
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्याला अमली पदार्थांचा विळखा पडला आहे. गोवा राज्यातून जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री करणारी टोळी सक्रीय आहे. अमली पदार्थांची विक्री आणि अवैध व्यवसाय यांमुळे संघटित गुन्हेगारी वाढण्याची भीती आहे. युवा पिढीला अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने ती व्यसनाधीन होत आहे. पोलीस यंत्रणा हे थांबवण्यात अपयशी ठरली आहे. येत्या १५ दिवसांत पोलिसांनी या व्यवसायांवर आळा न घातल्यास अशा अवैध व्यवसायांच्या विरोधात आंदोलन करू, अशी चेतावणी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाची शाखा असलेल्या युवासेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत नाईक बोलत होते. या वेळी युवासेनेचे जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेनेचे पदाधिकारी गुरुनाथ पेडणेकर, रोहित राणे, योगेश धुरी आदी उपस्थित होते.
सुशांत नाईक पुढे म्हणाले, ‘‘पालकमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर मंत्री राणे यांनी ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री होऊ देणार नाही, अवैध व्यवसाय चालू देणार नाही’, अशा घोषणा केल्या होत्या. त्यानंतर एक महिना या व्यवसायांचे प्रमाण अल्प झाले होते; मात्र आता पुन्हा अवैध व्यवसाय चालू झाले आहेत. अवैध व्यवसाय करणारे काहीजण त्यांच्या व्हॉटस्ॲपच्या स्टेटसवर (स्टेटस म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी सामाजिक माध्यमांच्या स्वतःच्या खात्यावर प्रसारित केलेले चित्र किंवा लिखाण) पालकमंत्री नितेश राणे यांचे छायाचित्र ठेवतात. त्यामुळे असे व्यवसाय करणार्यांना पालकमंत्री राणे यांचे अभय आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री राणे यांचे बंधू आमदार नीलेश राणे यांनी अवैध व्यवसायांविषयी प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे पालकमंत्री अवैध व्यवसायाचे सूत्र गंभीरपणे घेऊन अशा अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करणार आहेत का ?’’