तसेच यापुढे बॅनर लावण्यास आवश्यक ती अनुमती घेण्याची सूचना केली.

या वेळी ‘आमचा बॅनर काढलात, तर शहरातील सगळेच अनधिकृत बॅनर काढा’, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी केली. त्यानुसार शहरातील अनधिकृत बॅनर हटवण्याची कार्यवाही चालू करण्यात आली. यासाठी सावंतवाडी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अश्विनी पाटील यांनी पुढाकार घेतला.

शहरात बॅनर लावण्याच्या अनुषंगाने पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाने राजकीय पदाधिकारी, बॅनर छापणारे आदींची बैठक घेतली होती. तरीही हा बॅनर लावण्यात आल्याने कारवाई करण्यात आल्याची चर्चा येथे होती.