देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी अतीदक्षतेची चेतावणी !

मुंबईसह अनेक रेल्वेस्थानकांवर तपासणी

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – पहलगाम आक्रमणानंतर देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी अतीदक्षतेची चेतावणी देण्यात आली असून मुंबईसह अनेक ठिकाणी पोलिसांकडून पडताळणी आणि ‘कोम्बिंग ऑपरेशन’ चालू करण्यात आले आहे. रेल्वे सुरक्षा दल अनेक स्थानकांवर सतर्क झाले असून रेल्वेगाड्या, तसेच फलाट येथे पडताळणी चालू आहे. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे गाड्यांना गर्दी आहे. त्यातच रेल्वे सुरक्षा दलाने सुरक्षारक्षकांची वाढ केली आहे.

महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सीमेवर असलेल्या संवेदनक्षम मिरज जंक्शनची श्वानपथकाकडून पडताळणी करण्यात येत आहे. मिरजमार्गे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात जाणार्‍या सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुरक्षा जवानांची संख्या वाढवली आहे.

मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत २६ एप्रिल या दिवशी सायंकाळी ५.३० वाजल्यापासून रात्री ११ वाजेपर्यंत व्यापक ‘ऑल आऊट कोबिंग ऑपरेशन’ आणि नाकाबंदी राबवण्यात आली होती.

या मोहिमेचा भाग म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्याने नालासोपारा पश्चिमेकडील इमारतींमध्ये, तसेच झोपडपट्टी आणि कामगार वसाहती येथे संशयित नागरिक अन् मजूर यांची शोधमोहीम चालू केली आहे. ४० ते ५० नागरिकांना कह्यात  घेण्यात आले. त्यांच्या ओळखपत्रांची पडताळणी पोलिसांनी चालू केली आहे. या तपासात नागरिकांची ओळख, त्यांचे वास्तव्य आणि त्यांचा भारतात रहाण्याचा कायदेशीर हक्क याची बारकाईने चौकशी करण्यात येणार आहे.