९ कोटी व्यापार्यांची संघटना पाकिस्तानला आर्थिक धक्का देणार !
नागपूर – ‘कॉन्फेड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (‘कॅट’ने) पाकिस्तानसमवेतचा व्यापार तात्काळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. कॅटसमवेत देशभरातील ४० सहस्र छोट्या व्यापारी संघटना जोडल्या आहेत. संघटनेच्या सदस्य व्यापार्यांची संख्या ९ कोटी आहे.
‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी सांगितले की, देशहित सर्वतोपरी असून व्यापार हित दुय्यम आहे. या निर्णयामुळे साखर, सिमेंट, लोह-पोलाद, ऑटोमोबाईल पार्ट्स आणि टायर-ट्यूबसारख्या वस्तूंसाठी पाकिस्तानी व्यापारी आणि तेथील नागरिक यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. भारताला पाकिस्तानमधून येणार्या सुक्या मेव्याला मुकावे लागणार असले, तरी त्याविना रहाण्याची सिद्धता करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. वर्ष २०१९ मधील पुलवामा आक्रमणानंतर भारत-पाकिस्तान व्यापारी संबंध बिघडले होते. भारताने पाकिस्तानमधून येणार्या वस्तूंवरील आयात शुल्क २०० टक्क्यांपर्यंत वाढवले होते. वर्ष २०१७-१८ मध्ये पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात ४८८.५ दशलक्ष डॉलर्स होती. फळे आणि सिमेंट या वस्तूंची आयात मोठ्या प्रमाणात होत होती.
कॅटने स्पष्ट केले की, जोपर्यंत पाकिस्तानी व्यापारी आणि नागरिक त्यांच्या सरकारवर आतंकवाद नियंत्रणासाठी दबाव आणत नाहीत, तोपर्यंत व्यापार बंद राहील.
संपादकीय भूमिका :राष्ट्रहितासाठी ‘कॅट’ने असा निर्णय घेतल्याविषयी त्यांचे अभिनंदन ! अशा पद्धतीने पाकच्या मालावर बहिष्कार घालून पाकला होणारी निर्यात थांबवल्यास पाकचे आर्थिक कंबरडे मोडेल. पाकला वठणीवर आणण्यासाठी असे करणे आवश्यक आहे ! |