आज ‘आद्यशंकराचार्य जयंती’ आहे. त्या निमित्ताने…

आपल्या वृद्ध मातेची व्यवस्था योग्य व्यक्तीकडे सोपवून शंकरचा मूर्ताकडून अमूर्ताकडे, सीमित स्थानातून विराट सृष्टीकडे…शंकरकडून शंकराचार्य बनण्याकडे प्रवास चालू झाला. भगवान नारायणांचा पुत्र ब्रह्मदेव, त्यांचा पुत्र वसिष्ठ, त्यांचा पुत्र शक्ती, त्यांचा पुत्र पराशर, त्यांचा पुत्र व्यास, त्यांचा पुत्र शुक, शुकांचे पुत्र गौडपादाचार्य हे संन्यासदीक्षा घेऊन नर्मदाकिनारी ओंकारेश्वर इथे समाधीत मग्न असतांना त्यांना श्रीकृष्णदर्शन झाले आणि देवाने त्यांना सांगितले, ‘८ वर्षांचा संन्यासी तुझ्याकडे येईल, जो प्रत्यक्ष शिवाचा अवतार आहे. त्याला सर्व ज्ञान दे आणि लौकिकार्थाने आचार्य बनव. हेच तुझ्या जीवनातील अंतिम कार्य आहे. हा संन्यासी केरळमधून येत आहे.’ हा संन्यासी म्हणजेच शंकर !

गौडपादाचार्य यांची आणि शंकरची भेट झाली, तो प्रसंगसुद्धा पुष्कळ रोचक आहे. आचार्यांच्या गुंफेपर्यंत पोचण्याच्या कालावधीत शंकरच्या बालवयाविषयी सर्वत्र चर्चा होत होती. ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी आचार्यांकडे गेल्यावर त्याला ‘हे वत्सा, तू कोण आहेस ?’, असे विचारले. तेव्हा शंकरने ‘आत्मपंचक’ आणि ‘दशश्लोकां’द्वारे उत्तर दिले आणि या शीघ्र कवित्वाचे गुरुजींनाही कौतुक वाटले. एका शुभदिनी अनुष्ठानिक संन्यास ग्रहण करून त्यांना ‘शंकरभगवतपादाचार्य’ असे नाव देण्यात आले, तेच पुढे शंकराचार्य झाले ! हठयोग, राजयोग, ज्ञानयोग हे सगळे शिकायला सामान्यांना आयुष्य वेचावे लागे; पण असामान्य बुद्धीमत्ता आणि स्मरणशक्तीमुळे आचार्यांनी ते ज्ञान अवघ्या ३ वर्षांत आत्मसात् केले. आकाशमार्गे भ्रमण, परकाया प्रवेश, इच्छामृत्यू, दूरचे ऐकणे आणि पहाणे, ध्यानधारणा आदी सर्व सिद्धि अन् शास्त्रांत ते पारंगत झाले. त्यांचा पुढचा सर्व जीवनप्रवास हा ज्ञानार्जन, ज्ञानदान, अनेकांचा विरोध पत्करूनही असा लोकहिताच्या हेतूनेच चालू राहिला. वय वर्षे १२ ते ३२ त्यांनी धर्मप्रसार आणि जागृती यांत व्यतित केली.
– डॉ. सच्चिदानंद शेवडे यांच्या ‘पुनरुत्थान’ या कादंबरीतून