मराठी राजभाषेचा लढा हा राष्ट्रीयत्व, परंपरा आणि संस्कृती संरक्षण करणारा ! – प्रा. सुभाष वेलिंगकर

सत्तरी तालुका मराठी भाषा प्रखंड मेळावा

प्रा. सुभाष वेलिंगकर

वाळपई (गोवा), २९ एप्रिल (वार्ता.) – मराठी भाषेचा लढा हा केवळ मराठी भाषेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो राष्ट्रीयत्व, संस्कृती आणि देशाची अस्मिता यांच्यासाठी लढा आहे. यामुळे येणार्‍या काळात गोव्यामध्ये मराठी जिवंत राहिली नाही, तर याठिकाणी राष्ट्रीयत्वाचे विचार जन्माला येणार नाहीत. अस्मितेचा धागा तुटून अस्मितेला सुरुंग लागेल. यातून मने कलुषित होतील. आपल्या मंदिरांमध्ये चालणारी भजने, कीर्तने आणि धार्मिक उत्सव यांची जागा पाश्चात्त्य संस्कृती घेईल. यामुळे आता मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी उभारलेला लढा हा निर्णायक स्वरूपाचा आहे. हा लढा प्रत्येकाने शेवटच्या श्वासापर्यंत लढला पाहिजे. जोपर्यंत मराठी भाषिक मतपेढी सिद्ध होत नाही, तोपर्यंत राज्यकर्त्यांवर दबाव येणार नाही. यामुळे पुढील ३ वर्षांमध्ये मराठी भाषिक पर्यायाने हिंदु बांधवांनी मराठी भाषेच्या समर्थनार्थ आपली मतपेढी निर्माण केली पाहिजे. पंचायतस्तरावर समित्या स्थापन करून संघटनात्मक लढा देण्यासाठी पाया मजबूत केला पाहिजे. प्रत्येकाने आपल्यातील सर्व प्रकारचे मतभेद बाजूला सारून राष्ट्रीयत्व, देशाभिमान, देशाची अखंडता, संस्कृती आणि परंपरा यांसाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन ‘मराठी राजभाषा निर्धार समिती’चे नियंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले आहे.

सत्तरी तालुका पातळीवर आयोजित करण्यात आलेल्या प्रखंड मेळाव्यात प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी सत्तरी तालुक्यातील मराठी भाषिकांना हे आवाहन केले.

वाळपई येथे इंदिराबाई सभागृहात २८ एप्रिल या दिवशी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर मराठी भाषेचे ज्येष्ठ कार्यकर्ते गो.रा. ढवळीकर, मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष संदीप केळकर, सामाजिक कार्यकर्ते सदानंद काणेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला वाळपई येथील श्री हनुमान मंदिरामध्ये सार्वजनिक गार्‍हाणे घालून आरंभ करण्यात आला. प्रा. वेलिंगकर पुढे म्हणाले,‘‘मातृशक्ती, नारीशक्ती आणि युवाशक्ती यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या लढ्यात सहभागी झाले पाहिजे. सध्या समाजात राष्ट्रीय भावना बाजूला सारण्याचे मोठे षड्यंत्र रचले जात आहे. याचा बीमोड करण्यासाठी सर्वांनी एकसंघ होणे ही काळाची आवश्यकता आहे.’’

या वेळी गो.रा. ढवळीकर म्हणाले,‘‘कोकणी भाषिक आज सातत्याने असत्य मांडण्याचा आणि युवकांना भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘मराठी भाषा ही गोव्याची नसून ती महाराष्ट्राची आहे’, असा विचारप्रवाह विषारी पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आज गोव्याची ओळख अमली पदार्थ, अत्याचार, व्यभिचार, अशी झालेली आहे. ही ओळख पुसून टाकण्यासाठी मराठी जिवंत रहाणे आवश्यक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त करणारी व्यक्ती सोज्वळ, निर्मळ आणि सर्जनशील असणे अपेक्षित असते; मात्र गोव्यात दुर्दैवाने ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेले मराठीचा द्वेष करत आहे. अशा व्यक्तींना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन साहित्य अकादमीने पुरास्काराची अप्रतिष्ठा केली आहे.’’

मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याच्या लढ्याला ‘गोमंतक मराठी साहित्य परिषदे’चे अध्यक्ष संदीप केळकर यांनी पाठिंबा दर्शवला. मेळाव्याच्या प्रारंभी उदय सावंत यांनी देवाला सांगणे केले, तर वंदना जोशी यांनी गणेश वंदना म्हटली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणपतराव राणे यांनी केले, तर शेवटी गणेश माटणेकर यांनी आभार मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी उपस्थितांना ‘मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा प्राप्त व्हावा’, यासाठी प्रतिज्ञा घेतली.