‘राजकारण’ हा शब्द उच्चारला की, काही जण त्याच्याकडे वेगळ्या दृष्टीने पहातात, म्हणजे आपला आणि त्याचा काही संबंध नाही. तुम्ही राजकारणापासून दूर रहाता; पण ‘राजकारण’ हा तुमच्या जीवनाच्या प्रत्येक अंगाला व्यापणारा अविभाज्य घटक आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. राजकारण हा शब्द उपरोधिक अर्थाने घेतला जातो; कारण त्याला कलंकित केलेले आहे. ‘शासनकर्त्यांनी राज्य चालवणे’, या अर्थाने राज्यकारण असा अर्थ होतो.
१. आदर्श राज्य
राजाला विष्णूचा अंश मानला जातो. विष्णु म्हणजे धर्म. ‘धर्माचरणी राजा प्रजेच्या हितासाठी धर्माधिष्ठित राज्य चालवतो, ते म्हणजे आदर्श राज्य !’ राजा अथवा शासनकर्ते राज्य चालवतात, म्हणजे प्रजेकडून कर वसूल करतात आणि त्यामध्ये प्रजेला सुरक्षितता अन् सुविधा देतात. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे राष्ट्राचे बाह्य शत्रूंपासून रक्षण करणे, तसेच राज्यांतर्गत शत्रू, चोर, दरोडेखोर, अत्याचारी इत्यादी समाजकंटकांपासून प्रजेचे रक्षण करणे. यामध्ये प्रजेच्या प्राणांचे रक्षण करणे त्याचसमवेत राष्ट्राची आणि प्रजेची साधनसंपत्ती जसे घर, भूमी, शेती, धन, दौलत यांचे रक्षण करणे; यासह प्रजेला सार्वजनिक सोयीसुविधा पुरवणे जसे रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण इत्यादी.
२. सध्याची फसलेली व्यवस्था

राज्यकारणाच्या २ पद्धतींपैकी एक जनहितकारी पितृसत्ताक राज्यपद्धत आणि दुसरी लोकशाही ! सध्याच्या लोकशाही राज्यपद्धतींमध्ये प्रजा ही राजा मानली गेली आहे; परंतु प्रत्यक्षात प्रजा राज्य चालवू शकत नाही. प्रजेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी राज्यकारभार पहातात. येथे पहायला गेले, तर एकदा मतदान केल्यानंतर राज्यकारभार करण्याचे पूर्ण अधिकार जनता लोकप्रतिनिधींना देते. त्यानंतर मात्र लोकप्रतिनिधींवर जनतेचा कोणताच अंकुश रहात नसल्याने ते कशा पद्धतीने राज्यकारभार चालवतात, ते विद्यमान लोकशाही व्यवस्थेत आपण अनुभवत आहोत. सर्वच क्षेत्रांमध्ये अनागोंदी कारभार, भ्रष्टाचार, दुरवस्था अनुभवायला येते. थोडक्यात लोकशाहीतील व्यवस्था ही सुराज्य देणारी नाही, हे वारंवार सिद्ध झाले आहे. आपण ते अनुभवतही आहोत.
३. राजधर्माचे पालन करणारा राजा हवा !
याचे एक महत्त्वाचे कारण, म्हणजे राज्य चालवण्यासाठी राजा म्हणून पात्र व्यक्ती असायला पाहिजे. मुख्य म्हणजे त्याला राजधर्माचे पालन करता आले पाहिजे. जनता, राष्ट्र आणि राष्ट्रीय संपत्ती यांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक लढाऊ वृत्ती राजामध्ये असायला हवी; म्हणजेच राजा हा क्षत्रिय, जितेंद्रिय आणि धर्माचरणी असायला हवा, तरच तो सुराज्य देऊ शकतो. त्याच्या राज्यात प्रजा सुखा-समाधानाने निर्भयतेने नांदू शकते. धर्माचरण करू शकते. आनंदप्राप्तीसाठी साधना करू शकते. राज्य चालवण्याच्या लोकशाही व्यवस्थेमध्ये हे महत्त्वाचे घटक पूर्णपणे दुर्लक्षित केलेले आहेत. थोडक्यात जनतेने राज्य करायचे नसते, तर राज्याचा उपभोग घ्यायचा असतो. राज्यकारभार हा जनतेने सामूहिक चालवण्याचा विषय नाही; कारण राज्य चालवण्यासाठी आवश्यक गुणवत्ता प्रत्येक नागरिकात असतेच, असे नाही.
४. समाजातील सर्व घटकांच्या मतांचे मूल्य सारखेच, हे चुकीचे ठरते !
लोकशाहीत सर्व प्रजेला एकसमान मानून मतदानाचा सारखाच अधिकार दिलेला आहे आणि हे सूत्र राज्य चालवण्याच्या संदर्भात अनैसर्गिक आहे, म्हणजे सर्वसाधारण व्यसनाधीन व्यक्ती, कामगार, मजूर, अल्पशिक्षित व्यक्ती, उच्चशिक्षित आधुनिक वैद्य, प्राध्यापक, अधिवक्ता, अभियंता यांच्या मतांचे मूल्य हे समान आहे. समाजातील जो घटक बहुसंख्य आहे, तो पैसे मांस, मद्य इत्यादी मोहाला फसून ज्याला मतदान करणार, तो शासनकर्ता म्हणून निवडून येणार. उच्चशिक्षित, बुद्धीवंत, विचारवंत यांनी कितीही प्रयत्न केले, तरी योग्य शासनकर्ते निवडून येणे, हे अशक्यप्राय होऊन जाते. समाजातील उच्चशिक्षित, विचारवंत, राष्ट्राचा विचार करणार्या व्यक्तींची संख्या तुलनेने अल्प असल्याने आणि त्यांच्या मताचे मूल्य सामान्य व्यक्तीच्या मताएवढेच असल्याने राष्ट्रप्रेमी, धर्मनिष्ठ चांगले शासनकर्ते निवडून येण्याची शक्यता अल्प रहाते !
५. धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापना अपरिहार्य !
थोडक्यात सत्तेची सूत्रे ज्यांच्याकडे अधिक पैसा व्यय करण्याची क्षमता आहे, अशांकडे जातात. अशा व्यक्ती निवडून आल्यावर निवडणुकीत मतदारांना प्रलोभन म्हणून दिलेला पैसा, कार्यकर्त्यांसाठी केलेला व्यय, निवडून येण्यासाठी येनकेनप्रकारेण केलेला सर्व व्यय किंबहुना त्याहीपेक्षा अधिक पैसा सत्ताकाळात मिळवण्याचा प्रयत्न करतो. यामध्ये देश लुटला जातो. यात देशाची प्रगती, तसेच सुरक्षा यांना दुय्यम स्थान दिल्याने त्यांना खिळ बसते. अशी ही अपयशी लोकशाही लोकांसाठी खरोखरच हितकारक आहे का ? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. भारत हा ‘जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेला देश’ असे आपण म्हणतो. ‘गेल्या ७७ वर्षांत या लोकशाहीतील व्यवस्थेमुळे भारत हा जगातील सर्वाधिक समृद्ध, सुखी आणि सुरक्षित बलशाली देश असायला हवा होता, तरच ती व्यवस्था यशस्वी झाली’, असे म्हणता आले असते; पण वस्तूस्थिती तशी नाही. उलट व्यवस्था पूर्णतः अपयशी ठरलेली असल्याने तिच्यात पालट करणे अत्यंत आवश्यक आहे; म्हणूनच सुराज्य स्थापनेसाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापनेला पर्याय नाही.
६. हिंदू संघटित न राहिल्याचे परिणाम
‘जनतेला तिच्या लायकीप्रमाणे शासनकर्ते मिळतात’, असे ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले होते. जनतेला असे दिवस येणे, हे जनतेने तिला दिलेल्या लोकशाही अधिकारात अयशस्वी राज्यकारभार करण्याचे फलित आहे. हे व्यवस्थेचे जोखड झुगारून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे; म्हणूनच प्रत्येक हिंदूने राजकारणापासून अलिप्त रहाणे, ही मोठी चूक ठरेल. आपण कितीही म्हटले, तरी राजकारणापासून आपल्याला स्वतंत्र आणि विभक्त रहाता येत नाही. लोकशाहीमुळे तो आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. राजकारणापासून अलिप्त रहाणे, विभक्त रहाणे, म्हणजेच निद्रिस्त किंवा ‘मी आणि माझे काम भले’ या घातक आत्मकेंद्रित वृत्तीत रहाणे होय अन् नेमका याचाच अपलाभ स्वार्थी, सत्तालोलुप शासनकर्ते घेत रहातात. गेल्या ७७ वर्षांच्या काळात आपण संघटित हिंदू म्हणून न राहिल्याने ते अनुभवत आहोत. राष्ट्र आणि धर्म यांप्रती आपण जागरूक सतर्क न राहिल्यामुळे कितीतरी जाचक कायदे करून ते आपल्यावर लादण्यात आले, ज्यात ४२ व्या घटना दुरुस्तीने भारताला ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्र’ घोषित करणे, हिंदूंना शाळेपासून धर्मग्रंथांचे शिक्षण न घेता येणे, ‘मुस्लीम पर्सनल लॉ’ कायम ठेवणे, अल्पसंख्यांक आयोग कायदा १९९१, पूजा आणि धार्मिक स्थळ अधिनियम १९९२, वक्फ अधिनियम १९९५ यांसह अन्य अनेक कायद्यांचा समावेश आहे.
– श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी (२४.४.२०२५)
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होणे, हे आपले कर्तव्य !
देशावर अब्जावधी रुपयांचे कर्ज निर्माण झाले. देशातील काळ्या पैशांत वाढ झाली. महागाई निर्देशांक वाढत आहे. धर्माच्या आधारावर फाळणी झाली, तरीही देशात अहिंदूंची लोकसंख्या बेसुमार वाढली. शेजारच्या देशांमधून आलेले घुसखोर, त्यांना दिलेले नागरिकत्व आणि हिंदूंच्या सम मतदानाचा दिलेला अधिकार याचा परिणाम, म्हणजे अहिंदू मतदारांमध्ये झालेली वाढ आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात शासनकर्त्यांच्या निवडीवर होणारा मोठा दुष्परिणाम ! हे देशातील हिंदूंना जाचक ठरत आहेत. ही व्यवस्था अशीच चालत राहिली, तर तिची वाटचाल इस्लामी राज्याकडे होईल !
बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंना निर्वासित व्हावे लागत आहे. हिंदूंची कत्तल होत आहे, त्यांची घरे जाळून त्यांना लुटले जात आहे, हिंदूंची भूमी, घरे, संपत्ती, लुटली जाते, हे जर आपण उघड्या डोळ्यांनी पहात राहिलो, तर राजकारणापासून बाजूला रहाणे ही मानसिकता, म्हणजे आपले नपुंसकत्व असेल. भगवान विष्णूने अवतार घेऊन रामराज्य आणले, श्रीकृष्णाने महाभारत करून धर्मराज्य आणले, छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आपल्यालाही देवासारखे ‘राज्य’कारण करून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेत तन, मन, धन आणि सर्वस्व अर्पण करून सहभागी व्हावे लागेल, तरच आपण हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे शिलेदार अन् साक्षीदार होऊ !
– श्री. गोविंद भारद्वाज, रत्नागिरी