Pakistan Minister’s Press Conference : भारत येत्या २४ किंवा ३६ घंट्यात पाकवर आक्रमण करू शकतो !

पाकच्या मंत्र्यांनी रात्री दीड वाजता पत्रकार परिषदेत केला दावा

पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत पहलगाम येथील आक्रमणाच्या घटनेचा बहाणा करून येत्या २४ किंवा ३६ घंट्यांत आक्रमण करू शकतो, अशी विश्वसनीय गुप्त माहिती समोर आली आहे. जर भारताने अशा प्रकारे कारवाई केली, तर आम्ही त्या कारवाईला आक्रमकरित्या प्रत्युत्तर देऊ, अशी धमकी पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी २९ एप्रिलच्या मध्यरात्री दीड वाजता पत्रकार परिषद घेऊन दिली. २९ एप्रिलला सायंकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, परराष्ट्रमंत्री, संरक्षणमंत्री आदींची बैठक घेतली. या बैठकीत सैन्याला पाकविरोधात कारवाई करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली, असे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिली. आक्रमण कधी आणि कुठे करायचे, याचा निर्णय सैन्याने घ्यावा, असे मोदी यांनी म्हटल्याचे सांगितले गेले. यानंतर तरार यांनी रात्री वरील धमकी दिली.

मंत्री तरार यांनी पुढे म्हटले की, पाकिस्तान स्वतः आतंकवादाचा बळी ठरला आहे. या संकटाची वेदना आम्ही चांगल्या प्रकारे जाणतो. जगामध्ये आम्ही नेहमीच याचा निषेध केला आहे. सत्य शोधण्यासाठी तज्ञांच्या एका निष्पक्ष आयोगाकडून विश्वसनीय, पारदर्शक आणि स्वतंत्र चौकशी करण्याची सिद्धता पाकिस्तानने दर्शवली आहे. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे कोणत्याही किमतीत संरक्षण करण्याच्या संकल्पाचा मी इथे पुनरुच्चार करतो. तसेच कोणत्याही आक्रमक कारवाईला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल.

संपादकीय भूमिका

भारत पाकवर आक्रमण करणार, हे जवळपास ठरलेले आहे; मात्र हे आक्रमण पाकला संपूर्ण धडा शिकवणारे असणार कि पूर्वीप्रमाणेच छोटीशी कारवाई असणार, हे घटना घडल्यावरच लक्षात येईल; मात्र त्यापूर्वीच पाकची भीतीने गाळण उडाली आहे, हे यातून लक्षात येते !