संपादकीय : ‘सर्वसमावेशक’ भारताची डोकेदुखी !

पहलगाम येथील आंतकवाद्यांचे आक्रमण हे भारताच्या इतिहासात अनेकार्थाने लक्षात ठेवले जाणार आहे. या निमित्ताने भारताने अधिकाधिक कणखर होण्याच्या टप्प्याला गती आली आहे. भारत शासन आणि सैन्य पाकला यापुढे अधिक कठोर धडा शिकवायचा तो शिकवेलच; परंतु या निमित्ताने देश ढवळून निघाला आहे, हे महत्त्वाचे आहे. जागृत झालेले हिंदू अधिक संतप्त झाले आहेत. आतंकवाद्यांचे पितळ अधिक उघडे पडले आहे. एरव्ही देशाशी काही देणे-घेणे नसलेल्या, आंग्लाळलेल्या तरुण पिढीतही या आक्रमणाविषयी प्रतिक्रिया आहेत. कधी नव्हे, ते चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही निषेध नोंदवला. पंतप्रधानांनी म्हटले आहे, ‘आतंकवाद्यांना कल्पनेपलीकडील शिक्षा देऊ’; ती त्यांनी द्यावी, ही प्रत्येक राष्ट्रप्रेमीची अपेक्षा आहेच; परंतु या घटनेमुळे पाकने काय काय ‘कारनामे’ करून गेली अनेक वर्षे भारताशी छुपे युद्ध चालू ठेवले आहे, त्याच्या ‘कल्पनेपलीकडील’ घटना आता समोर येत आहेत. भारत आणि पाक यांच्यामधील वाघा-अटारी सीमा बंद केल्यानंतर आता अनेक गोष्टी उघड होत आहेत. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा आदेश निघाल्यानंतर ५३७ पाकिस्तानी नागरिक भारत सोडून गेले आहेत आणि ८५० पाकमध्ये गेलेले भारतीय परत आले आहेत. २९ एप्रिलची दिलेली समयमर्यादा आता संपली आहे. कुणी नातेवाइकांना भेटायला आले होते, तर कुणी वैद्यकीय उपचार करण्यासाठी आले होते, अशा पाकिस्तान्यांना अचानक परत जाण्याचे दुःख झाल्याच्या बातम्या दाखवण्यात येत आहेत; परंतु हे ज्यामुळे करण्याची वेळ आली आहे, त्या आतंकवादी आक्रमणाचा निषेध मात्र यांपैकी कुणीही करतांना दिसत नाहीत.

केवळ बांगलादेशीच नव्हे, तर पाकिस्तान्यांचेही उद्यान !

भारतात ५ लाख पाकिस्तानी नागरिक रहात असल्याचे वृत्त आले आहे. गुप्तचर विभागाने (‘इंटेलिजेन्स ब्युरो’ने) ही सूची दिलेली आहे. या सूचीत नसलेले अवैध पाकडे किती असतील, याची कल्पना करता येऊ शकते. त्यामुळे केवळ बांगलादेशींसाठीच नाही, तर पाकड्यांसाठीही भारत देश ‘सर्वसमावेशक’ असे उद्यान बनला असल्याचे आता उघडकीस येत आहे. वर्ष २००७ मध्ये क्रिकेटचे सामने पहाण्यासाठी आलेल्या ३२ पैकी २८ नागरिक भारतातच राहिले; कारण ते अशा प्रकारच्या व्हिसावर भारतात आले होते की, जे कुठल्याही जिल्ह्यात फिरू शकतात.

भारत-पाक रोटी-बेटी (दु)र्व्यवहार !

भाजप नेते शशिकांत दुबे (सौजन्य : TimesNow मराठी)

‘पाकिस्तानी माहेर असलेल्या ५ लाखांहून अधिक महिला भारतात आहेत’, असे भाजप नेते शशिकांत दुबे यांनी सांगितले. ‘कुठल्या उद्देशाने पुरुषांनी या महिलांशी लग्न केले आहे ?’, याचा शोध घेण्याची आवश्यकता त्यांनी वर्तवली आहे. रत्नागिरीत ३ आणि नाशिक येथे ६ अशा महिला मिळाल्या. त्याचप्रमाणे ‘पाकिस्तान सासर असलेल्याही अनेक महिला भारतात आहेत’, अशा प्रकारचीही वृत्ते येत आहेत. भारतात रहाणार्‍या पाकिस्तान्यांना परत जाण्याचे फर्मान निघाल्यावर ही घटना उघडकीस आली. पाकिस्तान्यांनी येथील मुलींशी केलेले काही निकाह हे फसवून झाले आहेत, तर काही सांगून सवरून झाले आहेत. सीमेकडील भागात विशेषतः पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे पाकिस्तानी नवरे असलेल्या मुसलमान महिला असल्याचे लक्षात येत आहे. या महिला आणि त्यांची मुले भारतात रहात आहेत अन् नवरे मात्र पाकिस्तानात. अशा प्रकारचे लिखाण सामाजिक माध्यमातून प्रसारित होत आहे. त्यांतील अतिशयोक्ती सोडली, तर त्यातील तथ्यांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सीमा हैदरचे प्रकरण चर्चेत असतांनाच आता पंजाबमध्ये आणखी मारिया नावाची एक पाकिस्तानी तरुणी भारतातील तरुणावर ‘फेसबुकद्वारे प्रेम’ करून लग्न करून आली आहे आणि तिला तिचे मूल भारतीय नागरिकत्व मिळण्यासाठी इथेच जन्माला घालायचे आहे. त्यामुळे ती पाकिस्तान्यांनी भारत सोडण्याचा आदेश आल्यावर आता गायब झाली आहे. पाकिस्तान आणि भारत येथील मुसलमानांचे एकमेकांशी प्रचंड प्रमाणात वैवाहिक संबंध असल्याचे यावरून लक्षात येत आहे. पाकिस्तान्यांशी निकाह केलेल्या भारतीय महिलांना पाकिस्तानने नागरिकत्व दिलेले नाही; मात्र काहींची मुले तिथे जन्मल्याने त्यांना नागरिकत्व दिले आहे. वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी अशा महिलांच्या मुलाखती घेत आहेत. त्यातून त्यांना सहानुभूती मिळू शकते. एकंदरच यावरून ‘पाकशी भारताचे मोठ्या प्रमाणात ‘रोटी-बेटी संबंध’ असल्याचे सत्य आता नव्याने पुढे आले आहे. भारताच्या प्रथम क्रमांकाच्या शत्रूदेशाशी एवढ्या मोठ्या प्रमाणात ‘रोटी-बेटी संबंध’ असणे, हे शत्रूला मुक्त आंगण दिल्याप्रमाणेच आहे. शत्रूदेशातील मुलाशी किंवा मुलीशी निकाह करणार्‍यांना ‘या देशात मुले-मुली नाहीत का ?’, असा प्रश्नही दुबे यांनी उपस्थित केला आहे. याला ‘लोकसंख्या जिहाद’ही म्हटले जात आहे. जर ही संख्या खरोखर सहस्रोंच्या संख्येने असेल, तर या संशयाला जागा रहाते. आतापर्यंतच्या सर्वच आतंकवादी आक्रमणात भारतातील स्थानिकांचा हात असल्याचे पुरावे मिळाले आहेत. अशा प्रकारे शत्रूदेशाशी संबंध असणारे लोक असतील आणि त्यांची एवढी मोठ्या प्रमाणात ये-जा चालू असेल, तर त्यातून किती ‘स्लिपर सेल’ (छुपे गट) उदयाला येत असतील, याची कल्पना करता येते. भारतातील सर्वच भागांत पाकिस्तानी नवरे असणार्‍या महिला आढळत असल्याने पाकिस्तानी पुरुषांच्या माध्यमातून आतंकवाद्यांना आतापर्यंत मोठे साहाय्य झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

भारतापुढे आव्हान !

भारतात मोठ्या प्रमाणावर असलेल्या पाकिस्तान्यांमध्ये सगळेच आतंकवादी असतील, असे कुणीच म्हणणार नाही; परंतु ओळख लपवून किंवा व्हिसा मिळालेला नसतांना जेव्हा भारतात अनेक जण रहातात, तेव्हा ते आतंकवाद्यांना साहाय्य करणारे स्थानिक ‘स्लिपर सेल’ असण्याचा संशय वाढतो. काँग्रेसच्या राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आणून वसवले गेले. आता बांगलादेशी घुसखोरांविरोधात कारवाई करता करता सरकारला नाकीनऊ आले आहे. कितीही कारवाया केल्या, तरी ते मिळायचे काही थांबत नाहीत. यावरून या समस्येचे गांभीर्य लक्षात येते. त्यात आता मोठ्या प्रमाणात पाकिस्तानी नागरिकांचे वास्तव्य समोर आले आहे. त्यांच्यापैकी ज्यांचा आतंकवादी कारवायांशी काही ना काही संबंध असेल, तर त्यांना शोधून शिक्षा होणेही तेवढेच आवश्यक आहे. एकंदर काय लक्षात येते की, भारतियांच्या ‘सर्वसमावेशक’ या सद्गुणविकृतीचा भारताच्या नकळत शत्रूने चांगलाच लाभ उठवला आहे. यांतील अद्यापही भारतात असलेल्या अवैध नागरिकांना शोधून काढणे आणि त्यांना देशाबाहेर घालवणे, हे सरकारसाठी आणखी मोठे आव्हान ठरणार आहे, हे मात्र निश्चित !

प्रत्येक अवैध घुसखोराला देशातून परत पाठवण्याचे आव्हान भारताने सक्षमपणे पेलणे महत्त्वाचे !