सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी युवा साधकांना सत्संगात केलेले अनमोल मार्गदर्शन !

मध्यंतरी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात प्रसारातील युवा साधकांचे शिबिर झाले. त्या वेळी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा काही भाग आपण ३० एप्रिल २०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग येथे दिला आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/908597.html

७. साधनेची फलनिष्पत्ती

७ आ. परिपूर्ण व्यष्टी आणि समष्टी साधना अन् ईश्वराप्रती भाव असणे, हे साधना चांगल्या प्रकारे होण्याचे प्रतीक !

श्री. चेतन राजहंस : पुण्याहून कु. ऋग्वेद जोशी आला आहे. तो वादन कलेतही निपुण आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : जे नृत्य, वादन किंवा चित्रकला यांत पारंगत आहेत आणि ज्यांची साधनेत प्रगती झाली आहे (६१ टक्के किंवा त्यापुढील आध्यात्मिक पातळी गाठली आहे), त्यांना कलेत अडकू द्यायचे नाही. अन्य साधक, जे पुढे गेले आहेत, तसे कलेशी निगडित असलेले साधकही लवकर संत होतील !

श्री. चेतन राजहंस : ऋग्वेदने शिबिरातील प्रायोगिक भागात सनातन-निर्मित ग्रंथांची माहिती सांगण्याची प्रत्यक्ष सेवा केली. त्या वेळी त्याने ग्रंथांची माहिती पुष्कळ चांगल्या प्रकारे सांगितली, म्हणजे त्याचा समष्टी सेवेचा पिंड आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : पुष्कळ छान !

कु. ऋग्वेद जोशी (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) : प.पू. गुरुदेव, मला आतूनच पुष्कळ आनंद, अत्यानंद होत आहे. मी वर्ष २०१९ पासून साधनेला आरंभ केला. पूर्वी माझ्याकडून विशेष साधना होत नव्हती. कोरोना महामारीच्या आधी काही मास मिरज (जि. सांगली) येथील सनातनच्या आश्रमात साधनेसंबंधी एक शिबिर झाले होते. तेथे मला सहभागी होण्याची संधी मिळाली. ते शिबिर माझ्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’, म्हणजे माझ्या जीवनाला वळण देणारे होते. त्यानंतरच माझ्या साधनेला खर्‍या अर्थाने आरंभ झाला. नंतर दळणवळण बंदी लागू झाली; पण तो काळ माझ्यासाठी आपत्काळ नसून कृतज्ञताकाळच होता ! त्या वेळी आपल्या कृपेने माझी साधना पुष्कळ चांगल्या प्रकारे होऊ लागली. आता २ – ३ मासांपासून मला पुष्कळ इच्छा होत होती की, ‘आपण आश्रमात जावे आणि आश्रम पहावा.’

परात्पर गुरु डॉ. आठवले : तू भावस्थितीत आहेस, हेच पुरेसे आहे ! म्हणजे ‘व्यष्टी साधना, समष्टी साधना आणि भाव’ या तिन्ही गोष्टी तुला ठाऊक आहेत. याचा अर्थ तुझी साधना चांगली चालू आहे.

७ इ. मनात येणार्‍या प्रश्नांची उत्तरे आतून मिळणे, हे प्रगतीचे लक्षण आहे ! 

कु. ऋग्वेद जोशी : कधी मला एखादी अडचण येते. तेव्हा मी माझ्या मनातील सर्व प्रश्न आपल्याला विचारतो. आपण मला त्यांची उत्तरेही सांगता. गुरुदेव, आपण माझे परम सखा आहात, ज्यांना मी सर्वकाही सांगू शकतो. मी जे प्रश्न विचारतो, त्या सर्वांची उत्तरे आपण मला समजावून सांगता.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अशी अनुभूती येते ना ! तुझी आध्यात्मिक प्रगती चांगली होत आहे. तुला आतूनच उत्तरे मिळतात ना ? इतरांना कुणाला तरी विचारावे लागते. तुला सर्वकाही आतूनच समजत आहे. फारच छान !

(क्रमशः)

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/909351.html