Sardar Raghuji Bhosale Sword : मराठा सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथील ऐतिहासिक तलवार लिलावात महाराष्ट्र शासनाने मिळवली !

सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार

मुंबई – नागपूर येथील भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या काळातील शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार लंडन येथील लिलावात प्राप्त करण्यात महाराष्ट्र शासनाला यश आले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती माध्यमांना दिली. याविषयी आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून ऐतिहासिक तलवारीच्या लिलावामध्ये सहभाग घेऊन ही तलवार प्राप्त केली.

तलवारीच्या मूल्यासह ती भारतात आणणे, विमा आदी एकूण ४७ लाख १५ सहस्र रुपये इतका व्यय अपेक्षित आहे. नागपूरकर भोसले यांची वर्ष १८१७ मध्ये सीताबर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. नागपूरचे संस्थान ब्रिटिशांनी स्वतःच्या राजवटीखाली आणल्यावर या संस्थानकडून ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. यातून ही तलवार लंडन येथे गेली असण्याची शक्यता  जाणकार व्यक्त करत आहेत.

तलवारीचे वैशिष्ट्य !

ही तलवार मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून त्यावर पाते करणार्‍या आस्थापनाचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील माहिती ‘ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती’, याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते.

सरदार रघुजी भोसले यांचा पराक्रम !

मराठा सरदार रघुजी भोसले

सरदार रघुजी भोसले (कालावधी वर्ष १६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होऊन छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली. रघुजी भोसले प्रथम यांनी वर्ष १७४५ आणि वर्ष १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्धच्या युद्ध मोहिमेचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचा पराभव करून दक्षिण भारतात मराठ्यांचा दबदबा निर्माण केला. १८ व्या शतकातील अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसले यांच्याकडे पाहिले जाते.