युवा साधकांना सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचा लाभलेला अनमोल सत्संग आणि या सत्संगात प.पू. गुरुदेवांनी केलेले मार्गदर्शन ! 

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण १ मे २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908900.html

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

८. साधकांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

८ अ. ‘गुरुदेवांचे दर्शन होणार आहे’, हे समजल्यावर साधिकेला पुष्कळ अस्वस्थता येणे आणि त्यांच्या आगमनापूर्वी भाव जागृत होऊन तिला सूक्ष्म गंध येणे

श्री. चेतन राजहंस : ही कु. साक्षी पाटील. ही कोल्हापूरहून आली आहे. ती चित्रकलेत प्रवीण असून सुंदर रांगोळ्या काढते आणि तिचे हस्ताक्षरही सुंदर  आहे.

कु. साक्षी पाटील (कोल्हापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, मला चांगले हिंदी बोलता येत नाही, तरी हिंदीत बोलण्याचा प्रयत्न करीन. मी आश्रमात आल्यापासून मला पुष्कळ काही शिकायला मिळत आहे. सर्व साधकांकडून ‘प्रेमाने कसे रहायचे ?’, हे शिकायला मिळत आहे. येथे आल्यावर मला पुष्कळ आनंद झाला आहे. गुरुदेव, मला काल समजले की, ‘आज आपले दर्शन होणार आहे’, तर काल रात्रीपासून मला पुष्कळ अस्वस्थता वाटत होती. आज सकाळपासून माझ्या मनात हाच विचार येत होता की, ‘गुरुदेवांचे दर्शन होण्यासाठी अाता काही क्षणच बाकी राहिले आहेत.’ गुरुदेव, आपल्या आगमनापूर्वी माझी पुष्कळ भावजागृती होत होती आणि मला पुष्कळ सुगंधही येत होता.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला सूक्ष्मातील सुगंध येतो का ? सूक्ष्म, म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडले !

कु. साक्षी पाटील : हो.

परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ छान ! साधनेमध्ये तुझी लवकर प्रगती होईल !

८ आ. आश्रमाच्या कणाकणांत गुरुदेवांचे दर्शन होणे, स्थूल रूपात दर्शन देण्यासाठी त्यांना प्रार्थना होणे आणि त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर ‘चित्रफीत पहात आहे’, असे वाटणे

कु. ईश्वरी न्यामणे (सोलापूर, महाराष्ट्र) : मी साधना करत नव्हते. तेव्हा मी केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचायचे. गुरुदेव, मला ‘आपल्याला भेटावे’, असे आतून वाटत होते. मी शिबिरासाठी आश्रमात येण्यास निघाले. तेव्हा माझ्या मनात ‘कृतज्ञता’ असा जप चालू होता. त्या वेळी  ‘परम पूज्य, मला तुम्ही स्थूल रूपात दर्शन द्या, दर्शन द्या’, असे मनात घोकत मी झोपले. नंतर आपण माझ्या स्वप्नात आला होतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुझा ‘दर्शन द्या, दर्शन द्या !’ असा जप चालू होता का ?

ईश्वरी न्यामणे : हो. संपूर्ण आश्रमातील जलदेवता, भिंती, आश्रमातील ताटे आदी सर्वांमध्ये मला आपणच दिसत होतात. आश्रमातील कणाकणांत आपणच दिसत होतात आणि ‘परम पूज्य मला दर्शन द्या’, अशी प्रार्थना होत होती. आता मी आपल्याला पहात आहे, तर ‘मी चित्रफीत पहात आहे’, असे मला वाटत आहे. माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही. एरव्ही मी जेव्हा नामजप करायला बसते, तेव्हा नामजप करायला माझे मन सिद्ध नसते. काही वेळा प.पू. भक्तराज महाराज यांचे भजन किंवा एखादे आध्यात्मिक गीत लावलेले असेल, तर त्यावर मी मनातल्या मनात नृत्य करते. वास्तविक मला नृत्य करायला येत नाही, तसेच गायनही येत नाही; परंतु त्या गाण्यामधील बोल मी आश्रमातील आपल्या निवासकक्षाच्या दारासमोर म्हणत असते. जेव्हा आपल्या निवासकक्षाचे दार बंद असते, तेव्हा मी आपल्याला प्रार्थना करते, ‘गुरुदेव, दार उघडा. मला स्थूल रूपात दर्शन द्या.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : मग मी दार उघडतो कि नाही ?

ईश्वरी न्यामणे : नंतर उघडता !

परात्पर गुरु डॉ. आठवले : छान अनुभूती आहे.

८ इ. गुरुदेवांच्या सत्संगामुळे सर्वांसमोर बोलता न येण्याचे साधिकेचे भय आपोआप दूर होणे

कु. सहर्षा मुदकुडे (पुणे, महाराष्ट्र) : येथे आल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की, मी अगदी मोजके बोलते; कारण मला बोलायची भीती वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आज चांगले बोलत आहेस !

कु. सहर्षा मुदकुडे : मी आपल्या कृपेमुळेच बोलू शकत आहे. नाहीतर मला भीती वाटते, उदा. सभागृहात एखादे सत्र चालू असल्यास मला भीती वाटते की, ‘मी माझा हात वर कसा करू ?’ तेव्हा माझ्या मनात प्रतिमेचे विचार येतात, ‘मला बोलायला जमणार नाही किंवा मी जो विचार केला आहे, तो योग्य प्रकारे सांगू शकीन कि नाही ?’, अशी भीती वाटते. आता तशी भीती वाटत नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : ईश्वर एकेक इच्छा कशी पूर्ण करतो ना !

८ ई. साधिकेचा ‘गुरुदेव आणि देवता यांनी लहानपणापासून सांभाळले असून भगवान श्रीकृष्ण अन् हनुमान स्वतःचे बंधू आहेत’, असा भाव असणे

कु. समृद्धी धुळाज (वर्ष २०२४ ची आध्यात्मिक पातळी ६० टक्के, गहहिंग्लज, कोल्हापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, आपणच मला जन्मापासूनच आतापर्यंत सांभाळले आहे. मी गावात एकटीच धर्मप्रसारासाठी जात असे. रात्रीच्या वेळी सर्वत्र पुष्कळ अंधार असायचा आणि काही वेळा गावातून मी एकटीच घरी परत येत असे. एकदा माझ्या पायावरून सर्प गेला; परंतु त्या वेळी मला भीती वाटली नाही. तेव्हा मी प्रसार करायला जायचे आणि आई-बाबा सत्संग घेण्यासाठी जायचे. काही वेळा मी घरी एकटीच असे; कारण ते दोघे रात्री ११ ते १ वाजेपर्यंत घरी यायचे नाहीत. त्या वेळी ‘मी एकटी असल्यामुळे मला भीती वाटली’, असे कधीच झाले नाही. ‘आपण माझ्यासह सतत आहात, समवेत श्रीकृष्ण आहे, हनुमान आहे, ते माझे बंधूच आहेत’, असे मला वाटायचे. माझ्यासमोर साक्षात मृत्यू उभा होता; परंतु आपणच मला त्यातून वाचवले. असे पुष्कळ वेळा झाले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : नेमके काय घडले होते ?

कु. समृद्धी धुळाज : मी पुष्कळ लहान होते. तेव्हा माझे आई-बाबा एका मंदिरात सेवा करत होते. ते मंदिरातील भांडी घासत होते. तेथे मी एकटीच होते आणि अकस्मात् नदीत वाहून जाऊ लागले. मला पोहता येत नव्हते. मी थोड्या दूर अंतरावर वहात गेल्यानंतर माझ्या आईच्या लक्षात आले की, मी कुठे दिसत नाही. तेव्हा आईने बाबांना सांगितले की, ‘समृद्धी दिसत नाही.’ त्या वेळी त्यांना नदीच्या पाण्यावर माझा केवळ हात दिसत होता. बाकी मी संपूर्ण बुडाले होते. नंतर दोन साधकांनी मला नदीतून बाहेर काढले. त्या वेळी आपणच मला जीवनदान दिले. आतापर्यंत मी जिवंत आहे, ते केवळ आपल्यामुळेच आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : बाप रे !

८ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दर्शनाने साधिकेचा भाव जागृत होऊन ‘मायेचे विचार सोडून त्यांच्या चरणी जायचे आहे’, असे तिला वाटणे

कु. सावित्री गुब्याड (सोलापूर, महाराष्ट्र) : गुरुदेव, आपल्या कृपेने मला अशा भूवैकुंठात (आश्रमात) येण्याची संधी मिळाली. त्यामुळे पुष्कळ कृृतज्ञता व्यक्त झाली. येथे आपले आगमन झाले. तेव्हा माझी पुष्कळ भावजागृती होत होती.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आताही भावजागृती होत आहे.

कु. सावित्री गुब्याड : गुरुदेव, मला आपले दर्शन झाले, हेच माझ्यासाठी पुष्कळ आहे. आता मला दुसरे काहीच नको. ‘मायेचे सर्व विचार सोडून केवळ आपल्या चरणांशी यायचे आहे’, असे मला वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : आणखी काही बोलण्याची आवश्यकताच नाही. शब्दांमध्ये जो भाव व्यक्त होतो, त्यापेक्षा अधिक तो भावजागृती झाल्यामुळे व्यक्त होतो. यातून तुझी आध्यात्मिक स्थिती लक्षात येते. पुष्कळ छान !

८ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना पहाताच साधिकेचे भान हरपून जाणे आणि तिला बोलायला शब्दच न सुचणे

श्री. चेतन राजहंस : ही कु. श्रेया गुब्याड, सावित्रीताईची बहीण आहे. तीसुद्धा सोलापूरमध्ये सामाजिक माध्यमाद्वारे (‘सोशल मिडिया’द्वारे) सेवा करते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : भावावस्थेत आहेस ना !

८ ए. सत्संगात गुरुदेवांभोवती पिवळे वलय दिसणे आणि लादीवर दैवी कण दिसून ‘त्यातून सर्वांना चैतन्य मिळत आहे’, असे वाटणे

कु. सावित्री गुब्याड : गुरुदेव, सर्व साधक त्यांचे प्रयत्न सांगत होते. तेव्हा मला आपल्याभोवती पिवळ्या रंगाचे एक वलय दिसले. येथे लादीवर दैवी कणही दिसत असून ‘त्या दैवी कणांच्या माध्यमातून सर्वांना चैतन्य मिळत आहे’, असे मला वाटले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : फारच छान !              (क्रमशः)

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/909606.html

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटरमध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे घटक असल्याचे सिद्ध झाले. या घटकांच्या मूलद्रव्यांच्या प्रमाणावरून शोधलेले त्यांचे फॉर्म्युले सध्या अस्तित्वात असलेल्या कोणत्याही कणांच्या फॉर्म्युल्याशी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना दैवी कण असे संबोधतात.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक