|

आळंदी (जिल्हा पुणे) – ‘श्री संत ज्ञानेश्वर महाराज ७५० वा जन्मोत्सवाच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा’निमित्त आळंदी देवस्थानाच्या वतीने ३ मेपासून ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा ३ ते १० मे या कालावधीत आळंदीत चाकण-केळगाव रस्त्यावरील भैरवनाथ देवस्थानाच्या जागेत होणार आहे. प्रतिदिन सकाळी ६ ते १० या वेळेत पारायण होणार आहे. पारायणासाठी राज्यभरातून १० सहस्र भाविकांच्या निवास आणि जेवणाची व्यवस्था आळंदी देवस्थानाने केली आहे. अद्यापपर्यंत ३ सहस्र भाविकांनी नोंदणी केली असून सप्ताहासाठी मंडप उभारण्याचे काम आळंदीत युद्धपातळीवर चालू आहे, तर ग्रामस्थांनी नियोजनाच्या सिद्धतेसाठी १३ विविध समित्या बनवून अधिकाधिक भाविक यावेत, यासाठी आवाहन केले आहे.
आळंदी देवस्थानकडून पुढील महिन्यात घेण्यात आलेल्या हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणासाठी समन्वयाची बैठक देवस्थानाचे विश्वस्त अन् ग्रामस्थ यांमध्ये पार पडली. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण !
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळाल्यानंतर अन्य पाहुण्यांची वेळ आणि कार्यक्रमाचा तपशील घोषित केला जाणार आहे. सप्ताहासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यातील विविध विभागांच्या मंत्र्यांनाही निमंत्रित केलेले आहे.
सोहळ्याची वैशिष्ट्ये
एकाच वेळी १० सहस्र वारकरी पारायणास बसणार असून पारायण करणार्या प्रत्येक वारकर्यास ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि हरिपाठ पुस्तिका भेट मिळेल. परगावच्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था देवस्थान करणार असून मुक्तद्वारालगत २ वेळच्या जेवणाची व्यवस्था आहे. शेवटच्या दिवशी मांडे भोजन आणि आमरसाची मेजवानी असेल.
सप्ताहाची सिद्धता !
सप्ताहाच्या सिद्धतेसाठी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ. पालखी सोहळा प्रमुख डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त अधिवक्ता राजेंद्र उमाप, अधिवक्ता रोहिणी पवार, चैतन्य महाराज कबीर, पुरुषोत्तम महाराज पाटील नित्याने बैठक घेत आढावा घेत आहेत, तर ग्रामस्थांमध्ये माजी नगराध्यक्षांसह माजी नगरसेवक, विविध पक्षांचे पदाधिकारी, मंडळांचे कार्यकर्ते झटत आहेत. हरिनाम सप्ताहात राज्यभरातील दिग्गज कीर्तनकार, प्रवचनकारांच्या सेवेचा लाभ भाविकांना होणार आहे.
मंडप उभारण्याची लगबग !
‘महाराज वारकरी शिक्षण संस्थे’समोर अनुमाने १० एकर जागेत मंडप उभारणीचे काम चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायणासाठी व्यासपीठ, मंडप, अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या अभ्यागतांसाठी स्वतंत्र मंडप, अन्नदानासाठी स्वतंत्र व्यवस्था या मंडपात केली जाणार आहे. याचसमवेत पारायणासाठी येणार्या लोकांची नोंदणी जागेवर करण्यासाठी, तसेच आपत्कालीन व्यवस्था म्हणून वैद्यकीय सेवा देण्यासाठी स्वतंत्र मंडप व्यवस्था केली जात आहे.
स्थानिक लोकप्रतिनिधींना निमंत्रण
स्थानिक पातळीवर खासदार अमोल कोल्हे, आमदार बाबाजी काळे, महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे या नेत्यांनाही निमंत्रण दिले आहे. अद्याप या राजकीय नेत्यांची तारीख ठरली नसली तरी त्यांच्या दौर्याबाबत खात्रीलायक माहिती कळेल असे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ यांनी सांगितले.
कार्यक्रमाची रूपरेषा !
ह.भ.प. एकनाथ कोष्टी आणि चैतन्य कबीर महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पारायण व्यासपीठ चालवले जाईल.
प्रतिदिनचे कार्यक्रम
सकाळी १० ते दुपारी १२ – बापूसाहेब देहूकर, अच्युत दस्तापूरकर, प्रसाद बडवे, ज्ञानेश्वर नामदास, विठ्ठल वासकर, भरत पाटील यांची कीर्तने.
दुपारी १.३० ते ३.३० – (३ ते ५ मे ) संत तुकाराम महाराज चरित्र चिंतन – रामभाऊ राऊत
दुपारी ४ ते सायं. ५ – चैतन्य कबीर, विष्णु केंद्रे, यशोधन साखरे, रामकृष्ण लहवितकर, नारायण जाधव, सदानंद मोरे यांची प्रवचने.
सायं. ६.३० ते रात्री ८.३० – विश्वनाथ वारिंगे, प्रमोद जगताप, जयवंत बोधले, केशव उखळीकर, रामभाऊ राऊत, चंद्रशेखर देगलूकर यांची कीर्तने
६ ते ९ मे – ज्ञानेश्वर महाराज चिंतन – चैतन्य देगलूकर
विशेष कार्यक्रम९ मे – रात्री ९ ते ११ – दिंडी प्रदक्षिणा १० मे – सकाळी १० ते १२ – काल्याचे कीर्तन (शांतीब्रह्म मारोती कुरेकर) |