प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !

प्रश्न : किं नियम्य न शोचन्ति ?
अर्थ : काय नियंत्रणात ठेवले, म्हणजे शोक करण्याचा प्रसंग येत नाही ?
उत्तर : मनः ।
‘मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः ।’ (त्रिपुरातापिन्युपनिषद्, उपनिषद् ५, श्लोक ३), म्हणजे ‘मनुष्याचे मनच बंध आणि मोक्ष यांचे कारण आहे’, असा आपल्या तत्त्वज्ञानाचा सिद्धांत आहे.
१. मनावर नियंत्रण प्रस्थापित झाल्यानेच मनुष्याला प्रसन्नता मिळते !
मन हेच माणसाला बंधनात अडकवते आणि तेच सुटका होण्यासाठी कारणीभूत ठरते. मनुष्याच्या जीवनात केवळ नैसर्गिक प्रेरणांमुळे घडणार्या गोष्टींचे स्थान अगदी थोडे आहे. मनाच्या संकल्प-विकल्पामुळे ‘जे व्हावे किंवा होऊ नये, मिळावे किंवा मिळू नये’, असे वाटते आणि त्याचे जे परिणाम शरीर-मन-बु्द्धी यांवर घडतात, त्याचेच प्रमाण मोठे आहे. सुख-दुःख, शोक-मोह यांचे आघात मनुष्याला सोसावे लागतात. त्यामुळे एरव्ही समाधानी जीवन जगण्याइतकी परिस्थिती असतांनाही माणसे अधिकाधिक अभिलाषा बाळगून सदैव दुःखी, कष्टी, अस्वस्थ आणि संतप्त अशी रहातात. स्वतःविषयीचा अहंकार, मानापमानाच्या खोट्या कल्पना, कोणत्याही मार्गाने सत्ता, संपत्ती आणि त्यातून मिळणारी प्रतिष्ठा यांची आकांक्षा असणे, हे मनाचे खेळ आहेत. त्यामुळेच मनुष्य दुःखी आणि शोकाकुल होत रहातो. अशांतीने पीडित होतो.
मनावर नियंत्रण प्रस्थापित झाले, मन आवरता आले, तर मनुष्याच्या प्रसन्नतेला पारावार उरणार नाही, अशी वस्तूस्थिती आहे. यासाठी आपल्या धर्माने आणि संस्कृतीने सर्व संतमहंतांनी ‘मन आवरण्यास शिका’, असा आदेश देऊन ते कसे आवरावे ? हे शिकवण्यासाठी उपाय सांगून उपदेश केला आहे. समर्थ रामदासस्वामींनी तर मनाला बोध करण्यासाठी २०५ श्लोकांचे एक उत्कृष्ट प्रकरण लिहिले आहे. त्यामुळे कोणत्याही स्थितीतील मनुष्याला कसे वागावे ? ते कळून सुखी होता येईल.
२. सध्याचे काही मानसशास्त्रज्ञ आणि साहित्यिक यांचे मनाला विकृत बनवण्याचे प्रयत्न
अलीकडच्या काही मानसशास्त्रज्ञांनी आणि त्यांना डोक्यावर घेऊन नाचणार्या बहुतेक साहित्यिकांनी ‘मनाला वळवण्याचे संतांनी सांगितलेले मार्ग त्याज्य आहेत’, असा प्रचार केला आहे. ते म्हणतात, ‘मनातील संकल्प-विकल्पांना मुक्त संचार करू दिला पाहिजे आणि तद्नुरूप कृती करण्याचे स्वातंत्र्यही आपणास असले पाहिजे. मनाला दडपणे (सप्रेशन ऑफ माईंड) आणि मनातील संकल्प-विकल्पांना कुंठित करणे (कंडिशनिंग ऑफ माईंड) हे मनाला घातक ठरते. त्यामुळे माणसाचे जीवन विकृत होते.’
३. मनाला आवरण्याकरता संतांनी सांगितलेले उपाय आचरणे महत्त्वाचे !
‘मन आवरणे’, म्हणजे मनाला दडपणे नाही आणि ‘मन वळवणे’, म्हणजे मनाला कुंठित करणे नाही’, ही वस्तूस्थिती हे महाभाग लक्षात घेत नाहीत’, हे समाजाचे दुर्दैंव आहे. मन आवरण्याकरता काय करावे ?, कसे करावे ?, याचे उपाय सांगतांना मनाला स्वैर होऊ देऊ नये; पण त्यासह सातत्याने दडपूनही ठेवू नये, याचा विवेक संतांनी आपल्या वाङ्मयांतून स्पष्ट केला आहे. मन ही अमोघ शक्ती आहे; पण त्यामुळे ती नियंत्रित नसली, तर ती निरुपयोगीच नव्हे, तर घातकही ठरते. त्याचे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. असे असल्याने ‘मन आवरले की, शोकाकुल होण्याचा प्रसंग येत नाही’, असे शास्त्रात सांगितले आहे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘यक्षप्रश्न’)