सनातनच्या १३२ व्या समष्टी संत पू. (सौ.) ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६३ वर्षे) या २४.२.२०२५ या दिवशी संतपदी विराजमान झाल्या. गुरुकृपा आणि त्यांची साधना यांमुळे त्यांनी संतपद प्राप्त केले. या लेखामध्ये आपण त्यांना संतपदापर्यंत नेणार्या त्यांच्या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांविषयी जाणून घेणार आहोत. १.५.२०१५ या दिवशी या आध्यात्मिक गुणवैशिष्ट्यांचा काही भाग पाहिला. आज पुढील भाग पाहू.

३. २४.२.२०२५ या दिवशी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांचे संतपद घोषित केल्यावर सूक्ष्मातून दिसलेले दृश्ये
३ अ. साक्षात् श्री महालक्ष्मीनेच पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केल्याचे जाणवणे आणि त्यांच्या सूक्ष्मदेहाने ‘लक्ष्मी’ लोकाकडे प्रयाण करणे : सौ. ज्योतीताईंचे संतपद घोषित केल्यावर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या रूपाने साक्षात् श्री महालक्ष्मीनेच पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केल्याचे जाणवले. तेव्हा पू. (सौ.) ज्योतीताईंच्या हृदयात आत्मज्योत प्रगट झाली आणि तिचा प्रकाश संपूर्ण कार्यक्रमस्थळी पसरला. त्यांचा लक्ष्मीदेवीप्रतीचा समर्पणभाव आणि कृतज्ञताभाव जागृत होऊन त्यांचा सूक्ष्मदेह पृथ्वी, म्हणजे भूलोकापासून लक्ष्मीलोकाकडे विष्णुमार्गाने (ब्रह्मांडातील १४ भुवने किंवा लोक यांना जोडणार्या सूक्ष्म पोकळीरूपी मार्गाने) वरच्या दिशेने जाऊ लागला. त्यांच्या सूक्ष्मरूपाच्या भावामुळे त्या मार्गाने जात असतांना त्यांच्या सूक्ष्मरूपाचे चरण जिथे जिथे पडत होते, त्याच्या खाली निळसर रंगाची भक्तीकमळे उमलत होती. त्यांचा सूक्ष्मदेह लक्ष्मीलोकात गेल्यावर त्यांची श्री महालक्ष्मीदेवीशी भेट झाली आणि दोघींनी एकमेकींना आलिंगन दिले. भक्त आणि भगवती यांच्या भावभेटीचे अनुपम क्षण पाहून लक्ष्मी लोकातील समस्त भक्तांचे डोळे कृतज्ञताभावाने भरून आले. तेव्हा संपूर्ण लक्ष्मीलोकात प्रीतीची गुलाबी आणि भक्तीची निळी कमळे उमलून त्यांचा दैवी सुगंध संपूर्ण लक्ष्मीलोकात दरवळत होता.

३ आ. देवलोकात विविध प्रकारच्या आणि रंगांच्या असंख्य ज्योती सूक्ष्मातून प्रज्वलित होणे : हा आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठी देवलोकात सूक्ष्मातून नेत्रज्योत (गडद लाल रंग), प्राणज्योत (फिकट लाल रंग), प्रेमज्योत (गुलाबी रंग), धर्मज्योत (केशरी रंग), भावज्योत (गडद निळसर रंग), भक्तीज्योत (फिकट निळसर रंग) ज्ञानज्योत (पिवळसर रंग) आणि आत्मज्योत (पांढरा रंग) इत्यादी असंख्य ज्योती प्रज्वलित झाल्या.
३ इ. ज्योतींची नावे, ज्योतींचा सूक्ष्म रंग, ज्योतींचे कार्य, ज्योतींशी संबंधित देवता, ज्योतींमध्ये कार्यरत असणारे तत्त्व किंवा घटक आणि ज्योतींतून प्रगट होणारा भाव
४. जन्मतःच दैवी बालिका असणे
या जन्मात सौ. ज्योती ढवळीकर यांची जन्मतः पातळी ५३ टक्के होती आणि त्या दैवी बालिका होत्या. त्यामुळे त्यांच्यामध्ये ‘विनम्रता, सहजता, अहं अल्प असणे’ इत्यादी दैवी गुण लहानपणापासूनच दिसून येत होते.
५. पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्यातील विविध गुणवैशिष्ट्ये
५ अ. कठोर धर्माचरण आणि पातिव्रत्याचे कठोर पालन करणे : पू. (सौ.) ज्योतीताईंनी त्यांच्या प्रत्येक जन्मात कठोर धर्माचरण केले होते. त्याचप्रमाणे त्यांनी पातिव्रत्य व्रताचेही कठोरतेने पालन केले होते. त्यामुळे त्यांना पुष्कळ पुण्य प्राप्त झाले. या पुण्यबळामुळेच त्यांना प्रत्येक जन्मात ऐश्वर्य आणि वैभव अनुभवण्यास मिळाले.
५ आ. वैराग्यभाव : प्रत्येक जन्मात पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्यावर श्री महालक्ष्मीदेवीची भरभरून कृपा असल्यामुळे त्यांना प्रत्येक जन्मात राजवैभवाचे सुख उपभोगण्यास मिळाले; परंतु त्यांच्यावर असलेल्या श्री गुरुकृपेमुळे त्यांच्या मनात वैराग्यभाव जागृत असतो. त्यामुळे त्या मायेत असूनही तिच्यापासून अलिप्त रहातात. यांच्यातील वैराग्यभावामुळे त्यांची चित्तवृत्ती निरासक्त आणि निष्काम आहे. त्यामुळे त्या मायेत राहूनही त्यात न अडकता साधना करून या जन्मी संतपदाला पोचल्या आहेत.
५ इ. जन्मापासून संतपदापर्यंत अखंड जागृत ध्यानावस्था असणे : पू. (सौ.) ज्योतीताईंनी मागील जन्मांमध्ये ध्यानयोगानुसार साधना केल्यामुळे त्यांचे जागृत अवस्थेतील ध्यान सतत चालू असते. त्यामुळे त्यांच्या मनात अनावश्यक आणि नकारात्मक विचार येत नाहीत, तर सेवा अन् साधना यांच्या संदर्भात आवश्यक तेच विचार येतात आणि त्यांचे प्रत्येक कर्म एकाग्रतेने होते.
५ ई. अहं अत्यल्प असणे : पू. (सौ.) ज्योतीताईंचा अहं अल्प आहे.
त्यामुळे त्यांचे साधनेचे प्रयत्न कर्तेपणाच्या सूक्ष्म जाणिवेविना होऊन निष्काम कर्मयोग्याप्रमाणे निरपेक्षतेने होतात.
५ ई १. परिस्थिती स्वीकारून परिस्थितीशी जुळवून घेणे : अहं अल्प आणि भगवंतावर दृढ श्रद्धा असल्यामुळे पू. ज्योतीताई त्यांच्या साधनेसाठी निर्माण होणारी विपरित किंवा प्रतिकूल परिस्थितीही अत्यंत सहजरित्या स्वीकारतात आणि परिस्थितीशी जुळवून घेऊन चांगली साधना करतात.
५ ई २. आयुष्यभर परेच्छेने आणि ईश्वरेच्छेने वागणे : अहं अत्यल्प असल्यामुळे त्यांच्यामध्ये स्वेच्छा प्रबळ नाही. त्यांचे सतत भगवंताशी अनुसंधान असल्यामुळे त्यांना कुटुंबातील सदस्यांच्या इच्छेप्रमाणे, म्हणजे परेच्छेने आणि ‘श्री गुरूंचे जाणूनी मनोरथ’ यानुसार श्री गुरूंच्या इच्छेने किंवा ईश्वरेच्छेने वागणे अत्यंत सहजतेने होते. त्यांनी संतपद प्राप्त केल्यामुळे त्यांच्यातील अत्यल्प प्रमाणात असलेल्या स्वेच्छेचेही रूपांतर ईश्वरेच्छेत झालेले आहे.
५ ई ३. विनम्रता आणि सहजता : पू. (सौ.) ज्योतीताई श्रीमंत असल्यामुळे यांचे रहाणीमान उच्च आहे; परंतु त्यांचा अहं अल्प असल्याने त्यांच्यात पुष्कळ विनम्रता आणि सहजता जाणवते. त्या स्वतःला अन्यांपेक्षा श्रेष्ठ समजत नाहीत.
५ उ. ईश्वरप्राप्तीची आंतरिक ओढ आणि तळमळ असणे : पू. (सौ.) ज्योतीताईंमध्ये मुळातच १० टक्के लक्ष्मीतत्त्व असल्यामुळे लहानपणापासून त्यांना ईश्वरप्राप्तीची आंतरिक ओढ आणि तळमळ आहे. त्यामुळे त्यांचा ‘साधक ते शिष्य’ आणि ‘शिष्य ते संत’ हा प्रवास अत्यंत भावपूर्ण साधनेद्वारे पूर्ण झाला. त्यांच्यातील ईश्वरप्राप्तीच्या तीव्र तळमळीमुळे त्यांचा ‘संत ते सद्गुरु’, ‘सद्गुरु ते परात्पर गुरु’ आणि ‘परात्पर गुरु ते उत्तम भक्त’ हा प्रवासही जलद गतीने पूर्ण होणार आहे.
५ ऊ. सेवावृत्ती आणि परिपूर्ण सेवा करणे : त्यांच्यामध्ये प्रत्येक सेवा परिपूर्ण करण्याची तीव्र तळमळ आहे. ‘प्रत्येक सेवा ही सूक्ष्मातून ईश्वराच्या चरणी अर्पण होते’, असा भाव आणि सेवावृत्ती यांमुळे त्या प्रत्येक कर्म सेवा समजून अचूक, भावपूर्ण अन् परिपूर्ण रितीने करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यातील या गुणांमुळे त्यांच्या साधनेला परिपूर्णता प्राप्त होत आहे.
५ ए. शिष्यभाव आणि दास्यभक्ती यांचा संगम असणे : पू. (सौ.) ज्योतीताईंमध्ये मुळातच शिष्यभाव असल्यामुळे त्यांचे आचार आणि विचार हे दास्यभक्तीने युक्त असतात. त्यामुळे आता त्या कोणत्याच कर्माचा कर्तेपणा स्वतःकडे घेत नाहीत. आता संतपद प्राप्त झाल्यापासून त्यांचा सूक्ष्म अहंही गळून पडल्यामुळे त्यांचे प्रत्येक कर्म ‘अकर्म कर्म’ होत आहे.
(क्रमशः)
– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|
लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/910220.html