महाराष्ट्राचे नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण घोषित !
मुंबई – महाराष्ट्राच्या नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरणाला २९ एप्रिलच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. वर्ष २०२५ ते २०३० या कालावधीसाठी हे धोरण आहे. या धोरणाद्वारे वाहन कर, नोंदणी प्रमाणपत्र, नूतनीकरण आदी शुल्कातून सवलत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
या धोरणाच्या कार्यवाहीसाठी येत्या ५ वर्षांसाठी १ सहस्र ९९३ कोटी रुपयांचा निधी संमत करण्यात आला आहे. या धोरणाच्या अंतर्गत राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधा उभारली जाणार आहे. दुचाकी, चारचाकी आदी सर्व प्रकारच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर या धोरणामध्ये १० टक्के सवलत देण्यात आली आहे, तर शेतीच्या इलेक्ट्रिक यंत्रणांसाठी सवलत १५ टक्के असणार आहे.
विशेष म्हणजे या धोरणामध्ये मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (समृद्धी महामार्ग) यांवर प्रवास करणार्या सर्व चारचाकी प्रवासी इलेक्ट्रिक वाहनांना आणि बस यांना पथकर पूर्ण सवलत देण्यात आली आहे, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील अन्य राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवर चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना पथकरात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे.