हे खरे राष्ट्राचे पुढारी !

राष्ट्राच्या प्रपंचालाच स्वतःचा प्रपंच मानून त्याच व्यापात सदैव मग्न असा तो असतो, तो रागावलेला तर कधीच दिसत नाही. स्वार्थ ही भावनाच तेथे अस्तित्वात नसते. तेथे स्वार्थासाठी लोभमोहादी पापांची मुळे संभवतील तरी कशी ? बरे मानापमान नि स्वतःचे व्यक्तीत्व याचा वास, वारासुद्धा तेथे पहावयास सापडणार नाही. सदैव कार्याचा विचार करत समोर येईल त्या क्षुद्र किंवा महान् व्यक्तीशी सारख्याच प्रेमाने आणि आपुलकीने स्वतःचे विचार बोलत रहाणे, हाच त्यांचा दिनक्रम. जे आपल्या ज्वलंत अंतःकरणातील धगीने आसपासची उदासीन मनोवृत्ती वितळवत आहेत, त्यांच्या हृदयातील विशुद्ध भावना स्फटिकाप्रमाणे स्वच्छ प्रकाशाने विरोधकांचे डोळे दीपवत आहेत आणि त्यांचे शरीर अन् मन आपल्या अनुयायांसहच अग्रभागी अविरत धावत आहे, हेच खरे राष्ट्राचे पुढारी होत. त्यांचाच मार्ग अनुसरण्यात राष्ट्राचे कल्याण आहे.

(साभार : ग्रंथ ‘अज्ञाताची वचने,’ संचालक : अमरेंद्र गाडगीळ)