‘ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या’ सांगणारे भारतीय तत्त्वज्ञानच जगात श्रेष्ठ !

१. प्राचीन, विशाल आणि समृद्ध ज्ञानाचा वारसा असलेला भारत !

भारताला प्राचीन, विशाल आणि समृद्ध ज्ञानाचा वारसा आहे; मात्र ब्रिटीश सत्ताधार्‍यांनी भारतीय विद्यार्थ्यांना हे ज्ञान शिकवले नाही; कारण त्यांना भारतियांना महान परंपरेची जाणीव होण्यापासून दूर ठेवायचे होते. भारतियांचा आत्मविश्वास डळमळीत करण्यासाठी भारतीय ज्ञान निरूपयोगी आहे, असा अपप्रचार इंग्रजांनी केला. सुदैवाने आता नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानप्रणालीचा समावेश झाल्यामुळे भारतीय पुन्हा आपल्या विशाल आणि समृद्ध परंपरेशी परिचित होऊ लागले आहेत. या परंपरेत तत्त्वज्ञान, विज्ञान, कला, संगीत, अर्थव्यवस्था, आयुर्वेद, वास्तुशास्त्र, धातूकला, खगोलशास्त्र, खाद्यसंस्कृती यांसह युद्धनीतीही समाविष्ट आहे.

२. ज्ञानाचे श्रेय ऋषींना द्यायला हवे !

भारतीय वैदिक तत्त्वज्ञान विशेषतः अद्वैत वेदांत हा ज्ञानाचा पाया आहे; कारण ते आपल्या शाश्वत आत्म्याविषयी आहे, जिथून प्रेम आणि प्रेरणा जन्म घेतात. भारतीय ज्ञानाच्या इतर शाखा आपल्या भौतिक जीवनासाठी उपयुक्त आहेतच; पण संसार म्हणजे माया आहे. भारतीय ज्ञानाचा बराचसा भाग पाश्चात्त्य देशांपर्यंत पोचला आहे. या ज्ञानामुळे पाश्चात्त्य जगतातील विज्ञान आणि तत्त्वज्ञान घडले. अनेक विदेशी लोकांनी अद्वैत वेदांताचा शोध घेतला आहे. आज सामाजिक माध्यमांवर अनेक व्हिडिओ आहेत. त्यात असे सांगितले जाते की, सर्वकाहींचे मूळ चैतन्य आहे. हे विधान प्राचीन भारतीय ग्रंथांमधूनच आले आहे; पण पाश्चात्त्य लोक त्याचा उल्लेख करत नाहीत. ‘जग (संसार) मिथ्या आहे’, ही संकल्पना आज पाश्चात्त्य जगामध्ये गांभीर्याने घेतली जात आहे. जगप्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनीसुद्धा अशा आशयाचे वक्तव्य केले होते. भारतीय ऋषींनी सहस्रो वर्षांपूर्वीच जग (संसार) हे माया असल्याचे सांगून ठेवले आहे. परदेशी लोकांनी या ज्ञानाचे श्रेय उघडपणे प्राचीन ऋषींना द्यायला हवे.

३. अत्युच्च चेतनाशक्ती स्वतःसोबत असल्याचा अनुभव घेणारा जर्मन पॉडकास्टर !

मारिया वर्थ

२३ फेब्रुवारी २०२५ या दिवशी जर्मन निवडणुकीपूर्वी लोकप्रिय रेडिओ पत्रकार आणि पॉडकास्टर केवन सौफी सियावाश (केन जेबसेन) याची मुलाखत झाली. त्याची आई जर्मन आणि वडील इराणी आहेत. पूर्वी डाव्या विचारसरणीला समर्थन देणारा केवन आता उजव्या विचारांच्या ए.एफ्.डी. पक्षाला समर्थन देऊ लागल्याने वादग्रस्त ठरला. मुलाखत घेणार्‍याने त्याच्या मतपरिवर्तनाविषयी प्रश्न विचारल्यावर केवन राजकारणाविषयी न बोलता आश्चर्यकारकरित्या भारतीय तत्त्वज्ञानाविषयी बोलले. त्याचे म्हणणे होते की, आपण सर्वजण रंगमंचावरचे कलाकार आहोत. जग हे वास्तव नाही. मी कोण आहे ? याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. जेव्हा मी ‘पॉडकास्ट’वर बोलतो, तेव्हा  उच्च पातळीवरचे माझ्या तोंडून बोलले जाते. मग मलाच वाटते, ‘मी हे खरंच बोललो का ?’ तो पुढे म्हणाला, “कुणी आपल्या मागे नसेल, तरीही एक काहीतरी आपल्या मागे उभे असते.”

‘देव आहे का?’ असे मुलाखकाराने विचारल्यावर केवन म्हणाला, ‘‘तुम्ही त्याला देव किंवा शिवा म्हणू शकता. ती उच्च चेतनेची पातळी असून आपल्याला आधार देते.’’

केवन याने शिवाचा उल्लेख करणे पुरेसे आहे; कारण त्याला भारतीय तत्त्वज्ञानाची नीट ओळख आहे. त्याने योगामध्येही त्याची तल्लीनता व्यक्त केली. ही मुलाखत पाहून प्रकर्षाने जाणवले की, पाश्चात्त्य देशांतही अनेक जण सत्याचा शोध घेत आहेत. काही जण ख्रिस्ती धर्माकडे वळतात; कारण त्यांना दुसरे काहीच ठाऊक नसते; पण या पॉडकास्टरप्रमाणे काही जण भारतातील ज्ञान शोधून काढतात.

४. भारतीय तरुणांनी ऋषींचे तत्वज्ञान समजून घ्यावे !

‘मी कोण आहे ?’ या प्रश्नाचे महत्त्व भारतीय तरुण समजून घेऊ शकत नाहीत, ही वेदनादायी गोष्ट आहे. आजही अनेक भारतियांना ठाऊक नाही की, सर्वकाही चैतन्य आहे. संसार म्हणजे माया आहे. हे तत्त्वज्ञान ऋषींचे आहे. ‘ब्रह्म सत्यं, जगत् मिथ्या’ म्हणजेच ब्रह्म हेच खरे सत्य आहे, जग (संसार) माया आहे, हे अद्वैत वेदांताचे मूळ आहे. आता नव्या अभ्यासक्रमात या ज्ञानाचा समावेश झाल्याने भारतीय पुन्हा त्यांच्या मौल्यवान परंपरेशी जोडले जातील आणि साधनेसाठी प्रेरित होतील, अशी आशा आहे.

५. जीवन यशस्वी होण्यासाठी स्वतःला आत्म्याशी जोडणे आवश्यक !

भगवद्गीतेत ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोग यांविषयी अमूल्य मार्गदर्शन केलेले आहे. गुरूंचे मार्गदर्शन या मार्गावर उपयुक्त ठरते, भक्ती तर अत्यंत प्रभावी मार्ग आहे. त्यात इष्टदेवतेला मंत्राच्या साहाय्याने स्मरण करून प्रसन्न करून घेता येते. हे देवत्व म्हणजे एकाच ब्रह्माचे मायेतील रूप आहे. केवळ बौद्धिक ज्ञान पुरेसे नसून आपले जीवन उन्नत करण्यासाठी आपल्याला आत्म्याशी संपर्क साधावा लागतो. तेव्हाच खरा आत्मविश्वास मिळवता येतो. तो सदैव आपल्या पाठीशी असतो.

– मारिया वर्थ, हिंदु धर्म अभ्यासक, उत्तराखंड.

संपादकीय भूमिका

नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानप्रणालीचा समावेश झाल्याने भारतीय विशाल आणि समृद्ध परंपरेशी जोडले जातील !