सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) प्रणालीचा शुभारंभ !

(एआय – आर्टिफिशियल इंटेलिजन्स, म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता)
सिंधुदुर्गनगरी – पंतप्रधान नरेंद्र मोदी कृत्रिम बुद्धीमत्तेच्या (‘एआय’च्या) कार्यक्रमासाठी आज (१ मे या दिवशी) मुंबईत आले आहेत आणि याच दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणालीचा शुभारंभ होत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा कृत्रिम बुद्धीमत्ता वापरणारा देश आणि राज्यातील पहिला जिल्हा म्हणून ओळखला जाणार आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरिकांना अल्प कालावधीत दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असून सर्वांच्या साथीने यात आपण निश्चितच यशस्वी होऊ, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.
‘एआय’प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याने आत्मसात केली असून प्रशासनात त्याचा वापर करण्याचा शुभारंभ १ मे या महाराष्ट्र दिनी आणि सिंधुदुर्ग जिल्हा स्थापनादिनी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर येथील शरद कृषी भवन येथे आयोजित शुभारंभाच्या कार्यक्रमात मंत्री राणे बोलत होते. या वेळी मंत्री राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ‘एआय’युक्त जिल्हा करण्यामागील संकल्पना विशद केली.
राणे पुढे म्हणाले. ‘‘जिल्ह्याला विकसित करतांना अल्प मनुष्यबळ, डॉक्टर आणि कर्मचारी यांची कमतरता, अशी अनेक आव्हाने आहेत. प्रत्येक विभागात ४५ ते ५५ टक्के कर्मचारी आहेत. १०० टक्के उत्पादकता मिळवण्यासाठी आपल्याला मार्ग शोधावा लागेल. कर्मचार्यांच्या अभावामुळे निर्माण झालेली दरी ‘एआय’च्या माध्यमातून भरता येऊ शकते.
‘एआय’मुळे कुणाच्या नोकर्या जाणार नाहीत, तर प्रमाण वाढेल. ‘एआय’ आम्हाला माहिती पुरवेल आणि ती माहिती आम्ही संकलित करू. सामान्य नागरिकांचा जिल्हा परिषद, तहसील कार्यालय, तलाठी कार्यालय येथे अल्प वेळ जावा. नागरिकाचे काम पूर्ण करून तो आनंदाने परत स्वत:च्या गावाकडे निघावा, या दृष्टीकोनातून ‘एआय’चा वापर होणार आहे. वनखाते, पोलीस प्रशासन यांनाही ‘एआय’ प्रणालीचा उपयोग होणार आहे. पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात साहाय्य होणार आहे.’’
अडचणी असल्या, तरी इच्छाशक्तीने प्रारंभ केल्यास यश निश्चित ! – पालकमंत्री‘सिंधुदुर्ग जिल्हा दुर्गम जिल्हा आहे. जिल्ह्यात ही प्रणाली वापरण्यासाठी काही अडचणी येऊ शकतात’, असा प्रश्न या कार्यक्रमात विचारला असता मंत्री राणे म्हणाले, ‘‘प्रश्न योग्य आहे; मात्र आम्ही ठरवले की, प्रवासाला प्रारंभ तरी करूया. नकारात्मक विचार करून उपयोग नाही. आपल्याला जर काही करायचे असेल, तर इच्छाशक्ती हवी आणि प्रवाहाच्या विरुद्ध प्रवास करायला प्रारंभ केला पाहिजे, तरच निश्चितपणे यश मिळू शकते.’’ |