प्रेमळ स्वभावाच्या आणि गंभीर आजारपणाही शांत अन् स्थिर राहून नामजप करणार्‍या सातारा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) सुवर्णा वसंतराव गोडसे (वय ७९ वर्षे) !

‘२.४.२०२५ या दिवशी सातारा येथील सौ. सुवर्णा वसंतराव गोडसे (वय ७९ वर्षे) यांचे निधन झाले. त्या रुग्णाईत असतांना आणि त्यांचे निधन झाल्यावर त्यांचे चिरंजीव अन् साधक यांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांना आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (सौ.) सुवर्णा वसंतराव गोडसे
सातारा येथील दिवंगत सौ. सुवर्णा वसंतराव गोडसे या आध्यात्मिक स्तरावरील जीवन जगत होत्या. ‘इतरांचा विचार करणे, निरपेक्ष वृत्ती, प्रेमभाव, ‘जणू संतसेवा करत आहोत’, हा भाव ठेवून सांसारिक कर्तव्ये पार पाडणे’ आणि अखेरच्या क्षणापर्यंत देवाच्या अनुसंधानात रहाणे, यांमुळे संसारात राहूनही त्यांनी आध्यात्मिक उन्नती केली आणि ६१ टक्के आध्यात्मिक पातळी प्राप्त केली आहे.

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. श्री. राजीव वसंतराव गोडसे (कै. (सौ.) सुवर्णा गोडसे यांचा मुलगा), सातारा

श्री. राजीव वसंतराव गोडसे

१ अ. गंभीर आजारपणातही आईने शांत आणि स्थिर राहून नामजप करणे

१. वर्ष २०१२ मध्ये आईला ‘पार्किन्सन (मेंदूतील पेशी हळूहळू खराब झाल्यामुळे स्नायूंवर परिणाम होऊन रुग्णाच्या हालचालींवर परिणाम होणे किंवा कंप निर्माण होणे)’ हा आजार झाला. त्यामुळे आईची पूर्ण डावी बाजू कंप पावायची. तेव्हा तिला स्वतःला कोणत्याही कृती करता येत नसत. त्यामुळे मी अधिकाधिक वेळ आईची सेवा करत होतो, उदा. आईला अंघोळ घालणे, वेणी घालणे, कपडे बदलणे, कपडे धुणे. या स्थितीमध्येही आई हातात जपमाळ घेऊन नामजप करत असे. तिची नित्य उपासना चालूच होती. ‘मी’ प्रारब्धभोग भोगत आहे’, असे आई सांगायची. ‘आई नेहमीच शांत आणि स्थिर असते’, असे मला प्रकर्षाने जाणवायचे.

२. वर्ष २०१९ मध्ये आईला ‘ब्रेनस्ट्रोक (मेंदूला रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्यांत अडथळा निर्माण होणे किंवा रक्तस्राव होणे)’ झाला. यामुळे आईचे शरिरावरील नियंत्रण सुटले, तसेच तिचे अंग कडक झाले. तिला बोलता येत नव्हते. ती केवळ पडून रहात असे आणि कुणी उठवले, तरच प्रतिसाद देत असे. या स्थितीमध्येही ‘कुणाला आपला त्रास होऊ नये’, असे तिला वाटत असे.

१ आ. प्रेमळ स्वभाव : आईचा स्वभाव प्रेमळ होता. आमचे पाहुणे, नातेवाईक आणि शेजारी यांना आईचा स्वभाव आवडत होता. आई नामस्मरण करत स्वयंपाक बनवत असे. यामुळे तिने बनवलेल्या पदार्थांना एक वेगळीच चव होती. तिच्या हातचे जेवण आणि प्रसाद सर्वांना आवडत असे.

१ इ. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या संप्रदायानुसार साधना करणे : आई आरंभी शिवाची उपासना करत होती. तिला नामजप आणि उपासना यांचे महत्त्व कळल्यानंतर तिने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या संप्रदायानुसार उपासना करायला चालू केली. आईने नातेवाईक, पाहुणे, शेजारी, साधक, कुटुंबीय इत्यादींची निरपेक्ष भावाने सेवा केली. आमचे एकत्र कुटुंब असल्यामुळे आईवर कामाचा पुष्कळ ताण असायचा; परंतु तिने सर्व गोष्टी निरपक्षपणे स्वीकारल्या आणि ‘गोंदवलेकर महाराजांची सेवा करत आहे’, असा भाव ठेवून सर्वांची सेवा केली. तिने पुष्कळ अन्नदान आणि धनदानही केले.

१ ई. साधनेसाठी साहाय्य करणे : आईला आध्यात्मिक दृष्टीकोन मिळाल्यावर तिने संपूर्ण कुटुंबाला आध्यात्मिक दृष्टीकोन दिला. त्यामुळे मला ‘अध्यात्म आणि व्यवहार हे वेगवेगळे आहे’, असे जाणवले नाहीत. आईने जवळच्या लोकांवर पैसे कमावण्याचा संस्कार न करता साधना करण्याविषयीचे संस्कार केले. आईने जवळच्या व्यक्तींना साधनेसाठी उद्युक्त केले.

१ उ. आई रुग्णाईत असतांना आलेल्या अनुभूती : वर्ष २०१२ ते एप्रिल २०२५ या कालावधीमध्ये ‘आईची अंतर्साधना वाढली आहे’, असे मला जाणवले. तेव्हा मला पुढील अनुभूती आल्या.

१. आई नामजप करत असतांना कधी कधी ‘तिच्या चेहर्‍याभोवती पांढरा प्रकाश आहे’, असे मला जाणवत असे. तिला स्वतःलाही निळा प्रकाश दिसत असे.

२. आईच्या खोलीमध्ये बरेच साहित्य होते, तरीही मी तिच्या खोलीत टाळी वाजवल्यानंतर मंदिराच्या गाभार्‍यात जसा नाद घुमतो, तसा नाद घुमत असे.

३. आईच्या खोलीमध्ये सात्त्विक स्पंदने आणि चैतन्य जाणवत असे.

१ ऊ. आईच्या निधनानंतर आलेल्या अनुभूती

१. आईचा चेहरा तेजस्वी दिसत होता.

२. तिच्या हाताचा स्पर्श लहान बाळाच्या स्पर्शाप्रमाणे मऊ, मुलायम आणि कोमल जाणवत होता.

३. तिची त्वचा आणि नखे पारदर्शक झाली होती.’

२. कै. (सौ.) सुवर्णा गोडसे यांच्या निधनानंतर सातारा येथील साधकांना आलेल्या अनुभूती

२ अ. श्री. महेश गायकवाड

१. ‘कै. गोडसेआजींचे निधन झाले. त्या दिवशी वातावरणात कोणताही दाब जाणवत नव्हता.

२. आजींचे शरीर कापसासारखे मऊ लागत होते.

३. आजींच्या चेहर्‍यावर तेज जाणवत होते.

४. आजींच्या घरातील ‘ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे छायाचित्र निर्गुण झाले आहे’, असे मला वाटले.’

२ आ. श्री. माधव फडके (वय ६७ वर्षे)

१. ‘आजींकडे पाहून ‘जणू त्या देवीच आहेत’, असे मला जाणवले.

२. ‘गोडसेंच्या घरातील कुणी व्यक्ती गेली आहे’, असे मला मुळीच जाणवले नाही. घरातील वातावरण शांत वाटत होते.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक