महाराष्ट्रातील ६ जणांच्या कुटुंबियांना ‘नागरी शौर्य पुस्कारा’ने सन्मानित करावे ! – खासदार सुप्रिया सुळे

पहलगाम आतंकवादी आक्रमणाचे प्रकरण

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे

पुणे – पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या राज्यातील ६ जणांच्या कुटुंबियांना १ मे या दिवशी साजरा होणार्‍या महाराष्ट्रदिनी ‘नागरी शौर्य पुरस्कारा’ने गौरवण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या खासदार सौ. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. घरातील कर्त्या पुरुषांवर आक्रमण होत असतांना त्यांच्या कुटुंबियांनी कठीण प्रसंगाचा धीरोदत्तपणे सामना केला. कुटुंबियांनी दाखवलेली हिंमत मोलाची आहे. त्यामुळे या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या ६ जणांच्या कुटुंबियांना गौरवण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे, असेही सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे. या आक्रमणांमध्ये महाराष्ट्रातील संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोरे, दिलीप देसले, कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला आहे.