स्वतःच्या आचरणातून आणि मार्गदर्शनातून शिष्यांना घडवणारे आद्य शंकराचार्य अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

आज आद्य शंकराचार्य यांची जयंती आहे. त्या निमित्ताने…

आद्य शंकराचार्य

१. आद्य शंकराचार्य यांनी त्यांच्या शिष्यांचे केलेले गर्वहरण आणि त्यांच्या शिष्यांना जाणवलेली सूत्रे 

‘एकदा आद्य शंकराचार्य त्यांच्या काही शिष्यांच्या समवेत भारतभ्रमण करत होते. तेव्हा त्यांच्या समवेतच्या शिष्यांना अहंकार झाला आणि ‘आपणही गुरूंसारखे वागावे’, असे त्यांना वाटू लागले. तेव्हा शंकराचार्यांनी शिष्यांना शिकवण्यासाठी एका गावाच्या बाहेर असलेल्या दारूच्या दुकानातील दारूने भरलेले मडके उचलले आणि ते पूर्णपणे पिऊन टाकले. त्या वेळी त्यांच्या समवेतच्या शिष्यांना वाटले, ‘आपणही दारू पिऊन नशा करू शकतो.’

त्यानंतर ते काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना दुसर्‍या एका गावात लोहार लोखंडी हत्यारे बनवत असलेला दिसला. त्या लोहाराने नुकताच लोखंडाचा लाल रस एका साच्यात काढला होता. शंकराचार्य तिथे गेले आणि त्यांनी त्या साच्यातील लोखंडाचा रस पिऊन टाकला. तेव्हा त्यांना काहीही झाले नाही. शंकराचार्य हे हलाहल विष पचवणार्‍या भगवान शिवाचे अवतार होते. ते पाहून शिष्यांच्या लक्षात आले, ‘आपण शंकराचार्यांनी जे केले ते करू शकत नाही. त्याऐवजी त्यांनी आपल्याला जी साधना आणि सेवा सांगितली आहे, तेच करणे श्री गुरूंना अपेक्षित आहे.’

२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या सत्संगात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे

(पू.) शिवाजी वटकर

महर्षींनी नाडीपट्ट्यांत लिहून ठेवले आहे की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत.’ सच्चिदानंद परब्रह्मडॉ. आठवले यांनी साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ‘गुरुकृपायोग’ हा साधनामार्ग सांगितला आहे. मागील ३५ वर्षांच्या कालावधीत घडलेल्या अनेक प्रसंगांतून सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांकडून मला शिकायला मिळाले, ‘गुरु जसे वागतात, कृती करतात किंवा बोलतात, त्याप्रमाणे साधकाने कृती करू नये. त्याऐवजी श्री गुरूंनी सांगितलेली साधना शिरसावंद्य मानून त्यानुसार साधना आणि सेवा करावी. साधकाने कृतज्ञताभावात राहून गुरुकार्यात खारीचा वाटा उचलावा आणि मनुष्य जीवनाचे सार्थक करून घ्यावे.’

स्वतःच्या आचरणातून आणि मार्गदर्शनातून शिष्यांना घडवणारे, तसेच वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणारे आद्य शंकराचार्य आणि सनातन राष्ट्राचे प्रणेते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७८ वर्षे, सनातनचे १०२ वे (समष्टी) संत), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (३.४.२०२५)