मराठी राजभाषा निर्धार समितीचा शिरोडा येथे मेळावा

फोंडा, ३० एप्रिल (वार्ता.) – मराठी राजभाषेचा लढा हा केवळ भाषेपुरता मर्यादित नाही, तर तो राष्ट्रीयत्व, संस्कृती आणि अस्मिता रक्षणासाठीचा लढा आहे. गोव्यात मराठी जिवंत राहिली नाही, तर राष्ट्रीयत्वाचे विचार जन्माला येणार नाहीत. आपल्या ४० वर्षांच्या सामाजिक आंदोलनातून ‘मराठी भाषेमध्येच गोव्याच्या भावी पिढीचे भवितव्य दडलेले आहे’, या ठाम निष्कर्षावर मी येऊन पोचलो आहे, असे आवाहन ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’चे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.
‘मराठी राजभाषा निर्धार समिती’ने जनजागरण अभियानाच्या अंतर्गत शिरोडा येथे २९ एप्रिल या दिवशी एक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात प्रा. सुभाष वेलिंगकर बोलत होते. या वेळी व्यासपिठावर गो.रा. ढवळीकर, डॉ. गोविंद देव आणि श्री. मच्छिंद्र च्यारी यांची उपस्थिती होती.
मराठीच्या द्वेषापोटी इंग्रजीकरणाला वाव मिळाला ! – गो.रा. ढवळीकर
याप्रसंगी गो.रा. ढवळीकर म्हणाले, ‘‘कोकणीला झुकते माप दिल्याने आज गोव्याचे झपाट्याने इंग्रजीकरण होत चालले आहे. मराठीच्या द्वेषापोटी कोकणी भाषा म्हणून वाढली नाही, तर याउलट इंग्रजीकरणाला वाव मिळाला. याला सरकारचे धोरण उत्तरदायी आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्रातून गोव्यात आलेली नाही, तर त्याची उत्पत्ती ही गोव्यातच झालेली आहे. संत ज्ञानेश्वराच्या कालखंडातही गोव्यात मराठी भाषेतून भक्तीसाहित्याची निर्मिती झालेली आहे. संत कृष्णदास श्यामा यांचे ‘श्रीकृष्णचरित्र’ हा त्याचा ठोस पुरावा आहे. मराठी नाटकांची उत्पत्तीही गोव्यातून झाल्याचे संदर्भ मिळतात. येथील साहित्य, कला, संगीत हे सर्व मराठी भाषेतूनच फुलले आणि विकसित झाले. त्यामुळेच ‘महाराष्ट्र गोव्याच्या गळ्याने गातो’, ही म्हण खोटी नाही. यावरून गोव्यात मराठीची महती वेगळी सांगायला कुणा प्रकांड पंडिताची आवश्यकता नाही.’’ मेळाव्याचे सूत्रसंचालन डॉ. गोविंद देव यांनी केले. वक्त्यांचा परिचय वंदना पाटील यांनी करून दिला, तर आभार रूपेश नाईक यांनी मानले. या वेळी श्रावणी नाईक यांनी पोवाडा गाऊन मराठीप्रेमींमध्ये ऊर्जा निर्माण केली.