हिंदु आहात ना, मग मरायची सिद्धता ठेवा…!

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये आतंकवाद्यांनी निष्पाप हिंदूंचे जीव घेतले. ‘हिंदु असणे’, हाच त्यांचा अपराध होता. ही वार्ता पाहिली, ऐकली आणि प्रचंड वेदना, उद्विग्नता, चीड, चिडचिड, संताप अशा भावना मनात दाटून आल्या; पण त्यासह इतके सगळे वर्षानुवर्षे सतत घडत असूनही आपण ‘हिंदु’ म्हणून अजूनही एकत्र येऊ शकत नाही, एकदिलाने उभे राहू शकत नाही’, ही हतबलता पुन्हा मन अस्वस्थ करत राहिली.

हिंदूंच्या नरसंहाराची ही काही पहिली वेळ थोडीच आहे; पण ‘मला काय त्याचे ? शेजार्‍याचे घर जळत आहे, तर जळू द्या. देश तुटत आहे, तुटू द्या. मी सारी सुखे उपभोगत माझ्या घरात सुरक्षित आहे ना ?’ मग झाले तर; पण ‘आता तुमचे घरही तुम्हाला सुरक्षित ठेवू शकणार नाही’, अशी हिंदुस्थानातीलच नव्हे, तर जगातील परिस्थिती आहे.

१. जिहाद्यांना स्पष्ट असलेला धर्मादेश

तुम्ही साम्यवादी असा, सर्वधर्मसमभावाचे सूर आळवणारे असा, भाईचार्‍याचे समर्थक असा, ‘तीही माणसेच आहेत ना ?’, असा कळवळा येणारे असा, ‘त्यांच्या मतांमुळे आम्ही निवडून आलो’, असे म्हणणारे असा, ‘त्यांच्यासाठी’ तुम्ही काफिर आणि काफिरच आहात. ‘काफिरांना मारा’, असे त्यांचा धर्मच सांगतो, अल्लाच तसे सांगून गेला आहे. त्याने ‘नुसते ठार मारा’, असे सांगितले नाही, तर ‘पहलगाममध्ये जसे क्रौर्याने, निर्दयपणे आणि निष्ठूरपणे मारले तसे मारा. जसे मारले सौरभ कालिया या आपल्या वीर सैनिकाला, जसे मारले धर्मवीर संभाजी राजांना…पण तुम्हाला मरायचे नसेल, तर सोपा उपाय आहे की, त्यांच्याकडे दयाळू आहेत ना ते, अजान म्हणा किंवा ‘मी हिंदु नाही’, असे सांगा. तुम्हाला ते गोळ्या घालणार नाहीत. अर्थात् ‘मी हिंदु नाही’, असे नुसते सांगून होणार नाही. पुरुषांना ते सिद्ध करावे लागेल. त्यांनी पुरुषांना मारणे आणि बायकांना जिवंत ठेवणे, हे काही नवीन नाही आपल्याला ! पुरुष त्यांच्या काय कामाचे ? त्यांची संख्या वाढवणार आहेत त्या लुटून नेलेल्या, विकलेल्या, बळजोरीने निकाह (लग्न) केलेल्या हिंदूंच्या बायका. पूर्वापार हेच तर घडत आले आहे आणि पुढेही वर्ष १९२१ पासून, वर्ष १९४६ पासून अगदी आतापर्यंत हेच घडत आहे.

सौ. मंजिरी मराठे

२. जातपात, भाषा, प्रांत वाद करून जिहाद्यांच्या विरोधात लढू शकणार का ?

‘त्यांचे’ विचार, आचार, ध्येय सुस्पष्ट आहे, प्रचंड मोठे स्वप्न आहे त्यांचे ! तुम्ही हिंदू बसा ‘हिंदुस्थान’, ‘हिंदुस्थान’ करत. त्यांना जगावर राज्य करायचे आहे. ते योजनाबद्ध रितीने पावले टाकत आहेत आणि तुम्हाला त्याचा पत्ताही नाही. त्यांनी तुमच्या जागा कह्यात घेतल्या आहेत, तुमचे बहुतेक व्यवसाय कह्यात घेतले आहेत. तुमच्या खिशातील पैसा अलगद त्यांच्या खिशात जात आहे, तुमच्या विरुद्ध त्याचा वापरही होत आहे आणि तुम्ही हिंदु बसला आहात, डावे – उजवे, पुरोगामी – प्रतिगामी खेळत. हा ब्राह्मण, हा मराठा, हा दलित, हा अमका, तो ढमका हा एक खेळ. हा मराठी, तो गुजराती, तो भैया हा दुसरा एक खेळ. ‘सगळे व्यवसाय गुजरातला जात आहेत, महाराष्ट्राचा गुजरात होत आहे’, हे एक रडगाणे. मग तुम्ही महाराष्ट्रातील हुशार मंडळी काय करत आहात ? ‘अदानी, अंबानी हे गुजरातीभाई कसे खोर्‍याने कमवत आहेत’, हे दुसरे रडगाणे. अहो, पण तुम्हाला कुणी अडवले आहे, असे व्यवसाय वाढवायला ? पण नाही. आम्हाला जगात काय चालले आहे, देशात काय चालले आहे, हिरवे ढग सगळीकडे कसे दाटून आले आहेत ?, कालसर्प आपल्याला कसा विळखा घालत आहे, असल्या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ आहे कुठे ? अहो, इतक्या आमच्या जाती, इतक्या आमच्या भाषा, इतके आमचे प्रांत, आम्ही आमची अस्मिता जपायला नको ? ‘मी मराठी असतांना, मी हिंदी का शिकायची ?’, असे म्हणत आम्ही भांडत रहाणार.

उद्या हा देशच तुमचा राहिला नाही, तर ती मराठी अस्मिता, तो महाराष्ट्राचा अभिमान काय कामाचा ? मुसलमानांमध्ये काही जाती नाहीत का ? त्यांचे आपापसांत वैर नाही का ? सगळे काही रितसर आहे; पण जिथे धर्माचा प्रश्न येतो, तिथे ते सगळे एक असतात. एक फतवा निघतो आणि प्रत्येक जण तो आदेश पाळतो; पण आपल्याकडे काय झाले आहे, ‘आपण सारेच हुशार, विचारवंत, अभ्यासक. त्यात आपल्याला व्यक्त व्हायला समाजमाध्यम हे मोठे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे पंतप्रधान, गृहमंत्री, सेना अगदी सार्‍यांनाच वाईट बोलण्याचा, उपदेश करण्याचा, ते कसे चुकत आहेत, ते सांगण्याचा हक्क आपल्याला मिळाला आहे. आपल्या लिहिण्याला, बोलण्याला, वागण्याला ‘लाईक्स’चे (समाजाला लिखाण वा बोलणे आवडणे) बक्षीस मिळते ना ? पण ज्या वेळी देशात काही भीषण घटना घडते, तेव्हा स्वतःचे कर्तव्य असते की, राजकारण बाजूला ठेवून, स्वतःच्या भावनांना शक्य तितका आवर घालून देशाच्या, सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाणे. पहलगाममध्ये जे घडले, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच भावना आज अतिशय तीव्र आणि टोकाच्या आहेत; पण उद्या काय ? ‘जन पळभर म्हणतील हाय हाय.’ उद्यापासून पुन्हा जुने दळण, म्हणजेच जातपात, भाषा, प्रांत वाद चालूच !

– सौ. मंजिरी मराठे, कोषाध्यक्षा, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई. (२८.४.२०२५)


हिंदूंनो, आतातरी जागे व्हा आणि कृती करा !

बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार झाले, तेव्हाही आपण अस्वस्थ झालो; पण ते देशाबाहेर घडत होते. त्यामुळे लवकरच आपण ते विसरलो; पण आज आपल्याच देशात बंगालमधील हिंदु आताही भोगत आहेतच कि यातना ? पण ते दूर आहेत, ‘मला काय

त्याचे ?’ समाजमाध्यमांवर निषेध केला की झाले; पण हे आपल्या महाराष्ट्रातही केव्हाही घडू शकते. पुण्यातील सारसबाग, मुंबईतील समुद्रकिनारे, रेल्वेस्थानके पहा. तेथे ‘त्यांची’ होणारी गर्दी पाहून धडकी भरेल तुम्हाला. त्यांची वाढत चाललेली आक्रमकता पहा, तुम्हाला राजरोसपणे दिले जाणारे मारण्याचे आव्हान

ऐका ! कृपा करा, जागे व्हा ! कालच्या गोळ्यांवर तुमचे नाव नव्हते; पण उद्या त्यावर तुमचे किंवा तुमच्या घरच्यांचे नाव असेल कदाचित्. आतातरी जागे व्हा आणि कृती करा ! ‘ओम प्रमाणपत्रा’च्या मोहिमेत (हिंदूंनी हिंदूंसाठी विविध व्यवसायांमध्ये शुद्धता आणण्यासाठी चालवलेली मोहीम)  सामील व्हा. आता हिंदूंच्या पैशावर हिंदूद्रोही पोसले जाणार नाहीत, हिंदूंची हत्याकांडे होणार नाहीत, हे सुनिश्चित करा. जागे नाही झाला, तर मरण दाराशी उभे आहेच !

– सौ. मंजिरी मराठे