सरकारने राज्यात केवळ १० टक्के बालविवाह रोखले !

  • ६ वर्षांच्या काळात ३४२ प्रकरणांमध्ये गुन्हा नोंद ! 

  • परभणीत ६४, तर छत्रपती संभाजीनगर येथे ४७ बालविवाह रोखले !

नागपूर – राज्यात केवळ १० टक्के बालविवाह रोखण्यात राज्य सरकारला यश आले आहे. वर्ष २०१९ ते जानेवारी २०२५ या कालावधीत ३४२ प्रकरणांमध्ये बालविवाह प्रकरणी गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. परभणी येथे ६४, तर छत्रपती संभाजीनगर येथे ४७ बालविवाह रोखले आहेत.

१. प्रत्येक दिवशी १२० ते १२५ अल्पवयीन मुली माता झाल्याची माहिती विधीमंडळात महिला आणि बालविकासमंत्री आदिती तटकरे यांनी दिली होती. जानेवारी २०१९ ते जानेवारी २०२५ या कालावधीत राज्यात महिला आणि बालविकास विभागाने ४ सहस्र ३९ बालविवाह रोखल्याचा दावा माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीत केला; पण या कालावधीत केवळ ३४२ प्रकरणी तक्रारीच प्रविष्ट झाल्या आहेत. अक्षय्य तृतीयेला मोठ्या प्रमाणात बालविवाह होतात. या पार्श्वभूमीवर महिला आणि बालकल्याण विभाग सतर्क झाला आहे.

२. ‘नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे’नुसार महाराष्ट्रात गेल्या १२ ते १३ वर्षांत २ कोटी बालविवाह झाले. यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील बालविवाहांची संख्या लक्षणीय आहे. त्यात परभणी पहिल्या क्रमांकावर येतो. जानेवारी ते मार्च २०१९ या ३ मासांत एकूण १८७ बालविवाह रोखण्यात आले. यांपैकी १० प्रकरणांत तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. जानेवारी ते मार्च २०२० या ३ मासांत एकूण २४० बालविवाह रोखण्यात आले. यांपैकी ३० प्रकरणांत तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत.

३. जानेवारी ते मार्च २०२१ या ३ मासांत एकूण ५१९ बालविवाह रोखण्यात आले. यांपैकी ४५ प्रकरणांत तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. जानेवारी ते मार्च २०२२ या ३ एकूण ८३१ बालविवाह रोखण्यात आले. यांपैकी ७४ प्रकरणांत एफ्.आय.आर्. प्रविष्ट करण्यात आले. यात परभणी ६४, छत्रपती संभाजीनगर ४७, बीड ६४, हिंगोली २९, जालना २२, लातूर २४, नांदेड २७, धाराशिव २९ आणि परभणीत ६४ बालविवाह रोखण्यात आले.

‘महाराष्ट्रात प्रत्येक वाईट गोष्टी रोखण्यासाठी कायदा आहे. त्यांची प्रामाणिकपणे कडक कार्यवाही झाली पाहिजे, तरच अनिष्ट गोष्टींना पायबंद बसेल. यासाठी सरकारी यंत्रणेची इच्छाशक्तीही हवी. अशा प्रकरणांत आई-वडिलांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे. तरच कायद्याचा धाक राहील. तेवढ्यापुरते बालविवाह रोखल्याने काही होणार नाही. कायद्यासमवेत प्रबोधन होणे आवश्यक आहे. मुली सर्वच क्षेत्रांत प्रगती करत असतांना असतांना विदर्भ, मराठवाड्यासह ग्रामीण भागात मुलींना ओझे आणि दायित्व समजले जाणे वेदनादायी आहे. या विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी कठोर कारवाई करायला हवी.
– रूपाताई कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या

निरक्षरता, शिक्षणाचा अभाव, गरिबी हे बालविवाहाचे मुख्य कारण आहे. आजही ग्रामीण भागात लोक एक वेळच्या जेवणाला मुकतात. त्यात कुटुंब सांभाळणे अवघड जाते. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी भार हलका व्हावा, या दृष्टीने मुलीचे लगेच लग्न लावून दिले जाते. शेतीप्रधान देशात बहुसंख्य लोक शेती करतात. विवाह होऊन एक माणूस आपल्या घरात येणार आणि आपल्याला त्याचे शेतीसाठी साहाय्य होईल. त्यादृष्टीनेही बालविवाह केला जातो.

– रूपाताई कुळकर्णी, सामाजिक कार्यकर्त्या